Sunday, October 25, 2009

पवनचक्की

फ्रीमाँटहून लॉस अँजेलीस ला जाताना ५८० मुक्त मार्गाजवळ शेकडोंनी पवनचक्क्या पाहिल्या होत्या. तेव्हा निघायला उशीर झाला होता म्हणून तेव्हा न थांबता पुन्हा कधीतरी यांचे फोटो काढू असा विचार केला होता. तो योग काही गेल्य २.५ वर्षात आला नव्हता. गेल्या शुक्रवारी अचानक ते आठवलं अन दुसर्‍या दिवशी पहाटे निघायचा बेत केला.

शनिवारी भल्या पहाटे ५:३० ला उठून घोडं (म्हणजे गाडी) तिकडे दामटवली. ही पहा पहाटे ६:१५ ते ८:३० च्या दरम्यान काढलेली छायाचित्रे. कशी वाटली ते जरूर कळवा.




Thursday, October 22, 2009

आमची पण दिवाळी



गेल्या ११ वर्षात केवळ दोन वेळा घरच्या लोकांबरोबर दिवाळी साजरी करता आली. या वर्षी देखील तो योग नव्हता, पण मन स्वस्थ बसू देत नव्हते. पूजा विधी कसे करायचे ते नीट्सं ठाऊक नव्हतं. पण तरी ठरवलं, तोडकी मोडकी का होईना या वर्षी दिवाळी साजरी करायचीच. गेली दोन वर्षे फ़राळ विकत आणून खाल्ला होता. या वर्षी सौ ना बेसन चे लाडू बनवायची हुक्की आली, पण अगदी दिवाळीच्या दिवसापर्यंत काही ते शक्य झालं नव्हतं. शेवटी आदल्या दिवशी सामान आणून घराची आवराआवर करेस्तोवर रात्रीचे दोन वाजले.



भल्या पहाटे चार ला उठून अंघोळी उरकल्या. सकाळी मित्रमैत्रिणी घरी आले. मग त्यांच्या हातून विकत आणलेल्या पणत्यांवर नक्षीकाम केलं गेलं. तोवर दुपार उलटून गेली होती. आदल्या रात्री दोन तासाचीच झोप झाल्याने दुपारी सर्वांनाच झोप अनावर झाली. मग जी ताणून दिली ते थेट पाच वाजताच उठलो. मग बेसन चे लाडू बनवण्याचे ठरले. ते कसे बनवावे याचा अनुभव आजच्या आधुनिक नाऱ्यांपैकी कुणाकडेच नसल्याने अगोदर थोडेच लाडू बनवायचे ठरले, अन चांगले झाले तर सेकंड बॅच करायची ठरली. पण पहिल्याच बॅचला ३ तास लागले अन लाडू बनले अवघे ८. मग दुसऱ्या बॅचचा नाद सोडून दिला. नशीबाने प्रत्येकाच्या दाताला प्रत्येकी एक लाडू लाभला. त्याचे क्लोज अप फोटो काढेपर्यंत ते संपले देखील होते. जास्त लिहीत बसत नाही. पहा या दिवाळीत काढलेले काही फोटो.




Tuesday, October 13, 2009

ह्यांचा हसवण्याचा धंदा!!!

"क्या लग रहा है आपको राज ठाकरे कि बॉडी लॅंग्वेज को देखके..?" एक दाढीवाला स्टार न्यूज चा anchor सुटाबुटात त्याच्या संवाददात्याला प्रश्न विचारत होता. त्याची दाढी ही ’चैन से सोना है तो जाग जाओSSS’ असे ओरडणाऱ्या anchor पेक्षा शंभर एक ग्रॅमने कमी होती. बहुतेक विधानसभा निवडणूकीचं थेट प्रक्षेपण करायची जबाबदारी आपल्यावर येणार याची कल्पना असल्यामुळे महिन्याभरापूर्वी दाढी बनवून सूटबूट नीटनेटका बनून आला असावा. पण माकडाने वाघाची कातडी पांघरली तरी शेवटी माकड ते माकडच.

राज यांना मतदान झाल्यावर बहुतेक नव्यानच पत्रकार एका झालेल्या चिमणीनं प्रश्न विचारला होता कि या निवडणूकीत मनसे काही नवनिर्माण करू शकेल का अन त्याला राज यांनी २२ तारखेला सांगतो असं उत्तर दिलं होतं. तेच पकडून हा आपल्या संवाददात्याला प्रश्न विचारत होता.

" क्या लग रहा है आपको राज ठाकरे कि बॉडी लॅन्ग्वेज देखते हुए?"
"राज ठाकरे मे आत्मविश्वास की कमी नजर आ रही है. जो आक्रमकता उन्होने प्रचार करते समय दिखाई थी वो कही भी नजर नही आ रही है " - संवाददाता (त्याची दाढी होती की नाही ते दिसलं नाही).
" बिल्कुल बिल्कुल. मुझे भी उनमे आत्मविश्वास की कमी नजर आयी. शायद २२ तारिख को उनमे बात करने का भी आत्मविश्वास ना रहे" - तोच दाढीवाला.

अरे तुमचा पगार किती तुम्ही बोलता किती? ’२२ ऑक्टोबरला सांगतो’ या तीन शब्दात तुम्हाला कळलं की राज ठाकरे मध्ये आक्रमकतेचा अभाव आहे? वा रे वा, बहुतेक स्त्रियांचं अंतर्मन ओळखण्याचं ब्रम्हदेवालाही न जमलेलं काम हा दाढीवाला अन त्याचा तो संवाददाता सहज पार पाडू शकतील (फक्त प्रश्न हा आहे की यांच्या जवळपास फिरकायला किती स्त्रिया तयार होतील).

२४ तास लाफ्टर चॅलेंज चालू असलेलं एकमेव न्यूज चॅनेल म्हणजे स्टार न्यूज. अगदी आजतक ही त्याला स्पर्धा देऊ शकत नाही. त्यांची presentation ची style अफलातून आहे, म्हणजे एका छोट्या विंडो मध्ये चित्रे दाखवायची अन बाजूला मोठ्ठ्या फॉण्ट मध्ये न्यूज(?) लिहायची अन घसा सुकेपर्यंत रेकून तीच वाचून दाखवायची. म्हणजे सचिन तेंडुलकर चा फोटो दाखवून बाजूला ’क्या सचिन सेकंड इनिंग मे दबाव मे आकर खेलते है?’ अस ६५ साईज च्या फॉन्ट मध्ये लिहायचं अन तेच वाचून दाखवायचं. त्यांची वाचून दाखवायची style इथे जशीच्या जशी दाखवता येणार नाही :( ह.ह.ग.लो. (’तो’ अर्थ घेऊ नका) असेल तर एकदा त्यांची न्यूज पाहाच, खास करून वाह क्रिकेट. आई शप्पथ सांगतो, सचिन ने जर का त्यांची न्यूज पाहिली तर उद्या रिटायर्ड होईल, मरू दे तो २०११ चा वर्ल्ड कप.

मी शक्यतोवर हे चॅनेल लावत नाही. डोकं जड झालं असेल तर घडीभर हसण्यासाठी म्हणून हे चॅनेल लावतो. कालही तसच झालं. बायको 'Notting Hill' हा रोमॅन्टिक चित्रपट बघत होती. इंग्रजी रोमॅन्टिक चित्रपट आणि मी म्हणजे ३६ चा आकडा. तशीच वेळ आली तर मी चंद्रचूड सिंग आणि किशन कुमार चे चित्रपट आनंदाने पाहिन. (किशन कुमार कोण?? आठवा बेवफा सनम मधला सोनू निगमच्या आवाजातील ’आज ही हमने बदले है कपडे आज ही हम नहाये हुए है’ वर नाचणारा ठोकळा). तसाच तो Notting Hill माझ्या डोक्यात जाऊन माझा मेंदू कुरतडत होता. त्या सिनेमातील एकमेव आवडलेली गोष्ट म्हणजे त्यातलं You say it best when you say nothing at all’ हे गाणं. किती मस्त शब्दात प्रियकर आपल्या प्रेयसीला सांगतो कि अगं बये, तू खूप म्हणजे खूप बडबड करतेस, आत्ता तरी गप्प बस’ :) असो, विषयांतर होतय. तर तो सिनेमा पाहून जड झालेलं डोकं हलकं करण्यासाठी टीवी वर काही आहे की नाही ते पाहताना हे संवाद कानी पडले. राज यांनी विचारलेल्या प्रश्नांना अत्यंत शांतपणे उत्तरं दिली अन हा दाढीवाला नको त्या कल्पनांचा किस पाडत होता. आधी त्या दाढीचा किस पाड म्हणावं म्हणजे कमीत कमी त्याची स्वत:ची बायको (असली तर)गालावर किस घेण्याचा प्रयत्न करेल.

अजून एक केलेलं observation म्हणजे अमेरिकेत दाखवण्यात येणाऱ्या झी चॅनेलवरच्या रात्री ११:३० ला दाखवण्यात येणाऱ्या पंजाबी बातम्या. त्यात बातम्यांच्या दरम्यान दाखवण्यात येणाऱ्या चलतचित्रात फोकस हा फक्त सरदार लोकांवर करण्यात येतो, मग तो सरदार कुठल्या कोपऱ्यात लपलेला का असेना. विश्वास नसेल तर बघाच आजच्या बातम्या :) मुंबईत लोकल मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातही त्यांनी स्फोटावर कॅमेरा केंद्रित न करता एका सरदार असलेल्या पोलिसांवर केला होता.

हल्ली इकडे बे एरिया मध्ये ११७० वर एक २४ तास देसी रेडिओ स्टेशन सुरू झालेलं आहे. शुद्धलेखनाच्या नावाने खडे फोडणाऱ्यांनी कधी वेळ मिळाल्यास ते ऐकावं. हिंदी आणि इंग्रजी व्याकरणात जितके काळ, क्रियापद, कर्म, कर्ता, एकवचन, अनेकवचन वा जितकं काही आहे त्यांच्या माताभगिनींना एकत्र करून तयार झालेली भाषा म्हणजे या स्टेशनवरच्या निवेदकांची भाषा. ते निवेदक / निवेदिका समोर आल्यावर त्यांचा खून करावासा नाही वाटला तर नाव बदलून ठेवीन.

चला, यावर लिहू तितकं कमीच होईल. आवरतं घेतो. स्टार न्यूज तुमचं आवडीचं चॅनेल असेल अथवा Notting hill तुमचा आवडता सिनेमा असेल वा ११७० वर केलेली टिपण्णी तुम्हाला न आवडून तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मला काही एक फरक पडत नाहीय :) कृपया निषेध नोंदवण्याचा प्रयत्न करू नये, अपमान होईल ;)

Friday, October 9, 2009

काटकसर की उधळपटटी??

बरेच दिवस या विषयावर लिहायचा विचार होता, पण या ना त्या कारणाने ते राहून जात होतं. काही दिवसांपूर्वी भारताची चांद्रयान मोहिम अकाली संपृष्टात आली, परंतु जाता जाता चंद्रावर पाणी असल्याचे संकेत या मोहिमेतून मिळाले आहेत. सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद अशी ही गोष्ट आहे. पण.......

......पण याची दुसरी बाजू म्हणजे अशा मोहिमांवर खर्च होणारा वेळ आणि त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावर खर्च होणारा पैसा. अशा एका मोहिमेसाठी अब्जावधी डॉलर्सहून अधिक खर्च येतो म्हणे. रुपयांत हा खर्च मोजायचा झाला तर एकावर किती शून्य पडतील याचा विचारच माझ्या मेंदूला झेपत नाहीय. बरं केवळ या मोहिमेपुरतं बोलायचं झालं तर इतक खर्च करुन महत्वाचा निष्कर्ष काय तर चंद्रावर पाणी आहे याचे संकेत. असेल खरचं पाणी तर आपण काय चंद्रावर राहायला जाणार आहोत की चंद्रावरचं पाणी पृथ्वीवर आणून विहार तलावात ओतणार आहोत? आणि खरचं तसं करायचं ठरवलं तर अंटार्क्टिकेला जो पाण्याचा जवळपास अमर्याद साठा आहे तो आणून ओतणं जास्त स्वस्त पडणार नाही का?

कुठल्याही व्यवसायात मनुष्य रिटर्न ऑन इन्वेस्ट्मेंट (ROI) चा विचार केल्याशिवाय शक्यतोवर पडत नाही. फार कशाला, रुपयाला घेतलेली मेथीची जुडी दिड रुपयाने विकली जावी हा विचार रस्त्यावर भाजी विकणाऱ्या मावशी करतात. पण या अवकाश मोहिमांचे ROI कुणालाच नक्की माहीत नसते. म्हणजे इन्वेस्ट्मेंट अब्जावधी डॉलर्स आणि ROI काय तर चंद्रावर पाण्याचे संकेत आणि इतर संशोधनयोग्य माहिती? बरं हे अब्जावधी डॉलर्स येतात कुठून. सरकारच्या तिजोरीत डॉलर्स ठेवायला जागा नाही म्हणून सरकार अशा मोहिमांवर ते उधळताहेत अशातलाही काही भाग नाहीय. तुमच्या आमच्या सारख्यांचे टॅक्स चे पैसे अन बहुतेक कधीही न फेडता येणारं जागतिक बॅंकेकडचं कर्ज या पैशांवर या मोहिमा चालवल्या जात आहेत.

अशा मोहिमांमधून काढण्यात येणारे निष्कर्ष हाही एक संशोधनाचा विषय आहे. सर्व राष्ट्रांनी इतकी वर्षे केलेल्या अवकाश संशोधनानंतरही आज आपण येत्या काही दिवसांचे हवामान नक्की वर्तवू शकत नाही. आजही आपण येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडेल असे न म्हणता मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असे म्हणतो. गेली ३ वर्षे मी अमेरिकेची weather.com follow करतोय. त्यातही ते बऱ्याचदा चुकतात. चला एखादे वेळेस हवामानाच्या संशोधनासाठी अशा मोहिमांवर खर्च करणे मान्यही करू पण यांच्या संशोधनाचे विषय तर पहा, म्हणजे मंगळावर जीवसृष्टी आहे की नाही, पृथ्वी सारखा दुसरा ग्रह आहे का, aliens आहेत की नाही, दुसऱ्या ग्रहांवर खनिजांचा साठा आहे की नाही. असल्या नसत्या चांभार चौकशांसाठी खरच अब्जावधी डॉलर्स उधळणं योग्य आहे का? मंगळावर जीवसृष्टी असेल तर काय त्यांच्याबरोबर फोन-फोन खेळायचय की पृथ्वी सारखा ग्रह सापडला म्हणून लगेचच तिकडे राहायला जायचं? डिस्कवरी वर एकदा दाखवत होते की इकडचे संशोधनकर्ते गेली कित्येक वर्षे aliens साठी रोज येडचाप सारखे सांकेतिक संदेश पाठवताहेत पण आजपर्यंत एकही alien ने उत्तर पाठवले नाहीय. अरे असतील aliens तर त्यांना त्यांच्या ग्रहावर सुखाने जगू द्या की. इकडे बोलवून काय टी-२० च्या मॅचेस घ्यायच्या आहेत त्यांच्याबरोबर? या पैशाचा आहे त्या पृथ्वीवर नंदनवन फुलवण्यासाठी वापर करता येणार नाही का?

एक वेळ अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांनी अशा मोहिमा राबवण्यात काही गैर नाही. एक तर या मंदीच्या काळातही ते इतरांपेक्षा जास्त श्रीमंत आहेत आणि महत्वाचे म्हणजे त्यांच्या देशात उपाशी आणि बेघर नागरिकांचे प्रमाण अगदी नगण्य आहे. नागरी सुविधा मुबलक आहेत. पण भारतासारख्या देशाने अशी उधळपटटी करणं कितपत योग्य आहे. त्या पैशांतून भारताला अगोदर ’प्रगतीशील’ अवस्थेतून ’प्रगत’ अवस्थेत नेणे शक्य होणार नाही का? एका चांद्रमोहिमेच्या खर्चात माझ्यामते शेकडो गावे सहज वसवता येऊ शकतील. जास्त नाही, फक्त अगदी मूलभूत गरजा; अन्न, वस्त्र आणि निवारा. एकदा का सामान्यातल्या सामान्य माणसाला दोन वेळचं जेवण, राहायला निवारा अन ल्यायला कपडे मिळाले की मग विचार नाही का करता येणार अशा मोहिमांचा?

फार दूर कशाला? अरबी समुद्रात शिवरायांचा ४०० करोड रुपये खर्च करून statue of liberty हून उंच पुतळा बसवण्यात येणार आहे. तसा तो गेल्या विधानसभा निवडणूकीपासून बसवण्यात येतोय आणि बहुतेक पुढच्याही निवडणूकीत बसवण्यात येइल, फक्त त्याचा खर्च कागदोपत्री १००० कोटींवर गेलेला असेल. तर सांगायचा मुद्दा असा की त्या करोडो रुपयांत हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही का?

अशा अनेक गोष्टी आहेत ज्यात काटकसर करता येऊ शकते. एका मित्राशी चर्चा करताना तो म्हणाला होता की तू कुठे काटकसरीनं जगतोयस तुझं जीवन, घेतलास की लाखभर घालून एक SLR. मी नाही म्हणत नाहीय पण मी काही सरकारचा पैसा खर्च करत नाहीय. तो पैसा मी कष्ट करून कमावला आहे आणि मला पूर्ण अधिकार आहे तो खर्च करण्याचा. पण जेव्हा हजारो law abiding citizens पोटाला चिमटा काढून टॅक्स भरतात तेव्हा तो नीट वापरला जावा अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे?

मला कल्पना आहे की हा लेख लिहून परिस्थितीत काही फरक पडणार नाहीय. अवकाशयाने तशीच उडत राहतील अन भविष्यात कधीतरी शिवाजी महाराज अरबी समुद्रात घोडयावर स्वार होतील, पण मनातील घुसमट कमी व्हायला याचा नक्कीच उपयोग होईल :)