Friday, November 20, 2009

अल्केमिस्ट्री

राजू परूळेकर याने सचिनबद्दल लिहिलेल्या अल्केमिस्ट्री मधील सचिनचा उल्लेख मला योग्य वाटला नाही, त्याबद्दल त्याला मी एक इ-पत्र लिहिले. तेच इ-पत्र जसेच्या तसे.


राजू परुळेकर यास,

तुझी सचिन बद्दलची अल्केमिस्ट्री वाचली. माझ्या छोट्या मेंदूला तुला त्यात नक्की काय म्हणायचय ते झेपलं नाही. मला समजलेलं थोडक्यात सांगतो, १. तुला सचिनबद्दल कसल्याही भावना (आदर, प्रेम, तिरस्कार वगैरे) नाहीत. २ सचिनने कितीही धावा केल्यात तरी भारताचे महत्वाचे प्रश्न ( उदा. शेतकरी आत्म्हत्या) सुटणार नाहीत. ३. हिम्मतरावांसारखे लोक जे मानवजमाती साठी उपयुक्त काम करतात त्याबद्द्ल लोकांना माहितीही नसते. ४. मराठीतल्या अनेक प्रतिष्ठित लोकांनी त्याच्या वीस वर्षाच्या कारकिर्दीबद्दल भरभरून लिहिलं आहे ते दुसरं तिसरं काही नसून वैचारिक दिवाळखोरी आहे. ५. सचिनने केलेलं मुंबई सर्वांची हे विधान त्याच्याकडून केलं जायला नको होतं.

सर्वात महत्वाचं म्हणजे पहिला आणि पाचवा मुद्दा वगळता बाकिच्या साऱ्या मुद्द्यांसाठी सचिनला या लेखात आणण्याची खरचं काही गरज नव्ह्ती. पहिला मुद्दा तुझा तुझ्यापाशी राहिला असता तरी चाललं असतं (जसं तुझ्या मते प्रतिष्ठित लोकांनी सचिनच्या वीस वर्षाच्या कारकिर्दीबद्दल जे भरभरून लिहिलं ते नाही लिहिलं तरी चाललं असतं). पाचव्या मुद्द्याबद्दल मी शेवटी बोलतो.

मला कळत नाही की सचिनचा क्रिकेट खेळण्याचा आणि महाराष्ट्रातील समस्यांचा संबंधच काय? त्यातल्या त्यात तुमच्या पत्रकारितेचा आणि महाराष्ट्रातील समस्यांचा थोडाफार तरी संबंध आहे, म्हणून तू तुझ्या दोन वेळच्या जेवणाऐवजी एकच वेळ जेवण घेऊन एक वेळचे जेवण उपाशीपोटी लोकांसाठी दान करतोस असे काही ऐकिवात नाही (खरंच करत असशील तर गोष्ट वेगळी). या मुद्यासाठी सचिनला लेखात गोवणं नक्कीच योग्य नव्हे.

दुसरा मुद्दा हिम्मत राव आणि इस्रो चे संशोधक यांच्याबद्दल सामान्यांना जास्त माहिती नसते. आमटे, बंग यासारखे लोकांच्या कारकिर्दी माध्यमांनी सेलिब्रेट केल्या नाहीत. यात सचिनची काही चूक आहे असं मला वाटत नाही. बरं हा ही मुद्दा सचिनला न आणता मांडता आला असता. जे विकतं ते पिकतं हा नियम तुझ्यासारख्या पत्रकाराला नक्कीच माहित असेल. म्हणूनच तर तू हे मुद्दे मांडायला सचिन सोडून इतर कोणालाही घेतलं नाहीस असं माझं प्रामाणिक मत आहे. हे मुद्दे बॉलिवूडच्या कोणत्याही अभिनेत्याला घेऊनही तू मांडू शकला असतास. एका गोष्टीची नोंद घ्यावी, तू उल्लेख केलेल्या अनसंग हिरोंबद्दल मलाही अतीव आदर आहे.

सचिन च्या २० वर्षाच्या कारकिर्दीबद्दल अनेक प्रतिष्ठीत लोकांनी त्याच्या बद्दलच्या आठवणी सांगितल्या ज्या तुझ्या मते वैचारिक दिवाळखोऱ्या आहेत (का ते समजले नाही). आमटे वा तत्सम लोकांवर लिहून आलेल्या लेखांना, त्यांच्याविषयीच्या आठवणींना कुणी वैचारिक दिवाळखोरी म्हणत नाही, कारण ते त्यांच्या क्षेत्रात सर्वोत्तम आहेत. त्याच प्रमाणे सचिन त्याच्या क्षेत्रात सर्वोत्तम आहे. त्यामुळे त्याच्या बद्दलच्या मतांना वैचारिक दिवाळखोरी म्हणण्याचं वास्तविक पाहता काहीच कारण नाहीय. बरं तू क्रिकेटचा पंडीत असतास आणि मग सचिनबद्दलच्या लेखांचा असा उल्लेख असतास तरी गोष्ट वेगळी होती, पण तुझ्या म्हणण्याप्रमाणे क्रिकेट मध्ये तुला रस नाही. त्यामुळे हे लेख कदाचित तुला दिवाळखोरी वाटले असतील. त्यामुळे मला नाही वाटत कि सचिनचा उल्लेख इथेही फिट बसतो.दुसरी गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे टी.व्ही. वरील एखादा कार्यक्रम पाहायचा नसेल तर रिमोटने चॅनेल बदलता येतं त्याचप्रमाणे एखादी बातमी वाचायची नसली तर सोडून देता येते की? पण तू त्या सर्व आठवणी (उर्फ तुझ्या मते वैचारिक दिवाळखोऱ्या) वाचल्यास. सोडून का दिल्या नाहीस? बरं तुझ्या मते सचिनच्या बद्दल जे लिहून आलंय त्यामुळे मानवजातीला कोणतही वरदान प्राप्त झालं नाहीय. अगदी खरी गोष्ट, पण त्याने काही वरदान प्राप्त व्हावे अशी कोणाची अपेक्षाही नाही. पुढच्या वर्षी तुझ्या कारकिर्दीला वीस वर्षे पूर्ण होतायत. माझ्यामते तू पत्रकार असल्याने कुठेतरी ते लिहून येईल (अर्थात सचिन च्या बद्दल लिहून आलंय तितकं नाही), त्यामुळेही मानवजातीला काही वरदान प्राप्त होईल असं काही वाटत नाही. मानवजातीला वरदान प्राप्त करून देण्याची क्षेत्रे वेगळी आहेत. उदा. अवकाश संशोधन, भारताने ३८४ करोड खर्चून चंद्रावर पाणी असण्याच्या (फक्त) संभावनेचा शोध लावला. त्याचाही बराच बोलबाला झाला, पण त्याने मानवजातीला काय मिळालं? पुढेमागे चंद्रावरून एखादी पाईपलाईन टाकून ते पाणी इथे आणूही कदाचित, पण आजच्या घडीला तरी ते संशोधन काही फायद्याचं नाही. त्याबद्दल लिहून जर का तू मानवजातीला कोणतं वरदान प्राप्त झाला हा प्रश्न विचारला असतास तर ते समजण्यासारखं होतं. जर का सचिनबद्दल मिडियामध्ये लिहिण्या-बोलण्याने मानवजातीला कोणतेही वरदान प्राप्त होत नसेल तर बहुतेक तुझ्या मताप्रमाणे कोणत्याही ’सिंथेटिक’ गोष्टींना कोणत्याही प्रकारच्या मिडियामध्ये स्थानच मिळायला नको कारण कोणत्याही सिंथेटिक(अनैसर्गिक) गोष्टीमुळे मानवजातीला कधीच वरदान मिळणार नाहीय. जरा विचार करून बघ कि असं करणं कितपत शक्य आहे ते.

तुझ्या लेखातले इतर छोटे-मोठे मुद्देही वरील मुद्द्यांप्रमाणे सचिनला न आणता मांडता आले असते. राहता राहिला मी उल्लेखला पाचवा मुद्दा. सचिनने म्हटले कि मुंबई सर्वांची. ही लोकशाही आहे आणि प्रत्येकाला त्याचं मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. बरं त्याच्या स्टेटमेंट मध्ये चुकीचं काहीचं नाही, असलीच तर राष्ट्रीय एकता आहे. तुझ्या मताप्रमाणे त्याने क्रिकेटची खेळपटटी सोडून राजकीय खेळपटटीवर खेळायला नको होतं, त्यासाठी तू ते काय ते स्वादूपिंडाच्या ऑपरेशनचे उदाहरणही दिलंयस. अगदी बरोबर जेणू काम तेणू ठाय, बिजा करे गोता खायं, पण एक गोष्ट लक्षात घे, सचिनने स्वत: प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे स्टेटमेंट दिलेलं नाहीय. तुझ्यासारख्याचं कुणातरी पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना हे उदगार आलेले आहेत. आता त्या पत्रकाराला एखाद्या खेळाडूला राजकारणासंबधी प्रश्न विचारायची काही गरज होती का? खेळाडूला खेळासंबंधीचे प्रश्न विचारावेत असा पत्रकारिकेत रूल नाहीय का? तुझ्याच भाषेत सांगायचे झाले तर पत्रकारिता सोडून तो पत्रकार ऑपरेशन करत होता. स्वादूपिंडाच्या ऑपरेशनची सुरुवात कुणी केली असेल तर ती त्या पत्रकाराने, सचिनने नव्हे.

तू सचिन आणि गांगुलीची देखील तुलना केली आहेस. गांगुली बंगाली पत्रकारांना धरून राहतो, तर सचिन नाही. कुणाचे पॉलिटिकल व्ह्यूज काय असावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न नाही का? अन मला वाटतं की जोपर्यंत ते समाजाला कोणती हानी पोहोचवत नाहीत तो वर त्यांच्यावर टीका करणं योग्य नव्हे.

थोडक्यात तू तुझ्या लेखामध्ये सचिनचा उल्लेख न करता तुझे मुद्दे मांडले असतेस तर त्यांना मी आक्षेप घेतला नसता. माझा तुझ्या मुद्द्यांना अजूनही आक्षेप नाहीय, ते त्यांच्या जागी एकदम बरोबर आहेत. माझा आक्षेप आहे तो सचिनला विनाकारण या लेखात गोवण्याचा.

माझा तुझ्यावर वैयक्तिक आक्षेप नाहीय (लिहायची गरज नाहीय तरीही). तुझ्या लेखातला सचिनचा उल्लेख मला पटला नाही, म्हणून हा पत्रप्रपंच. वाटल्यास उत्तर दे, वाटल्यास नको देऊस.

प्रवीण

Saturday, November 14, 2009

सचिन रमेश तेंडुलकर

२० वर्षे एक असामान्य व्यक्तिमत्व पहिल्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून विसाव्या वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत* एकच गोष्ट करत आलाय पण तरीसुद्धा आपल्याला जराही कंटाळा आला नाहीय किंबहुना हेच तो येती काही वर्षे करत राहो हिच मनोमन प्रार्थना करतोय यातच त्या व्यक्तिचं मोठेपण सामावलय. एव्हाना वरचा * म्हणजे Conditions Apply नसून नाबाद चिन्ह आहे अन मी कोणाबद्दल बोलतोय हे ही चाणाक्ष क्रिडाप्रेमींच्या लक्षात आलं असेल.

सचिन रमेश तेंडुलकर. बऱ्याच भारतीयांसाठी क्रिकेटमधील देव आणि इतरांसाठी नंबर वन बॅट्समन. वीस वर्षे सतत खेळून अन करोडो रुपये कमवूनही ज्याच्या डोक्यात हवा गेली नाही असा माणूस. वीस वर्षात ज्याच्या नावाला कुठला वाद नावालाही चिकटला नाही असा तुमचा आमचा सचिन. याबाबत मला इच्छा नसतानाही विनोदचं उदाहरण घ्यावं लागतय. आचरेकर सरांच्या मते विनोद गुणवत्तेत सचिनहून थोडा उजवा होता पण तो यश टिकवू शकला नाही. वीस वर्षे कोणत्याही विवादापासून दूर राहणं हे येऱ्यागबाळ्याचं काम नाही. असे खेळाडू एका हाताच्या बोटावर सोडण्याइतकेच सापडतील.

सचिन तंत्रशुद्ध फलंदाज आहे याबाबत वादच नाही, त्याच बरोबर आक्रमकही आहे. बचाव आणि आक्रमण यांचा सुरेख मिश्रण त्याच्या खेळात पाहायला मिळतं. त्याचे चाहते तर अगणित आहेत पण त्याचबरोबर तो स्वत:साठी खेळतो, दबावाखाली खेळत नाही, तो चांगला finisher नाही असे म्हणणे असणारे देखील अगणित आहेत. त्याचाच एके काळचा सहकारी संजय मांजरेकर यात आघाडीवर आहे.

या लेखाचा हेतू हा हे मुद्दे खोडून काढणं हा आहे. जी लोकं शतकाच्या जवळ आल्यावर एकेरी धावा घेऊन शतक पूर्ण करणे याला स्वार्थीपण म्हणतात त्यांना क्रिकेट कळत नाही असं माझं म्हणणं आहे. भारत सचिन वेगात खेळला तर जिंकला असता पण सचिनने स्वार्थीपणे हळू खेळून आपले शतक/अर्धशतक पूर्ण केलं अशी एकही मॅच दाखवा, दाखवणाऱ्याच्या ढेंगाखालून जायला तयार आहे मी. वीस वर्षांत ८५ हून अधिक स्ट्राईक रेट असलेला फलंदाज स्वार्थी कसा असेल (अन हा स्ट्राईक रेट तेव्हा पासून आहे जेव्हा ५० षटकांत २२०-२३० धावा पुरेशा असत. २५० धावा म्हणजे डोक्यावरून पाणी)

दुसरी गोष्ट म्हणजे तो चांगला finisher नाहीय, हा आरोप. तो ५-६ व्या क्रमांकाचा खेळाडू नाहीय. तो सलामीचा फलंदाज आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक फळीच्या ठराविक जबाबदाऱ्या असतात. ५-६ व्या क्रमांकाच्या खेळाडूवर फ़िनिशेर असण्याची जबाबदारी असते. बरं तो जेव्हा जेव्हा बाद झालाय तेव्हा तेव्हा विजय आवक्याबाहेर नव्हता अन विकेटही हातात होते (आठवा चेन्नई ची कसोटी, परवाची १७५ धावांची खेळी), पण इतर फलंदाजांनी नेहमीच कच खाल्लीय, पण हात धुऊन सगळे सचिनच्याच मागे पडतात.

तो दबावाखाली खेळत नाही या आरोपासाठी हा पुढील लेखाजोखा

सचिनने कमावलेल्या ५४ सामनावीर किताबांपैकी ३१ सामन्यात दुसऱ्यांदा फलंदाजी करताना मिळवली आहेत तर २३ पहिल्यांदा.

त्याव्यतिरिक्त भारत हरलेल्या सामन्यात सचिनची कामगिरी खालीलप्रमाणे

ऑस्ट्रेलियाविरुद्ध
हरलेल्या ४१ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना १ अर्धशतक तर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना ९ अर्धशतके आणि २ शतके

इंग्लंडविरुद्ध
हरलेल्या १५ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना २ अर्धशतक तर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना १ अर्धशतक

न्यूझिलंड विरुद्ध
हरलेल्या १५ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना २ अर्धशतक तर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना १ अर्धशतक

पाकिस्तानविरुद्ध
हरलेल्या ३६ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना ४ अर्धशतके, ३ शतके तर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना ३ अर्धशतके आणि १ शतक. ३ अर्धशतकांपैकी दोनदा ९०+ धावा

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध
हरलेल्या ३३ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना २ अर्धशतक, १ शतक तर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना ३ अर्धशतके. ३ अर्धशतकांपैकी एक्दा ९०+ धावा

श्रीलंकेविरुद्ध
हरलेल्या २९ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना २ अर्धशतके, ३ शतके तर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना ५ अर्धशतके.

वेस्ट इंडिज विरुद्ध
हरलेल्या १५ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना २ अर्धशतके तर १ शतक

झिम्बाब्वेविरुद्ध
हरलेल्या ५ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना १ शतक

थोडक्यात हरलेल्या सामन्यांतही ३८ अर्धशतके आणि १२ शतके ((बांग्लादेश केनियासारख्या देशांची आकडेवारी धरलेली नाही). मग हा मांजरेकर आणि तत्सम टीकाकार कसे म्हणू शकतात की सचिन दडपणाखाली खेळत नाही?

वीस वर्षे खेळणे हाच एक विक्रम आहे पण वीस वर्षे खेळून ४४.५० चा ऍव्हरेज राखणे हे देखील येरागबाळ्याचे काम नाही. वीस वर्षे खेळलेले इतर खेळाडूही आहेत पण त्यांच्या काळात दर दिवसाआड सामने होत नसत. कसोटीत सुटीचा दिवस असे. क्रिकेट इतके थकवणारे नव्हते. यातच सचिनचे वेगळेपण दिसून येते. पाठदुखी आणि टेनिस एल्बोच्या दुखापतीचा सामना त्यालाही करावा लागला, पण तरीही वीस वर्षे हा फिटनेस त्याने टिकवला. मला नाही वाटत यापुढे वीस वर्षांची अजून कुणाची कारकिर्द असेल. अशा क्रिकेटच्या देवाला हा लेख भक्तिभावे अर्पण.

थोडसं अवांतर: आई, बघ जरा लहानपणी व्यवस्थित क्रिकेट खेळायला दिलं असतस तर हा लेख दुसऱ्या कुणीतरी माझ्यासाठी लिहिला असता.

वरील सर्व आकडेवारी cricinfo च्या statsguru वरून मिळवली आहे.

Monday, November 9, 2009

एक उनाड दिवस

१. टूथपेस्ट्चा गळा आवळल्यावर दात घासण्यापुरती पेस्ट बाहेर आली. आज संध्याकाळी नवीन टूथपेस्ट लाना ही पडेगा (असं मी गेले ४ दिवस ठरवतोय, पण रोज जरूरीपुरती पेस्ट निघतेय)
२. सकाळी सॉक्समध्ये रोजच्याप्रमाणे पॅण्ट अडकली नाही.
३. सॅन फ्रान्सिस्को ट्रेन असूनही आज माझ्या शेजारची सिट मी उतरेपर्यंत रिकामी होती (हे म्हणजे ठाणे-व्ही.टी. (चुकलो, सी.एस.टी.) स्लो ट्रेनमध्ये कांजूरमार्ग ला २०० ग्रॅम सिट (म्हणजे चौथी) मिळणे)
४. तिसरा मुद्दा कदाचित पहिल्या मुद्द्याचा साईड इफेक्ट असू शकतो हे आता लक्षात येतय.
५. ऑफिसात दरवाजाजवळ बसणारी सोनेरी केसांची भटकभवानी (पहाव तेव्हा ऑफिसभर भटकत असते) आजही हसली नाही.
६. ऑफिसात आज काहिच काम नव्हतं. तीन तीन वेळा सेंड/रिसिव वर क्लिक करून देखील एकही मेल आलं नाही.
७. मायबोली आणि मराठीब्लॉग्ज, फ्लिकर, जी-मेल साईट्स ऑफिसात ब्लॉक्ड असल्याने वेळही जात नव्हता. अगदी हातची सगळी नखं खाऊन संपली पण वेळ जात नव्हता (पायात बूट असल्याने आणि पाय तोंडापर्यंत पोचत नसल्याने पायाची नखं वाचली)
८. भटकभवानी टॉक टॉक सॅण्डल वाजवत क्युबिकलच्या बाजूने गेली. जाताना गोड हसली.
९. लंच नंतर परत येऊन सेंड/रिसिव वर क्लिक केलं आणि व्होय्ला, एक मेल आलं. ऑफिसात असणाऱ्या रक्तदान शिबिराबद्दल रिमाईंडर होतं. मेल मधला शब्द न शब्द वाचून काढला.
१०. टाईमपास साठी रक्तदान करायचा विचार केला, पण १ बाटली रक्त दिल्यावर शुद्धीवर येण्यासाठी ४ बाटल्या चढवाव्या लागतील म्हणून बेत रद्द केला.
११. चार पाच मित्रांनी मिळून मग दिड तास चकाट्या पिटल्या.अबु आझमीच्या अल्लामुखात भडकावणे, भारत ऑस्ट्रेलियाकडून हरणे ते भटकभवानीचे टॉक टॉक चालणे यापर्यंत सर्व विषय चघळून झाले.
१२. शेवटी ५:३० ला घरी निघालो. ट्रेनमध्ये बाजूची सिट रिकामी नव्हती.
१३. शेवटी नवीन टूथपेस्ट घेतली.
१४. घरी आलो तर बायको ’The Perfect Bride’ बघत होती. हि डेली सोप बाकी डेली सोपप्रमाणेच डोक्यात जाते.
१५. म्हणून मग ’हा उनाड दिवस’ ब्लॉगवर उतरवून तुम्हाला त्रास द्यायचं ठरवलं.

अजून वाचताय? तुमच्या पेशन्स ला सलाम :)

Friday, November 6, 2009

डबलढोलकी!!!

’मराठी माणसाने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला’ असे सामना ने कधीच म्हटले नाही (वाचा: http://saamana.com/2009/Nov/06/Index.htm पुन्हा भरती येईल). बहुतेक साहेबांची स्मरणशक्ती वयोमानानुसार खालावत चालली आहे. हा पहा त्याचा पुरावा (वाचा: http://saamana.com/2009/Oct/24/Index.htm अग्रलेख: बस्स झाले ते झाले). सर्व लेख वाचायचा कंटाळा आला असेल तर फ़क्त "...पण तरीही ज्या मराठी माणसासाठी शिवसेनेने ४४ वर्षे रान उठवले तो मराठी माणूसही निवडणूकीत शिवसेनेकडे पाठ फिरवील व पाठ फिरवतानाच आमच्या पाठीत खंजीर खुपसेल असे आम्हाला कधीही वाटले नव्हते.." एवढेच वाचा. एवढा ढळढळीत पुरावा, अन तोही सेनेच्याच मुखपत्रात असताना आम्ही असे म्हटलेच नाही असे माजी सेनाप्रमुख कसे म्हणू शकतात?

आता या स्टेट्मेंट्चा मोठा issue करण्याची काही गरज नाहीय पण बाळासाहेबांनी जे म्हटलय ते स्वीकारून गरज पडल्यास मराठी माणसाची माफ़ी मागायला हवी होती. अर्थात त्यांच्याकडून माफ़ीची अपेक्षा त्यांच्यावर प्रेम करणारा मराठी माणूस करत नाहीय, पण जे म्हटलय ते वाघाच्या काळजाने छातीठोकपणे स्वीकारले असतं तर त्यांच्याबद्दलचा आदर नक्कीच दुणावला असता.

बहुतेक शिवसेनेची, विशेषत: शिवसेनेच्या नेत्यांची पराभवानंतर खिलाडूवृत्तीने पराभव स्वीकारण्याची मानसिकताच जणू नाहीशी झालीय. उद्धव तर पराभवानंतर ३-४ दिवस अज्ञातवासात गेले. काय अर्थ काढायचा याचा शिवसेनेवर विश्वास ठेवणाऱ्या माणसाने? कमीत कमी मिडियासमोर येऊन आपण १-२ दिवसांत यावर आपले मत व्यक्त करू इतके तरी सांगावयास हवे होते. बरं येऊन मत मांडलं काय तर म्हणे आमचा पराभव झाल्लाच नाही. पराभवाचे मुख्य कारण काय तर मनसे. अरे लोकसभेला तेच सांगितलात ना? पुन्हा सगळ्या प्रचारात तोच राग आळवलात ना? मनसेचं अस्तित्व मान्य करून का नाही केलीत मोर्चेबांधणी? सेनेची मोर्चेबांधणी हा दुसराच विषय आहे. उत्तर भारतीय उमेदवार उभे करणे, जुन्या जाणत्या नेत्यांचा पत्ता कट करून नवनवीन ’आदेश’ देणं, लोकसभेत मनसेला मते देणारी लोक पुन्हा मनसेला मतदान करणार नाहीत या भ्रमात राहणं. अशी मोर्चेबांधणी झाल्यावर मोर्चा पडायला कितीसा वेळ लागणार. अर्थात म्या पामराने राजकारणाबद्दल शिवसेनेस काय शिकवावे, पण उघड्या डोळ्यांनी ज्या गोष्टी माझ्यासारख्या सामान्य माणसाला दिसल्या त्या सेनेच्या नेत्यांना दिसू नयेत याच आश्चर्य वाटतय.

अजूनही वेळ गेली नाहीय, म्हणजे तशी ती या विधानसभेत गेलीय निघून, पण पुढच्या निवडणूकीसाठी पूर्ण पाच वर्षे आहेत अजून. तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केलेली कामे वादातीत आहेत. मनसे पक्षामुळे मते विभागली गेली आहेत याबद्दल दुमत नाही, पण ती का विभागली गेलीत याच्याकडे लक्ष द्या. राज यांनी केलेल्या राजकीय टीकेकडे लक्ष द्या (रिलायन्स वर मोर्चा न्यायचा अन रिलायन्सच्याच जाहिराती सामनात छापायच्या, मराठी पाट्यांसाठी सेनेच्या काळात सेनेनं सक्ती न करणं वगैरे वगैरे). यापुढे मनसे पक्षाचे अस्तित्व मान्य करा अन त्यांच्यावर टीकाटिपण्णी करण्यात वेळ घालवू नका. मनसेने केवळ मराठी अस्मितेचा मुद्दा (जो कधीकाळी सेनेचा होता) लावून धरून एवढं यश संपादित केलय, तुम्ही मराठी अस्मितेबरोबर मराठी माणसाचे दैनंदिन जीवनातले मुद्देही लावून धरा.

४४ वर्षांचा पक्ष ४९ व्या वर्षात हाफ़ सेन्चुरीही पूर्ण न करता आऊट झालेला पाहायचा नाहीय आम्हाला.