Friday, August 7, 2009

खेड्यामधले घर कौलारू -2


जेवताना घरात अनेक पंगती उठत. सर्वात प्रथम लहान मुले (अर्थात नदीवर डुंबायला गेली नसतील तर), नंतर मोठी माणसे आणि सर्वात शेवटी घरातील बायका. पंगती उठत असताना चुलीवर रन टाइम भाकरी भाजणे चालूच असायचे. त्या भाकरी भाजण्याला लष्कराच्या भाकर्‍या भाजणे हा एकाच शब्द प्रयोग योग्य वाटतो. सगळ्यांची जेवणे झाल्यावर तो भांड्यांचा डोंगराएवढा ढीग घासणे पार पडे. कधी कोंबडा, बकरा, डुक्कराचे मटण बनवायचे असेल तर त्यांची कामे अजूनच वाढत. (डुककर हे जंगलातून शिकार करून आणलेले असत, मुंबई उपनगरात गटारात लोळणारे डुककर नव्हेत).

दुपारी मग बायका आणि मोठी माणसे जरा सुस्तावायची आणि आम्ही मात्र पत्ते किंवा गाण्याच्या भेंड्या खेळणे नाहीतर नुसतीच एकमेकांची मस्करी करणे असली कामे करू. मुंबईत वर्षभर राहून सुद्दा एकमेकांची तोंडे कधी दिसत नसत, मग ती कसर या उन्हाळ्याच्या सुट्टीत काढली जाई. संध्याकाळी अजुन एकदा बिनदुधाचा चहा गळ्याखाली उतरवल्यानंतर गुरांना चरायला नेण्याची ड्यूटी असे. गुरांना रानात लावल्यावर आम्ही जांभळे, कैर्‍या, आंबे काढणे असले उद्योग करत असू. गावची मुळे सरसर झाडावर चढून त्या गोष्टी काढायची आणि आम्ही त्या खाली झेलायचो. जांभळे खाऊन जीभ काळी जांभळी करून घ्यायचो. जीभ जास्तीत जास्त जांभळी करण्याची अघोषित स्पर्धाच असे. हे करता करता अंधार कधी पडायचा ते कळायचे नाही. मग गुरेच जवळ येऊन जणू काही 'आता नेवा आमका घराक' म्हणून सांगायची. घरी गुरे नेऊन एक एक करून दावणीला बांधायची आणि त्यांच्या पुढयात त्यांचे डिनर टाकायचे ही पुढची कामे. आमची गुरे कधी मोजली नाहीत. मोजली तर मरतात असा समज होता. पण सहज 30-40 च्या वर असतील.

तोवर दिवे लागणीची वेळ झालेली असे. गावात वीज पुरवठा तसा कागदोपत्री होता. दिवसातले जवळपास 16 तास वीज नसायची. आली तरी ट्यूब पेटायची नाही. पण त्यामुळे काही अडले नाही. भर उन्हाळ्यात गर्द झाडे आणि वाहत्या वार्‍यामुळे कधी उष्मा जाणवला नाही. रात्री तर भर उन्हाळ्यात पांघरूण ओढावे लागे. त्यामुळे घरात चुलीच्या प्रकाशात गप्पा रंगत. जवळपास सर्वजण तिथे असत. कोणी एस टी स्टॅंडवर गेला असला तर पेपर आणी. मुंबईचे पेपर एक दिवस उशिराने मिळत. मग चुलीच्या प्रकाशात त्याचे वाचन होई. नंतर दुपारच्या प्रमाणेच पंगती होऊन सर्वजण जमिनीवर अंग टाकत. गप्पा मारता मारता डोळा कधी लागे ते कळायचेही नाही.

कधीतरी मग जेवणानंतर शिकारीचा बेत ठरायचा. [कृपया हे वाचून पोलिसात वर्दी देऊ नये. आम्ही सांगू की आम्ही नैच केली शिकार म्हणून:)पुढे शिकारीच थोडस वर्णन आहे. कमजोर हृदयाच्या लोकांनी आणि ज्यांना शिकारी विषयी तिटकारा आहे त्यांनी वाचू नये) ]. मग मोठ्या दादाच्या ट्रॅक्स मधे जागा असेल त्याप्रमाणे माणसे ठुसुन भरली जायची. बंदुका सांभाळून ठेवल्या जायच्या आणि आम्ही मग खारेपाटणच्या नजीक असलेल्या जंगलात जायचो. वाघ सिंह नसायचे पण ससे, डुक्करे आणि तत्सम छोटे प्राणी असायचे. जंगलात पोचल्यावर गाडीच्या टपावर दोघे बंदुक घेऊन बसायचे. सशाचे डोळे गाडीच्या प्रकाशामुळे दिपायचे आणि ते मग गाडीसमोरून रस्ता क्रॉस करायचा प्रयत्न करायचे आणि कधी कधी आम्हाला अलगद मिळायचे. डुक्करे सहज मिळायची नाहीत. ते कानात दडे भरवणारे आवाज करायचे. पण मी असताना काही कधी डुककर मिळाले नाहीत. जर का शिकार झाली तर ती गाडीत टाकून आणली जायची आणि दुसर्‍या दिवशी मग मेजवानी असायची.

गावी बहुतेक लग्ने उन्हाळ्यात होत. सर्वांना असलेल्या सुट्ट्या हे त्यामागचे मूळ कारण होय. लग्नाची वर्‍हाडे ट्रक मधून जात. माझ्या लग्नाला माझे वर्‍हाड सुद्धा ट्रक मधून आले होते. माझ्या सासारच्या मंडळीणने ते बहुदा पहिल्यांदाच लाइव्ह पहिले होते :) जरी ते धोकादायक असले तरी त्यात एक वेगळी मजा होती. लग्न करून परतताना फक्त नवरदेव/ नवरी आणि करवल्या ट्रक च्या कॅबिन मध्ये बसायचे आणि बाकी सगळे मागे. मग तो ट्रक गावपसून थोड्या अलीकडे थांबायचा आणि तिथून वरात वाजत गाजत गावकडे निघायची. बनाठ्या फिरवणे, काठीच्या टोकाना आगी लावून फिरवणे, तोंडात रॉकेल भरून आग काढणे असले चित्तथरारक प्रकार केले जात. मग संपूर्ण गाव लग्नाच्या पंगतीत जेवायचा. गावात लग्न असले तर दुपार संध्याकाळ दोन्ही वेळ. लाउडस्पिकर वरुन 'कृपया जेवल्याशिवाय कोणीही घरी जाऊ नये' अशी अनाउन्स्मेंट केली जायची :) ही गाव जेवणे मात्र मोस्ट्ली गावातील पुरूष बनवत. बर्‍याच दिवसा अगोदर पासून रानातून वडाची पाने खुडुन आणून पत्रावळ्या बनवणे, साखरेच्या पुड्या बांधणे, पताका लावणे असली कामे केली जात. लग्नाच्या दिवशी अंगण शेणाने (हो शेणाने) सारवली जात. खरच मस्त दिसत ती शेणाने सारवलेली अन्गणे. कोणी पाहिली नसतील तर जमल्यास एकदा कोकणात जाऊन जरूर पहा. कसली मजा येई लग्नात. त्या साखरेच्या पुड्या मी किती खाई याचा हिशेबच नसे.

या धामधुमीत मग एक दीड महिना कसा निघून जाई याचा पत्ताच लागत नसे. टीवी नसल्याने काही एक बिघडत नसे. जर का असे भूर्रकन उडून जाणारे दिवस असतील तर टीवी हवाय कोणास. परतीचा प्रवास मात्र कमीत कमी माझ्यासाठी फार depressing असे. परत जाऊच नये असे वाटायचे. परत आल्यावर ते मुंबईतले लहान घर अजुनच लहान वाटायचे. पण जणू काही तो एक दीड महिना वर्षभर तगून राहायची energy देई. आता नोकरीला लागल्यापासून आणि गेली तीन वर्षे अमेरिकेत असल्यामुळे गावी जाणे काही झालेले नाहीय. तसच गावच राहणीमानही थोडे शहराळलय. पण तरीही गावी जायची ओढ ती आहेच. पाहु कधी योग येतो ते :(

2 comments:

Harshal said...

Vaaa ! majja ali...june divas aathavle...atta he sarv anubhavnyasathi gavala ganpatila jaun yetoch !!! :)

Photographer Pappu!!! said...

U r lucky Harshal.. dont know when I ll go next :(