Thursday, July 30, 2009

मराठी माध्यम की English Medium???

अशा विवाद्पूर्ण विषयास हात घातल्याबद्दल अगोदरच माफी मागतो. या पोस्ट मध्ये व्यक्त केलेली मते पूर्णपणे माझीच आहेत आणि कुणाच्याही भाषाविषयक भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नाही.

पाल्याने कुठल्या माध्यमात शिकावे असला प्रश्न जर कुणी विचारला तर माझे उत्तर इंग्रजी माध्यम असे असेल. कमीत कमी माझी मुले (जेव्हा होतील तेव्हा) इंग्रजी माध्यमात (किंवा त्यावेळी जे माध्यम स्ट्रॉंग असेल त्यात) शिकतील. त्यामागे ज्या भाषेत दहावी नंतर पुढील कमीत कमी सहा वर्षे शिक्षण घ्यायचे आहे आणि ज्या भाषेत कदाचित निवृत्त होईपर्यंत काम कारायचे आहे अशा भाषेचा पाया सुरुवातीपासूनच मजबूत करणे हेच थोडक्यात कारण आहे. मान्य आहे की फक्त मराठीत शिकुनही निवृत्त होईपर्यंत मानाने जगता येईल, पण असे पर्याय फारच थोडे आहेत किंवा मला माहीत नाहीत. पण इंग्रजी भाषेत मराठी भाषेपेक्षा व्यावसायिक दृष्ट्या जास्त ज्ञान् आहे याबाबत कुणाचेही फारसे दुमत असण्याचे कारण नाही. त्यामुळे हे ज्ञान् चांगल्या प्रकारे घेता यावे यासाठी इंग्रजीवर 'चांगले' प्रभुत्व असणे आवश्यक आहे.

बर्‍याचशा मराठी शाळांमध्ये इंग्रजी पाचवी नंतर शिकवायला सुरूवात केली जाते आणि बर्‍याचशा विद्यार्थ्यांसाठी दहावीपार्यंत तो घाबरवणारा विषय राहून जातो. तसेच इंगजी संभाषणावर अगदी नगण्य मेहनत घेतली जाते. परिणामी जेव्हा तोच विद्यार्थी कॉलेज विश्वात प्रवेश करतो तेव्हा तो कुठेतरी तो थोडासा बुजलेला असतो आणि बर्‍याचशा केसेस मध्ये तो आपला आत्मविश्वासही हरवून बसलेला असतो. बरेच विद्यार्थी शेवटपर्यंत हा आत्मविश्वास परत मिळवू शकत नाहीत. कॉलेज मधील पहिली 1-2 वर्षे तर इंग्रजीशी जुळवून घेण्यात जातात. थोडक्यात उदाहरण द्यायचे झाले तर सुरुवातीचे काही दिवस त्रिज्या, परावर्तन, लम्बक, प्रकाश संश्लेषन, षटकोन म्हणजे अनुक्रमे radius, reflection, pendulum, photo synthesis, hexagon असतात हेच मुळी समजत नाही. हे एकदम साधे उदाहरण दिलय. बर काही शंका विचारायची झाल्यास ती इंग्रजीमधून न चुकता विचारता येईल हा विश्वास नसल्याने बर्‍याचशा शंका मनातच राहतात.

बरेच लोक यावर विवाद करताना म्हणतात की आम्ही सुद्धा यातून गेलोय, आम्ही यातून मार्ग काढलाय आणि आज आम्ही यशस्वी आहोत. आम्ही इंग्रजीत अगदी बाप नसू पण इंग्रजीवर चांगल्यापैकी प्रभुत्व आहे. हो मी म्हणतो त्याबद्दल वादच नाही. पण दहावीनंतर आपले बरेचसे एफर्ट्स हे इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यात खर्च होतात. कमीत कमी माझे तरी झालेत. हेच एफर्ट्स आणि खर्ची पडलेला वेळ अधिक चांगल्या प्रकारे वापरता आला असता तर प्रोफेशनल लाइफ मध्ये कदाचित दुणावलेल्या आत्मविश्वासाने वावरता आले असते. तसेच सर्व मराठी माध्यमातील विद्यार्थी हे एफर्ट्स देऊ शकत नाहीत आणि बर्‍याच केसेस मध्ये आपले ग्रॅजुयेशनसुद्धा पूर्ण करू शकत नाहीत. आता इंग्रजी माध्यमातील किती मुले ते पूर्ण करतात हा मुद्दा वेगळा, पण केवळ इंग्रजी संभाषणाच्या जोरावर त्यातली बरीचशी मुले कॉल सेंटर सारख्या क्षेत्रांमध्ये बर्‍यापैकी स्थिरावतात. थोडक्यात इंग्रजी माध्यमातील आणि मराठी माध्यमातील मुलांच्या मार्गाची तुलना खालील प्रमाणे करता येईल.
इंग्रजी माध्यम: शाळेत इंग्रजीत शिकाणे > कॉलेजमध्ये इंग्रजीत शिकाणे > व्यावसायिक जीवनात इंग्रजीचा वापर करत वावरणे.
मराठी माध्यम: शाळेत मराठीत शिकाणे > कॉलेजमध्ये अगोदर इंग्रजीला सरावणे > नंतर कॉलेजमध्ये इंग्रजीत शिकाणे > व्यावसायिक जीवनात इंग्रजीचा वापर करत वावरणे.
मराठी शाळेनंतर इंग्रजी कॉलेज हे स्थित्यंतर इंग्रजी शाळेनंतर इंग्रजी कॉलेज या स्थित्यंतरापेक्षा मोठे आणि अवघड असते (10 पैकी कमीत कमी 8 जणांसाठी ).

इतके करूनही व्यावसायिक जीवनात comfortably वावरता येईल याची प्रत्येकाला शाश्वती नसतेच. उदा. मोठ्या ग्रूप समोर एखादे मोठे प्रेज़ेंटेशन देणे. शाळेत असताना पूर्ण भरलेल्या सभागृहात लोकमान्य टिळाकांविषयी चार शब्द सांगताना माझी कधी
तन्तरली नाही,पण आय टी मध्ये सुरुवातीला एखादे presentation देताना माझी फार फाटायची. इथे मला इतके लोक समोर बसलेत त्याचे टेन्शन नसायचे तर मी इंग्रजीत बोलताना चुकणार तर नाही ना याची भीती असायची.

बरेचसे लोक मराठी माध्यमातील बर्‍याचशा यशस्वी लोकांची उदाहरणे देतात (कदाचित लोक माझेही उदा देत असतील). त्यांच्यामते मराठी भाषा टिकवण्यासाठी मराठीतून शिक्षण घेणे अत्यावश्यक आहे. मी म्हणतो इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेऊन मराठी भाषा का टिकवता येणार नाही? मराठीची गळचेपी होतेय आणि ती लवकरच मान टाकेल अशीही ओरड काही लोक करतायत. अरे अमृततेही पैजा जिंकणारी माझी मराठी अशी कशी मान टाकेल. Survival of the fittest हा काळाचा मंत्र आहे. माझी मराठी जर सशक्त असेल (जी ती आहेच) तर ती टिकणारच. पण जर काळाच्या ओघात ती जर लुप्त झाली तर मला वाईट जरूर वाटेल पण कालाय तत्स्मैएय नमः असे मानून ते ही मी स्विकारेन. ती पाळी येणार नाही याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. माझ्यातर्फे ती टिकवण्यासाठी जे काही करता येईल ते मी करेनच पण ज्या अडचणींचा सामना मला करावा लागला त्या अडचणींचा सामना पुढच्या पिढीला करावा लागणार नाही याचीही काळजी घेईन. मला पूर्ण खात्री आहे की मी माझ्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवूनही मराठीची गोडी लावू शकेन. जर मराठी माध्यमातून शिकूनही इंग्रजीची पातळी इंग्रजी माध्यमाइतकी ठेवणार कोणता पर्याय असेल तर तो मी नक्कीच स्वीकारेन, पण तूर्तास तरी I will support the english medium education..

Tuesday, July 21, 2009

कप्प्यातल्या आठवणी....

दर आठवड्याला स्तंभलेखन करणार्‍यांना विषय तरी कसे सुचतात देव जाणे. इकडे मला विषय सुचत नव्हते म्हणून इतके दिवस काही लिहिले नव्हते. पण आज ऑफीस मधे करायला अगदीच काही नव्हते. माशा माराव्या म्हटल्या तर माशाही नव्हत्या (हे गोरे लोक जरा जास्तच स्वच्छता ठेवतात बाबा). मग विचार केला की ब्लॉगवारच काही का खरडू नये? शेवटी दुसर्‍या कुठल्या प्रवीण ने शिव्या देऊ नयेत म्हणून ही URL जिवंत ठेवण्याच वचन दिलाय मी माझ्या पहिल्या पोस्ट मधे:) काही आठवणी मनात घर करून रहातात. कधीतरी काहीतरी कारण असते म्हणून तर कधीतरी विनाकारण. या अशाच काही आठवणी आहेत.

कॉलेज संपल्यावर माझी विप्रो कंपनी तर्फे बंगलोर मधे WASE नावाच्या प्रोग्रॅम साठी निवड झाली. सोमवार ते शुक्रवार पूर्ण वेळ काम आणि शनिवारी दिवसभर M.S. in Software Engineering चे लेक्चर्स असे त्याचे स्वरूप होते. ही डिग्री आम्हाला BITS Pilani, Rajasthan तर्फे देण्यात येणार होती. मुंबईहून आम्ही 7 मुले आणि 11 सुंदर मुली असे 18 जण बंगलोर ला पोचलो. तिथे कळले की याच प्रोग्रॅम साठी चेन्नई आणि हैदराबादहून सुद्धा काही जणांची निवड झाली होती. त्यापैकी मुंबई आणि चेन्नईच्या मुलांना दुसर्‍याच दिवशी पहिल्या सत्रासाठी राजस्थानला जाण्यास सांगण्यात आले. उरलेल्या चेन्नई, मुंबई, हैदराबादच्या मुली आणि हैदराबादची मुले यांचे पहिले सत्र बंगलोर मध्येच घ्यायचे ठरले.. जवळपास 70 मुली आणि 30 मुले. म्हणजे आम्ही 47 मुले त्या राजस्थानच्या गरमीत करपणार आणि हे हैदराबादचे नवाब बेटे 1:2 पेक्षा जास्त च्या ratio ने बंगलोरच्या आल्हाददायी वातावरणात अभ्यास (??) करणार. आम्हा सगळ्यांचा असला जळफळात झाला होता म्हणून सांगू. नशीबच XX त्याला काय करणार पांडू (XX = झन्डू, तुम्हाला काय वाटल? ). कंपनीने आमची ग्रँड ट्रंक एक्सप्रेस ची तिकिटे काढली होती पण त्यातली निम्म्याहून अधिक waitlisted/RAC होती आणि सीट नंबर A1 ते A12 बोग्यामधे विखुरलेले होते. ग्रँड ट्रंक एक्सप्रेस आम्हाला चेन्नईला जाऊन पकडायची होती. आमच्यासोबत विप्रो चा एक प्रतिनिधी चेन्नई पर्यंत येणार होता. आमची जवळपास 10-15 तिकिटे त्याच्याकडे होती. आम्ही 47 जण त्याच दिवशी प्रथमच एकमेकांना भेटलो होतो त्यामुळे एकमेकांची नावे सोडाच चेहरे सुद्धा नीट ओळखीचे नव्हते. सीट नंबर विखुरलेले असल्याने आम्ही 4-5 जणांचे ग्रुप बनवून प्रत्येक बोगी समोर उभे होतो. ट्रेन येताच सगळे आत घुसलो. या घाई गडबडीत त्या प्रतिनिधिकडून तिकिटे घ्यायची राहूनच गेली. नशिबाने एकजवळ त्या तिकिटांची xerox होती. त्याच्या आधारे आम्ही कसे तरी अड्जस्ट झालो. तिकीट चेकर आल्यावरच मोठा प्रॉब्लेम होणार होता. सर्व तिकिटे आणि xerox ग्रुपमधल्या एका 4-5 जणांच्या चमुकडे सोपवली आणि सांभाळून घेण्यास सांगितले. रात्री 2:30 च्या सुमारास तपासनीस आला. तो तिकिटवरच्या प्रत्येक नावासाठी ओळखपत्र मागू लागला. काही नावांची स्पेलिंग सरळ सरळ चुकली होती ते आम्हाला गाडीत चढतानाच लक्षात आले होते. त्यासाठी कुठल्याही ओळखपत्राची गरज नव्हती. पंचपकक्वान्नाचे ताट पाहिल्यावर सोमालियाहून आलेल्या माणसाच्या डोळ्यात जी चमक दिसेल तीच चमक आता भरपूर पैसे खायला भेटणार या विचारात खूष असणार्‍या त्या कर्तव्यदक्ष टीसीच्या डोळ्यात होती. त्याने आम्हाला ऑफर दिली की 18000 दंड भरा नाहीतर 5000 मध्ये मांडवली करा. अर्थात आमची काहीच चूक नसल्याने आम्ही दंड भरवयाचे ठरवले. रात्री 3 च्या सुमारास प्रत्येक बोगीत जात आम्ही आमच्या मित्रांना शोधायला सुरूवात केली. प्रत्येकाकडून जवळपास 400 जमा करून आम्ही तो दंड भरला. नंतर तो दंड आम्ही कंपनी कडून वसूल केला ती गोष्ट वेगळी. पण या गडबड गोन्धळात रात्रीच्या झोपेचे पार खोबरे झाले होते. त्यामुळे दिवस वर आला तरी आमच्या पैकी बरेच जण झोपूनच होते. अशाच एका साइड बर्थ वर कुरियन आणि मनोज झोपले होते. भारतीय रेल्वे प्रवासात हमखास त्रास देणारे छक्के या प्रवासालाही अपवाद नव्हते. एका छक्याने कुरियनला उठवून पैसे मागायला सुरवात केली. त्याने सांगितले की साब उपर सो रहे है उनसे पैसा लेलो आणि तो पुन्हा झोपी गेला. त्या छक्क्याने मनोजला उठवून पैसे मागायला सुरवात केली. अर्ध्या झोपेतच त्याने बडबडायला सुरूवात केली.

"मेरे पास कुछ नही है !" - मनोज

" तेरे पास ही सब कुछ है रे मेरे धर्मेंदर, हमारे पास ही कुछ नही है, चल पैसा निकाल " असे म्हणत त्या छक्क्याने मनोजचा नको तो भाग पकडला आणि मनोजची उरली सुरली झोपही उडून गेली. टनकन उडी मारुन मनोज खाली उतरला आणि दुसर्‍या बोगीत त्याच्या मित्रांकडे जाऊन म्हणाला, " यार मुझे कहि छुपा दो, उनको पैसा नही दिया तो ऊन लोगो ने मेरा पकड लिया ". थोड्याच वेळात मनोज 'का' पकड लिया ही चर्चा गावभर (सॉरी ट्रेनभर ) झाली :)

जवळपास दोन दिवसांच्या प्रवासानंतर ती गाडी एकदाची दिल्लीला पोचली. 2 दिवस फक्त ब्रश करून आणि तोंड धुवून काढले होते. दिल्लीहून राजस्थानचा बस प्रवास 6-7 तासांचा आहे. आमच्यासाठी एक बस बुक करण्यात आली होती. दिल्लीची गरमी काय असते त्याचा अनुभव आम्हाला आलाच होता. बस मधे बसताच आमच्यातील बहुतेक सर्वजण टॉपलेस झाले होते. बीट्स पिलानीच्या कॅंपस मधील शंकर-भवन हॉस्टेल मधे आम्हाला ठेवण्यात आले होते. आम्हाला वाटले होते की कुठेतरी वाळवंट बघायला मिळेल म्हणून, पण पिलानीचा कॅंपस एकदम हिरवागार होता. जाताच आमच्या दृष्टीला दोन मोर पडले. कॅमरा काढेपर्यंत ते पसार झाले होते. नंतर कळले की या कॅंपस मधे कुत्रे कमी आणि मोर जास्त आहेत.
दुसर्‍याच दिवसापासून आमचे सत्र सुरू झाले. सकाळी आठ ते संध्याकाळी सहा लेक्चर. सहा ते आठ assignments आणि रात्री 9 ते 1 कंप्यूटर रूम. आम्ही 6 महिन्यांचा कोर्स 1 महिन्यात पूर्ण केला.

Assignments करता करता एकमेकांची चांगली ओळख झाली. आमच्यात एक रामारत्नाम म्हणून एक मुलगा होता. तो मोडक्या तोडक्या हिंदीत बोलायचा. असेच एक दिवस अजित नावाच्या मित्राच्या खोलीत आम्ही गप्पा मारत बसलो होतो. अजितकडे कसलीशी बिस्किट होती. ती त्याने आम्हाला दिली. ती खाऊन संपता संपता हा राम खोलीत आला. त्याच्या तोडक्या हिंदीत विचारू लागला के ये तुम लोग क्या खाता है. आम्ही सांगितले की अजितने बिस्किट दिया वो खा रहे है. त्यावर तो अजितला म्हणाला की क्या रे तू अकेला अकेला खाता है, मेरेको नही दिया. अजित मस्करीत म्हणाला की अब तो खतम हो गया है अब डायरेक्ट सुबह मिलेगा. त्या रामला सुबह मिलेगाचा अर्थच कळला नाही :) तो म्हणाला सुबह पक्का देगा ना?? दुसर्‍या दिवशी संध्याकाळी तो धावत आला आणि अजीतच्या पार्श्वभागावर लाथ मारत म्हणाला, " क्या रे तू सुबह बिस्किट देने वाला था, अभी तक नही दिया." त्यावर अजित म्हणाला, " तूने तो फॅक्टरी पे लाथ मारा है, अब तुझे बिस्किट नही मिलेगा" त्याला कुठली फॅक्टरी आणि बिस्किट कुठल्या रूपात मिळणार होते याचा आजतागायत उलगडा झाला नसेल :)

चला तर हा पोस्ट फारच लांबत चाललाय. तुम्हाला कंटाळा येण्याअगोदर आवरते घेतो. अगोदरच कंटाळा आला असेल तर माफ करा :).. पुन्हा भेटू.. असेच.... कधीतरी...