Wednesday, August 19, 2009

मराठवाडा के शोले

रामगढ्ला राम राम ठोकून गब्बरने आपले बस्तान मराठवाड्यात हलवले. रामगढमध्ये लुटण्यासारखे काही शिल्लक राहिले नव्हते. त्याच्यापाठोपाठ ठाकुर सुद्धा जय वीरु आणि रामुकाका यांच्यासहित मराठवाडयात आले. गब्बरला पकड्ण्याच्या प्रोजेक्ट ची कॉस्ट वाढतच चालली होती. त्यामुळे खरं तर ते रामुकाकांना आणणार नव्ह्ते, पण जय आणि वीरु ने त्यांच्या गब्बरला पकडण्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी शिवाय इतर कामे करण्यास नकार दिला होता. रामुकाकांशिवाय ठाकुर साहेबांचे सकाळचे महत्वाचे काम अडले असते, त्यामुळे त्यांना झक मारत रामुकाकांना आणावे लागले होते.

असेच एका सकाळी ठाकुरसाहेब घरात शिरले. मागोमाग रामुकाकाही आले. रामुकाका तडक न्हाणीघरात गेले आणि चुलीची राख हाताला लावून हात खसाखसा धुतले. रामगढला कमीत कमी नदीला पाणी तरी भरपूर असायचे पण इकडे मराठवाडयात पाण्याचा दुष्काळ, त्यामुळे रामुकाकांचे अजुनच हाल होत.

"अजून किती दिवस हेच काम करावे लागणार आहे कुणास ठावूक. यापेक्षा उचलत का नाहीस रे देवा? मला नाही त्या ठाकुरला..." रोज हात धुताना रामुकाकांच्या मनात हेच विचार येत.

" काय रे जय, प्रोजेक्ट्चं स्टेटस काय आहे? आणि तो वीरु कुठे भटकतोय काम सोडुन? " प्रोजेक्ट मॅनेजर ठाकुरांनी मॉड्युल लिड जय ला विचारले.
जय आपला बाजा वाजवण्यात मग्न होता. प्रोजेक्ट्ची कॉस्ट वाचवण्यासाठी ठाकुरसाहेबांनी राधेला रामगढलाच ठेवले होते. त्यामुळे त्याचं कामात लक्षच लागत नव्हतं. तरी सुद्धा काही तरी स्टेटस द्यायचं म्हणून तो उत्तरला.
" नवीन एके-४७ प्लस प्लस ऑर्डर केलीय. येइल दुपारपर्यंत. " - जय
" सी प्लस प्लस ऐकली होती. ही एके-४७ प्लस प्लस काय भानगड आहे?" - ठाकुरसाहेब
" ही फ़ुल्ली ऑटोमॅटिक आहे. तिच्याबरोबर एक रिमोट सुद्धा येतो. रायफ़ल एक जागेवर सेट केली कि ती रिमोट ने कंट्रोल करता येते. मग हात न लावता सगळी कामे ऑटोमॅटिकली होतात" - जय

हात न लावता सगळी कामे ऑटोमॅटिकली होतात हे ऐकुन रामुकाकाच्या मनात विचार डोकावला , ’सकाळी ठाकुरसाहेबांच्या नेहमीच्या जागेवर हिला सेट केलं तर?....’ पण तो विचार मनातच राहिला, कारण ती रायफ़ल 'त्या' कामासाठी बनली नव्हती.

" फ़क्त एक प्रॉब्लेम आहे ठाकुरसाहेब ..."
प्रॉब्लेमचे नाव ऐकताच सगळ्या प्रोजेक्ट मॅनेजर प्रमाणे ठाकुरसाहेबांच्या कपाळावरही आठया पडल्या.
" आता कसला प्रॉब्लेम आहे" - ठाकुरसाहेब
" त्या रायफ़लची काडतूसे अजून महाराष्ट्रात रिलिज झालेली नाहीत "
" अरे मग बाहेरून मागवा ना " - ठाकुरसाहेब
" हो पण त्यामुळे प्रोजेक्ट ची कॉस्ट अजुन वाढेल"
ते ऐकून ठाकुरचा चेहराच पडला. घरची शेतं अगोदरच विकून झाली होती. आता विकण्यासारखं अजुन काही शिल्लक राहिलं नव्ह्तं. चार घरची धुणी-भांडी करावीत तर हात नसल्याने तेही शक्य नव्ह्तं.

" मग आता?" - ठाकुरसाहेब
" तिची पायरेटेड काडतूसे मिळतायत असं ऐकलं होतं. त्याच्याबद्दल माहिती काढायला मी वीरुला पाठवलय. ती जर का मिळाली तर आपला काड्तुसांचा खर्च निम्म्याने कमी होईल आणि प्रोजेक्ट ची कॉस्ट अजुन कमी होईल." - जय

प्रोजेक्ट कॉस्ट कमी करण्याचा विचार करणार डेवलपर ठेवल्याचा योग्य निर्णय घेतल्याबद्दल ठाकुरसाहेबांनी मनातल्या मनात आपल्या नसलेल्या हातांनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली आणि अप्रेजल मध्ये जय ला चांगली रेटिंग द्यायचं पक्क केलं.

" आज काडतुसं मिळाली तर रात्री ’मेह्बूबा मेह्बूबा’ गाणं चालू असताना वीरु रायफ़ल सेट करेल आणि मग आपण कधीही गब्बरला उडवू शकू " - जय
"त्या नाचगाण्याचा खर्च कोण करणार आहे? ", ठाकुरांनी काळजीच्या सुरात विचारलं.
" तो खर्च गब्बर करणार आहे " - जय

हे ऐकताच ठाकुरचा जीव भांड्यात पडला. प्रोजेक्ट कॉस्ट अजून वाढणार नाही हा विचार करुन त्यांना बरं वाटलं.

" ही एके-४७ प्लस प्लस बाळगल्याबद्दल काही केस तर होणार नाही ना? असं ऐकलय की ती फ़क्त कसाबसारखे अतिरेकी वापरतात म्हणे" - ठाकुर
" काही काळजी करु नका. संजय दत्त ने काही वर्षांपूर्वी हिचं अगोदरचं वर्जन बाळगलं होतं. तो केस होवून सुद्धा जामीनावर सहीसलामत बाहेर आहे. मान्यता नसताना लग्न काय करतोय, सिनेमे काय करतोय, निवडणुका काय लढवतोय, काय नी काय. त्याच्या जामीनावर तो मरेपर्यंत काही ऍक्शन घेतली जाईल असं दिसत नाहीयं. " - जय

आपल्या डेवलपरने सगळ्या बाजुंनी विचार करुन डेवलपमेंट केलीय हे बघून ठाकूरसाहेबांना आनंदाचं भरतं आलं.

"बल्ले बल्ले, ओ शावा शावा...बल्ले बल्ले, ओ शावा शावा..."
कोण बेसुरं गातय हे बघायला सगळ्यांच्या नजरा दरवाजाकडे वळल्या. पाहतात तो वीरु दोन्ही हात वर करून भांगडा करत येत होता.

"ऐसी खबर लाया हूँ के दंग रह जाओगे.." -वीरू
"काय झालं?"-ठाकुर
"वो पार्टी आधे रेट पे काडतूस देने के लिये राजी हो गयी है, बोलो है ना भांगडा करने वाली खबर. ये जय तो भांगडा नही करेगा. रामूकाका और ठाकुरसाहब, आप दोनो हात उठाके मेरे साथ भांगडा करो" - वीरु

ठाकुरसाहेबांनी रागाने वीरु कडे पाहिलं. वीरुच्या पैलवानी डोक्यात काही प्रकाश पडेना के ठाकुर असे रागाने का बघतायतं

"क्या हुआ ठाकुरसाहब, मुझे लगा आप खुश होवोगे, शबाशी दोगे..." - वीरु

त्याला समजवायच्या फ़ंदात न पडता ठाकूर त्याच्यावर गरजले.
" हे काय मघापासून हिंदीत बोलतोयस? तू आता महाराष्ट्रात आहेस. मराठीत बोल. मनसे वाल्यांनी ऐकलं तर तुझी मनापासून धुलाई करतील."
" हो, त्यादिवशी त्या असत्यम सॉफ़्ट्वेअर मध्ये एक इंजिनीअर अमेरिकेच्या क्लाईंट बरोबर इंग्लिश्मध्ये बोलला तर त्याला धुतला होता" - जय
" अरे पण मी मराठी शीक रहा हूँ. ठाकुर तुमची पोस्टींग महाराष्ट्र मे होती २ साल इसलिये तुमको मराठी येते " - वीरू
" गंगा किनारे का छोरा असून मी नाही शिकलो २ महिन्यात ?" - जय

त्यांचं संभाषण चालू असतानाच अचानक गोळीबार सुरू झाल्याचा आवाज आला. गब्बरची माणसं गोळीबार करत होते. त्या गोळीबाराने घराच्या सगळ्या काचा फुटल्या. नशीबाने त्यांच्यापैकी कुणाला गोळी लागली नव्हती. नाही म्हणायला जयच्या दंडावर गोळी लागली होती, पण तिथे त्याचा दीवार मधला ७८६ नंबरचा बिल्ला होता. दीवारच्या शूटींग नंतर तो न परत केल्याबद्दल त्याला आज फार बरे वाटत होते. गोळीबार करून ते डाकू निघून गेले.

" अरे, ये गोळ्या तो एके ५७ प्लस प्लस च्या है" वीरु पडलेल्या पुंगळ्यांकडे बोट दाखवत म्हणाला"
" पण एके ५७ प्लस प्लस तर अजुन मार्केट मध्ये लाँच झाली नाहीय. मग गब्बरकडे कशा आल्या?" - जय

त्या बिचाऱ्यांना कुठे माहित होतं की गब्बर त्या रायफ़ल कंपनीचा बीटा कस्टमर आहे ते.

" अब आपल्याला एके-१२० रायफ़ल आणने पडेंगे" - वीरु
" हो आणि त्यामुळे प्रोजेक्ट कॉस्ट वाढणार" - जय

ठाकूरसाहेब तेव्हापासून ही ऍडिशनल कॉस्ट कशी कवर करावी याचा विचार करताहेत. मराठवाड्यातल्या कुठल्यातरी कुंभाराकडे चिखल तुडवण्याचा जॉब करणे आणि कॉस्ट कटिंग साठी रामुकाकाला परत पाठवून रोज सकाळी 'तसच' राहणे हे दोनच पर्याय त्यांच्यापुढे होते ......

Friday, August 14, 2009

कुणी निंदा कुणी वंदा आमचा ब्लॉग लिहीण्याचा धंदा

रविवारचा दिवस. म्हणजे बेड पे लोळने का वार. भल्या पहाटे साडे दहा वाजता आळोखे पिळोखे देत उठलो. मनाशीच म्हटल, चला, ब्लॉगवर काही तरी एकदम धांसू लिहु की कमीत कमी 7-8 कॉमेंट्स तरी आले पाहिजेत. तोच एक आवाज आला,
"गप्प बस रे मुर्खा.."
दचकून इकडे तिकडे पाहिल तर कुणीच नव्हत. बायको सकाळीच बाजारात भाजी आणायला गेली होती. जरी ती जगातल्या सर्व बायकांप्रमाणे स्वत:च्या नवर्‍याला मूर्ख समजत असली तरी इतक्या उघडपणे माझ्यावर खेकसणार नाही याबद्दल मला खात्री होती.
" इकडे तिकडे काय बघतोयस मूर्खासारखा??"
च्यामारी पुन्हा मूर्ख? सकाळी सकाळी इज्जतचा भाजीपाला?? आता काहीतरी केलच पाहिजे.
" च्या मारी, कोन हाय थित? कवादरना मूर्ख बोलून र्‍हायलाय"..
जोर दाखवायचा असेल तर मी अस अधून मधून ग्रामीण मराठीत बोलतो. पुणेरी मराठीतून शालजोड्यातला ठेवून देता येत, पण जोर हवा तर रांगडी ग्रामीण मराठीच उपयोगाला येते. त्यात एक दोन फुल्यावाले शब्द असतील तर अजुनच जोर चढतो.
"गप्प बस.... कसला विचार करतोयस सकाळी उठल्या उठल्या... मूर्खासारखा..."
आयला, याला कस कळल की मी विचार करतोय ते? नीट आठवल तर आवाज माझ्या आवाजासारखाच होता. अंतरात्म्याचा आवाज अंतरात्म्याचा आवाज म्हणतात तो हाच की काय? इथे आवाज तर येत होता पण हिंदी सिनेमात जसे आरशात दुसर रूप दाखवतात तसे दुसरे रूप काही इथे दिसत नव्हते. म्हटल आरशात जाऊन पहावे मग दिसेल दुसरे रूप.
"काही गरज नाहीय आरशात जाऊन पाहायची..."
आता तर 100% confirmed की हा माझ्या अंतरात्म्याचाच आवाज. म्हटल आलाच आहे आतला आत्मा बाहेर तर साधावा संवाद त्याच्याशी.
" काय रे बाबा? माझाच आतला आवाज असून मलाच मूर्ख का म्हणतोयस?"
" नाहीतर काय? कसला विचार करत होतास सकाळी उठल्या उठल्या?"
" कसला म्हणजे? ब्लॉगवर काहीतरी पोस्ट करायचा"
" आणि?...."
" आणि काय?..."
" 7-8 कॉमेंट्स चा विचार नव्हतास करत?"
" हम्म्म्म.... मग त्यात काय चुकल?"
" काय चुकल? म्हणजे तू फळाची अपेक्षा ठेवून कर्म करतोयस....."
" मग.. कॉमेंट्स ची अपेक्षा केली तर काय फरक पडतो? कॉमेंट्स आल्याशिवाय कळणार कस की मी चांगला लिहितो की वाईट ते? बाकीची लोक कॉमेंट्स नाही आली की आपल्या प्रोफाइल मध्ये लिहितात की मी हा ब्लॉग कॉमेंट्स साठी लिहतच नाहीय मुळी. आपल्याला बाबा नाही जमणार ते... गायकाला कसा फीडबॅक टाळ्यांनी मिळतो तसा ब्लॉग लेखकाला कॉमेंट्सनी मिळतो. मग कॉमेंट्स नको यायला?"
" तुझ्या लेखनाला लोकांनी का म्हणून कॉमेंट्स द्याव्यात? अस आहे तरी काय तुझ्या लेखनात..?"
" का म्हणजे?"... आता मला काही सुचेनास झाल. तरीही मी आपल घोड पुढे दामटवले
" का म्हणजे?... इतक्या वेगवेगळ्या विषयांवर इतक सर्वांगसुंदर, सुलभ लेखन. अगदी इंग्लीश मीडियम मधले लोक सुद्धा वाचून खुश होतात. थेट हृदयाला भिडणार लेखन आणि ते ही मोफत... माझ लेखन म्हणजे..... "
माझ बोलण अर्धवट तोडत माझा आतला आवाज खो खो करून हसायला लागला. मी एकदम फर्स्ट क्लास आणि रुचकर जेवण बनवू शकतो अस जेव्हा जेव्हा म्हणतो तेव्हा तेव्हा माझी बायकोही असच खो खो करून हसते. आपल हस दाबत तो म्हणाला.
" अस? मग तुझ्या प्रत्येक पोस्ट च्या 'बंद करा' बॉक्स वर कोण का क्लिक करत आहे"
आईई ग्ग्ग्ग.. एकदम माझ्या दुखर्‍या नसेवर त्याने हात ठेवला.मी ब्लॉग प्रसिद्ध केल्यापासून ते आजतागायत, माझ्या प्रत्येक पोस्टवर कोणीतरी 'बंद करा' च्या बॉक्स वर क्लिक करतोय. मी समजू शकतो जर मराठी मीडियम आणि रावसाहेबसारख्या पोस्ट ने त्याच्या/तिच्या भावना दुखावल्या असतील पण अगदी मी माझ्या कोकणातल्या दिवसावर पोस्ट टाकली त्यावर सुद्धा 'बंद करा' म्हणून क्लिक केल गेलय. मला समजत नाहीय की तो बंद का करावा हे कॉमेंट टाकून का सांगत नाहीय ते.
" का ते मला माहीत नाही. जो पर्यंत तो वा ती व्यवस्थित कॉमेंट लिहत नाही तो पर्यंत मी त्याकडे दुर्लक्षच करणार"
" एक सल्ला देऊ? "
" फुकटचे सल्ले देणार्‍या शतमुर्खा... मगितलाय कोणी तुझा सल्ला? ठेव तुझ्याजवळच" - मी मनातल्या मनात.
" तुला नकोय तरी हा शतमूर्ख तुला सल्ला देणार आहे"
अरेच्चा विसरलोच होतो की याला माझ्या मनात विचार केलेल समजत ते.
" सल्ला असा आहे की कॉमेंट्स ची अपेक्षा करून लिहण्यापेक्षा लिहिण बंद कर"
घ्या. देऊन देऊन काय सल्ला दिला तर म्हणे कॉमेंट्स ची अपेक्षा करून नका.
"नकोय मला तुझा सल्ला. ठेव तुझ्यापाशीच"
" अरे माझ म्हणणे पूर्ण ऐकून तर घे. कॉमेंट्स ची अपेक्षा ठेवून लिहु नकोस. लिखाणातील मजा अनुभवण्यासाठी लिहीत जा. मनातली तगमग व्यक्त करण्यासाठी लिहीत जा. कॉमेंट्स चा विचार करून लिहिलेली पोस्ट्स नंतर वाचल्यावर तुला तरी त्यावर कॉमेंट्स द्यावसा वाटतो का?"
"खरय. नंतर मी माझी पोस्ट्स जेव्हा वाचतो तेव्हा पहिला विचार येतो की शी काय लिहिलायस हे?"
" म्हणूनच म्हणतो की लिखाणाची मजा अनुभव. ती नक्कीच तुझ्या लिखाणात उतरेल आणि लोकांना ती नक्कीच आवडतील. त्यांना आवडली की कॉमेंट्स नक्कीच टाकतील. त्या अनिकेत, महेन्द्र, अपर्णा चे ब्लॉग्स बघ. वाचल्यावर वाटत ना कॉमेंट्स द्याविशी? "
हम्म्म्म. त्याच बोलण तर पटल. आत्ता यापुढे कॉमेंट्स साठी लिहिण बंद. एन्जॉय करत लिहायच. चांगला लेख झाला तर 'बंद करा' म्हणणारा सुद्दा बंद करा म्हणणार नाही.
" काही विषय सुचतोय का? " मी विचारात असतानाच माझ्या आतल्या आत्म्याचा आवाज आला
" अ नाही. कंपनी मधल्या गमती जमतीवर लिहु का?"
" अरे त्या सॉफ्टवेर मधली लोक सोडली तर कोणाला कळणार आहेत का?"
" मग माझ्या लग्नाची गोष्ट लिहु ?"
" का तुझ लग्न म्हणजे काय ऐश्वर्या अभिषेकच लग्न आहे का?"
" अरे म्हणून काय झाल? बर तूच सुचव काही विषय"
" "
" अरे सुचव ना, मी सुचवलेल्या सगळ्या विषयांवर काट मारलीस"
" "
" अरे आत्ता गप्प का? बोल ना काही तरी"
" "
माझा आतला आवाज एकदम बंद का झाला म्हणून मागे पाहील तर बायको उभी होती. आररेच्चा, ही बाजारातून आल्याच मला कळल कस नाही?

तिच्या चेहरा म्हणत होता, " माझा नवरा अस स्वत:शीच काय बडबडतोय........ मूर्खासारखा"

Thursday, August 13, 2009

24 तास पाण्याचा अपव्यय


24 तास पाण्याचा अपव्यय. म्हणजे महिन्याला अन् त्यानंतर वर्षाला किती पाणी वाया जाईल याचा हिशेबच नाही. :) चला विषयावर जाऊ नका :) ऑफीस मधून घरी परत येत असताना ही गाडी समोर दिसली. कॅमरा बरोबर नव्हता म्हणून गाडी चालवता चालवता मोबाइल फोन वर हा फोटो काढलाय. ते म्हणतायात की ते जगातले सर्वात अनुभवी क्लीनर्स आहेत म्हणून (नीट वाचा बारीक अक्षरात लिहिलेल ). बहुतेक कारपेट वगैरे क्लीन करताना ते 24 तास पाण्याचा अपव्यय करत असावेत :) बिचार्‍या लोकांना कल्पनाही नाहीय की जाहिरातीत काही तरी चूक झालीय म्हणून. :)

Monday, August 10, 2009

आम्ही सगळे रावसाहेब...

पु. ल. चे रावसाहेब आणि आम्ही समोरच्याला वाक्यागणिक किमान एक 'मधुर' शब्द या हिशेबाने त्या 'मधुर' रसात चिंब करण्याबाबत प्रसिद्ध आहोत. तसा हा गुण आम्हास अगदी शालेय जीवनात लाभला होता, परंतु त्याचा सढळ मुखे वापर कॉलेज जीवनात आणि व्यावसायिक जीवनात जास्त झाला. इतका की जर का त्या विषयावर पी. एच. डी. करायची झाली तर आम्ही सगळे कसलाही अभ्यास न करता A++++++ ग्रेड ने पास होऊ. आम्ही सगळे म्हणजे एका माळेचे मणी असलेले आमचे मित्रगण. थोडक्यात आमचे बोलणे म्हणजे 'birds of the same beak चिवचिवाट together' असे असते. त्या चिवचिवाटात किती मधुर शब्द असतील याची कल्पनाच केलेली बरी.

आमचा पी.एच. डी. चा अभ्यास सांगतो की हिंदी आणि मराठी या भाषेतील मधुर शब्दांमध्ये जितकी ताकद आहे तितकी इंग्रजी भाषेतील मधुर शब्दांमध्ये नाही. त्यामुळे अगदी इंगजाळलेल्या माणसालाही मारामारी करताना वा भांडण करताना मराठी किंवा हिंदितल्या मधुर शब्दांचा आधार घ्यावा लागतो :)आमचा अभ्यास असेही सांगतो की दहा हजारात एखादाच असा दांडेकर असतो जो आपल्या दैनंदीन जीवनात 'मधुर' शब्दांचा वापर करत नसतो (आणि भारतातल्या जवळपास प्रत्येक मातेला आणि प्रत्येक बायकोला अनुक्रमे तो आपला पुत्र आणि आपला पती आहे असे वाटत असते).
ज्यांस माहिती नाही अशांसाठी, दांडेकर = पुरूष वर्ग, होळकर = स्त्री वर्ग. ज्या लोकांना अजूनही याचे detailed explanation हवे आहे ते लोक हा लेख वाचायच्या लायकीचे नाहीत, त्यांनी पुढे न वाचणेच चांगले. खरतर आमच्या माहितीप्रमाणे बर्‍याच मुली सुद्धा मधुर शब्द वापरतात. त्यावर एक विनोद आहे. एक मुलगी दुसर्‍या मुलीला विचारते
" काय ग ही मुले फक्त मुलांच्या घोळक्यात असतात तेव्हा काय बोलत असतील ग ?"
"काय म्हणजे? आपण जेव्हा मुलींच्या घोळक्यात असताना बोलतो तेच "
" शी.. मुले पण इतकी घाण घाण बोलतात??" :)

आमच्या कॉलेज मध्ये पवन नावाचा एक मित्र होता. आमच्यापैकी बरेच जण मधुर शब्द वापरताना आजूबाजूला एकाच चोचेचे पक्षी (birds of the same beak... remember??) असल्याची खात्री करून घेत. पवन महाशय मात्र याला अपवाद होते. रावसाहेबांना ज्या प्रमाणे आपण कोणासमोर बोलतो आहोत याचे भान नसायचे त्याच प्रमाणे हे महाशय सुद्धा मुलींसमोर आपली अमृतवाणी व्यक्त करायचे. आमच्या कॉलेजची एकदा माथेरानला पिकनिक गेली होती आणि पवन आमचा खजीनदार होता. पिकनिक वरुन परत आल्यावर हा एका ऑफ पीरियड ला शेवटच्या बाकावर बसून हिशेब करत होता आणि मी पहिल्या बाकावर बसलो होतो (फक्त ऑफ पीरियडलाच मी पहिल्या बाकवर बसायचे धाडस करू शके). पवनला हिशेब काही केल्या लागेना. त्याने शेवटच्या बाकावरून आरोळी ठोकली,
"ए प्रवीण उधर क्या XX मरवा रहा है. इधर आके मेरेको हेल्प कर. इस माथेरान के खर्चे से तो मेरे XX मुह मे आ गये है..."
संपूर्ण क्लास ची काय अवस्था झाली असेल त्याचा तुम्हाला अंदाज आलाच असेल.

बंगलोरला असताना एका बंगल्यात आम्ही मुंबईची 7 आणि दिल्लीची 3 असे 10 जण एकत्र रहात असु. दिल्लीची 3 जण जास्त शिव्यांचा वापर करत नसत. या उलट सी प्रोग्रँमिंग मध्ये जसा प्रत्येक स्टेट्मेंट शेवटी एक सेमिकोलन वापरतात त्याप्रमाणे मुंबईचे 7 जण प्रत्येक वाक्याच्या शेवटी एक शिवी वापरत. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. दिल्लीच्या शेजारी मुंबईला बांधल्याने त्याना वाण नाही पण आमचा गुण लागलाच :) त्या तिघांपैकी सुदर्शन सुट्टीवर आपल्या घरी गेला होता. घरच्यांसोबत कुठली तरी क्रिकेटची मॅच पाहत होता. एका टेन्स्ड मोमेंटला कुणाची तरी विकेट पडली आणि हे महाराज चित्कारले ... " भेXXXX......" आई वडील आणि बहीण आ वासून त्याच्याकडे बघायला लागले होते, पण कोणी काही बोलले नाही. कमावत्या पोराला कोण काय बोलणार म्हणा :)

ग्रूप मधल्या मुलींसमोर आम्हाला एकमेकांना शिव्या देण्याची उर्मी आली तरी देता येत नसत. यावर तोडगा म्हणून आम्ही त्यांच्या समोर फक्त buffer buffer असे म्हणत असू :) पण आमच्या पैकी शफी आणि माझा buffer लवकर फुल्ल व्हायचा आणि मुलींसमोर कधी कधी 'overflow' व्हायचा.:)

आमच्यापैकी समीर कडे कायनेटिक होंडा होती. ती आम्हा सर्वांची सार्वजनिक मालमत्ता होती. गाडीत आपल्या प्रवासाला लागेल त्यापेक्षा थोडे जास्त पेट्रोल भरून वापरली तर समीर ही खुश राहत असे. बंगलोर मध्ये रिक्षाला पैसे घालण्यापेक्षा ते परवडायचे. कारण बंगलोर मध्ये कधीही रिक्षा करायची झाली तर, " वन अँड हाल्फ मीटर होना..." यानेच सुरूवात असायची. एका संध्याकाळी नारायणला स्कूटर न्यायची होती तर त्याच रात्री समीरला लिडो थियेटर मध्ये नऊच्या शो ला जायचे होते. नारायणने आठ पर्यंत परत येण्याचे आश्वासन देऊन स्कूटर घेऊन गेला. आठ वाजून गेले तरी नारायणाचा पत्ता नव्हता.
समीरला त्या दिवशी तो चित्रपट बघायचाच होता. सव्वा आठ, साडे आठ झाले तसा समीरचा पारा चढू लागला होता. पावणे नऊ झाले तरी नारायण आला नव्हता. समीर ने त्याच्या सात पिढ्यांचा उद्धार तोवर केला होता. आम्ही समीरला सांगत होतो की सगळ्या शिव्या buffer करून नारायण आल्यावर एकदम दे :) रोज साधारण पावणे नऊ -नऊच्या सुमारास एक सरदारजी आमचे डिनर चे डबे घेऊन येई. त्या सरदारजीकडे पण कायनेटिक होती. साधारण पावणे नऊला तो सरदार आपल्या कायनेटिक वरुन डबे घेऊन आला. पोर्च मध्ये कायनेटिक चा आवाज आल्यावर समीरला वाटले की नारायणच आलाय म्हणून. दरवाजा उघडाच होता. सरदार दरवाजात पोचताच नारायण समजून समीरच्या तोंडून फुले बाहेर पडली
" भाग भोXXX"...
त्या बिचार्‍या सरदारला कल्पना नव्हती की आपले स्वागत आज अशा पद्धतीने होईल म्हणून. त्याला समीर ने सॉरी म्हटल आणि सांगितल की ती फुले त्याच्या साठी नव्हती. तरीही काही तरी बोलायच म्हणून तो सरदार बोलून गेला,
" मुझे लगा की कोई बकवास मूवी देख ली जो इतनी गाली दे रहे हो"
झाल जाता जाता तो सरदार समीरच्या जखमेवर मीठ चोळून गेला. मूवी चुकल्यामूळे नारायण परत आल्यावर त्याच्यावर समीरचा buffer overflow झाला. आगीत तेल ओतायला आमच्यासारखे मित्र तत्पर होतेच :)

वर म्हटल्याप्रमाणे दहा हजारात शिव्या न देणारा एकच असतो आणि तो म्हणजे श्रीनी होता. माझा त्या 7 पैकी एक मित्र कुरियन आणि मी कॅनडा मध्ये असताना हा श्रीनी हैदेराबाद हून कुरियानचा roommate म्हणून नवीनच आला होता. त्याच इंग्रजी यथा तथाच होत. कॅनडात आल्याच्या दुसर्‍याच दिवशी हा कुरियनला न सांगता त्याच्या एका गुल्ट मित्राकडे मुक्कामाला राहिला. एकडे रात्रभर वाट बघून कुरियन हैराण.पोलिसात जायच तर त्या श्रिनि च्या नावाशिवाय आमच्याकडे दुसर काहीच नव्हते. दुसर्‍या दिवशी सकाळी श्रीनी घरी परत येताच कुरियन ची सटकली..
" क्यो बे माXXXX किधर XX मरवाने गया था रात भर??"
हे ऐकताच त्या श्रिनि चे तोंडच उतरले, रडवेल्या सुरात तो कुरियन ला म्हणाला,
"If you want to scold me then scold me, why to bring mother and father in between..."

ते ऐकताच कुरियनला (आणि मला सुद्दा) बहुतेक आयुष्यात पहिल्यांदा त्या शिव्यांच्या ख-या अर्थाची जाणीव झाली. तोवर आम्ही त्या शिव्या खरा अर्थ न घेता एकमेकांना करोडो वेळा तरी दिल्या असतील. मग त्या बिचार्‍या श्री नी ला आम्ही समजावले की त्या शिव्या आमच्या तोंडात बसल्या आहेत पण त्यांचा खरा अर्थ आम्हाला अभिप्रेत नसतो.

तर मित्रहो. चुकुन माझ्या तोंडून तुम्ही मधुर शब्द ऐकलेत (खर तर चुकुन न ऐकण्याचे chances जास्त आहेत), तर लक्षात ठेवा की मजला त्यांचे खरे अर्थ अभिप्रेत नाहीत :)

Saturday, August 8, 2009

तुम्हाला काय वाटते?

भारतीय क्रिकेट खेळाडूंनी वाडा च्या अटीन्वर सही करण्यास मनाई केलीय आणि BCCI त्यांच्या पाठीशी उभी राहिलीय. त्यावरून विश्वभरात वादंग सुरू आहे. संपूर्ण क्रीडा विश्वाने त्या मान्य केल्या असताना हे कोण टिकोजीराव लागून आलेत असा ही सूर लावला जातोय. सानिया मिर्जानेही खिलाडू वृत्तीने त्या क्रिकेटपटुनी मान्य कराव्यात असे सुचवले आहे.

खेळाडूंचा मुख्य विरोध आहे तो आपला विश्रांती दरम्यानचा कार्यक्रम जाहीर करण्याबाबत. त्यांचा सामन्या दरम्यान आणि सरवा दरम्यान वाडाच्या उत्तेजक चाचणीला विरोध नाही आहे. मला वाटते ते एक प्रकारे योग्यही आहे. व्यक्‍तिगत स्वातंत्र्यावर गदा आणि सुरक्षितता ही दोन मुख्य कारणे त्यानी दिलीत. काही लोकांचा मुद्दा आहे की जर का क्रिकेट खेळाडूंनी विश्रांती दरम्यान उत्तेजक द्रव्यांचे सेवन केले तर? मुद्दा बरोबर आहे, पण हेही लक्षात घेतल पाहिजे की क्रिकेट खेळाडू वर्षातले कमीत कमी दहा ते अकरा महिने क्रिकेट खेळतात. जर का त्यानी विश्रांती काळात उत्तेजक द्रव्य घेतले असेल तर पुढच्या सरावादरम्यान वा सामन्या दरम्यान घेतलेल्या चाचण्यात ते पकडले जायला हवे.

दुसरा मुद्दा सुरक्षिततेचा. रॉजेर फेडेरर सारख्या खेळाडूने या करावर सही केलीय. काही लोकांचे म्हणणे असे आहे की रॉजर ची सुरक्षा सुरक्षा नाही का? पण खरच तस आहे का? रॉजर त्याच्या देशात कुठल्याही सुरक्षेविना मॉल मध्ये वा सार्वजनिक ठिकाणी फिरू शकतो. इतर देशांच्या क्रिकेट खेळाडूंना त्यांच्या देशातील जनता भारतातील खेळाडूना भारतातील जनता जितका त्रास देते तितका नक्कीच देत नसेल. त्यामुळे भारतातील खेळाडूंना त्यांच्या हक्काचा विश्रान्तीचा काळ एन्जॉय करता आला पाहिजे. संपूर्ण जगाने त्या करारावर सही केली म्हणून क्रिकेटपटुनी सुद्धा केली पाहिजे अशी मागणी करणे चुकीचे आहे.

मला करारातील अटींबद्दल पुरेशी माहिती नाही परंतू वरकरणी तरी क्रिकेटपटुन्चा विरोध मला योग्य वाटतो. तुम्हाला काय वाटते?

Friday, August 7, 2009

खेड्यामधले घर कौलारू -2


जेवताना घरात अनेक पंगती उठत. सर्वात प्रथम लहान मुले (अर्थात नदीवर डुंबायला गेली नसतील तर), नंतर मोठी माणसे आणि सर्वात शेवटी घरातील बायका. पंगती उठत असताना चुलीवर रन टाइम भाकरी भाजणे चालूच असायचे. त्या भाकरी भाजण्याला लष्कराच्या भाकर्‍या भाजणे हा एकाच शब्द प्रयोग योग्य वाटतो. सगळ्यांची जेवणे झाल्यावर तो भांड्यांचा डोंगराएवढा ढीग घासणे पार पडे. कधी कोंबडा, बकरा, डुक्कराचे मटण बनवायचे असेल तर त्यांची कामे अजूनच वाढत. (डुककर हे जंगलातून शिकार करून आणलेले असत, मुंबई उपनगरात गटारात लोळणारे डुककर नव्हेत).

दुपारी मग बायका आणि मोठी माणसे जरा सुस्तावायची आणि आम्ही मात्र पत्ते किंवा गाण्याच्या भेंड्या खेळणे नाहीतर नुसतीच एकमेकांची मस्करी करणे असली कामे करू. मुंबईत वर्षभर राहून सुद्दा एकमेकांची तोंडे कधी दिसत नसत, मग ती कसर या उन्हाळ्याच्या सुट्टीत काढली जाई. संध्याकाळी अजुन एकदा बिनदुधाचा चहा गळ्याखाली उतरवल्यानंतर गुरांना चरायला नेण्याची ड्यूटी असे. गुरांना रानात लावल्यावर आम्ही जांभळे, कैर्‍या, आंबे काढणे असले उद्योग करत असू. गावची मुळे सरसर झाडावर चढून त्या गोष्टी काढायची आणि आम्ही त्या खाली झेलायचो. जांभळे खाऊन जीभ काळी जांभळी करून घ्यायचो. जीभ जास्तीत जास्त जांभळी करण्याची अघोषित स्पर्धाच असे. हे करता करता अंधार कधी पडायचा ते कळायचे नाही. मग गुरेच जवळ येऊन जणू काही 'आता नेवा आमका घराक' म्हणून सांगायची. घरी गुरे नेऊन एक एक करून दावणीला बांधायची आणि त्यांच्या पुढयात त्यांचे डिनर टाकायचे ही पुढची कामे. आमची गुरे कधी मोजली नाहीत. मोजली तर मरतात असा समज होता. पण सहज 30-40 च्या वर असतील.

तोवर दिवे लागणीची वेळ झालेली असे. गावात वीज पुरवठा तसा कागदोपत्री होता. दिवसातले जवळपास 16 तास वीज नसायची. आली तरी ट्यूब पेटायची नाही. पण त्यामुळे काही अडले नाही. भर उन्हाळ्यात गर्द झाडे आणि वाहत्या वार्‍यामुळे कधी उष्मा जाणवला नाही. रात्री तर भर उन्हाळ्यात पांघरूण ओढावे लागे. त्यामुळे घरात चुलीच्या प्रकाशात गप्पा रंगत. जवळपास सर्वजण तिथे असत. कोणी एस टी स्टॅंडवर गेला असला तर पेपर आणी. मुंबईचे पेपर एक दिवस उशिराने मिळत. मग चुलीच्या प्रकाशात त्याचे वाचन होई. नंतर दुपारच्या प्रमाणेच पंगती होऊन सर्वजण जमिनीवर अंग टाकत. गप्पा मारता मारता डोळा कधी लागे ते कळायचेही नाही.

कधीतरी मग जेवणानंतर शिकारीचा बेत ठरायचा. [कृपया हे वाचून पोलिसात वर्दी देऊ नये. आम्ही सांगू की आम्ही नैच केली शिकार म्हणून:)पुढे शिकारीच थोडस वर्णन आहे. कमजोर हृदयाच्या लोकांनी आणि ज्यांना शिकारी विषयी तिटकारा आहे त्यांनी वाचू नये) ]. मग मोठ्या दादाच्या ट्रॅक्स मधे जागा असेल त्याप्रमाणे माणसे ठुसुन भरली जायची. बंदुका सांभाळून ठेवल्या जायच्या आणि आम्ही मग खारेपाटणच्या नजीक असलेल्या जंगलात जायचो. वाघ सिंह नसायचे पण ससे, डुक्करे आणि तत्सम छोटे प्राणी असायचे. जंगलात पोचल्यावर गाडीच्या टपावर दोघे बंदुक घेऊन बसायचे. सशाचे डोळे गाडीच्या प्रकाशामुळे दिपायचे आणि ते मग गाडीसमोरून रस्ता क्रॉस करायचा प्रयत्न करायचे आणि कधी कधी आम्हाला अलगद मिळायचे. डुक्करे सहज मिळायची नाहीत. ते कानात दडे भरवणारे आवाज करायचे. पण मी असताना काही कधी डुककर मिळाले नाहीत. जर का शिकार झाली तर ती गाडीत टाकून आणली जायची आणि दुसर्‍या दिवशी मग मेजवानी असायची.

गावी बहुतेक लग्ने उन्हाळ्यात होत. सर्वांना असलेल्या सुट्ट्या हे त्यामागचे मूळ कारण होय. लग्नाची वर्‍हाडे ट्रक मधून जात. माझ्या लग्नाला माझे वर्‍हाड सुद्धा ट्रक मधून आले होते. माझ्या सासारच्या मंडळीणने ते बहुदा पहिल्यांदाच लाइव्ह पहिले होते :) जरी ते धोकादायक असले तरी त्यात एक वेगळी मजा होती. लग्न करून परतताना फक्त नवरदेव/ नवरी आणि करवल्या ट्रक च्या कॅबिन मध्ये बसायचे आणि बाकी सगळे मागे. मग तो ट्रक गावपसून थोड्या अलीकडे थांबायचा आणि तिथून वरात वाजत गाजत गावकडे निघायची. बनाठ्या फिरवणे, काठीच्या टोकाना आगी लावून फिरवणे, तोंडात रॉकेल भरून आग काढणे असले चित्तथरारक प्रकार केले जात. मग संपूर्ण गाव लग्नाच्या पंगतीत जेवायचा. गावात लग्न असले तर दुपार संध्याकाळ दोन्ही वेळ. लाउडस्पिकर वरुन 'कृपया जेवल्याशिवाय कोणीही घरी जाऊ नये' अशी अनाउन्स्मेंट केली जायची :) ही गाव जेवणे मात्र मोस्ट्ली गावातील पुरूष बनवत. बर्‍याच दिवसा अगोदर पासून रानातून वडाची पाने खुडुन आणून पत्रावळ्या बनवणे, साखरेच्या पुड्या बांधणे, पताका लावणे असली कामे केली जात. लग्नाच्या दिवशी अंगण शेणाने (हो शेणाने) सारवली जात. खरच मस्त दिसत ती शेणाने सारवलेली अन्गणे. कोणी पाहिली नसतील तर जमल्यास एकदा कोकणात जाऊन जरूर पहा. कसली मजा येई लग्नात. त्या साखरेच्या पुड्या मी किती खाई याचा हिशेबच नसे.

या धामधुमीत मग एक दीड महिना कसा निघून जाई याचा पत्ताच लागत नसे. टीवी नसल्याने काही एक बिघडत नसे. जर का असे भूर्रकन उडून जाणारे दिवस असतील तर टीवी हवाय कोणास. परतीचा प्रवास मात्र कमीत कमी माझ्यासाठी फार depressing असे. परत जाऊच नये असे वाटायचे. परत आल्यावर ते मुंबईतले लहान घर अजुनच लहान वाटायचे. पण जणू काही तो एक दीड महिना वर्षभर तगून राहायची energy देई. आता नोकरीला लागल्यापासून आणि गेली तीन वर्षे अमेरिकेत असल्यामुळे गावी जाणे काही झालेले नाहीय. तसच गावच राहणीमानही थोडे शहराळलय. पण तरीही गावी जायची ओढ ती आहेच. पाहु कधी योग येतो ते :(

Tuesday, August 4, 2009

खेड्यामधले घर कौलारू -1

अनिकेतच्या कोकणातल्या आठवणी वाचल्या माझ्या मनात निद्रिस्त असलेल्या कोकणातल्या आठवणी दाटून आल्या. तसा मी काही कोकणात जन्मलो वा वाढलो नाही पण दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत साधारण महिना दोन महिने आम्हा चाकरमान्यांचे कोकणात वास्तव्य असायचे. मी जन्मल्यापासून ते साधारण माझे ग्रॅजुयेशन संपेपर्यंत यात खंड पडला नाही.

मुंबई गोवा महामार्गावर विजयदूर्गला जायला जिथे फाटा फुटतो तिथे असलेले कासार्डे हे माझे गाव. आम्ही सख्खे चुलत मिळून 12 भाऊ आणि 6 बहिणी, त्यापैकी मी शेंडेफळ. त्यामुळे बहुतेक पुतणे / पुतण्या आणि भाचे भाच्या एकतर माझ्यापेक्षा वयाने मोठे नाहीतर माझ्या वयाचे होते :) मे महिन्यात सर्वांची कुटुंबे एकाच वेळी खाली फोटोत असणार्‍या घरात नांदत असत.


कधी मोजली नाहीत पण सहज 80-90 लोक उन्हाळ्याच्या सुट्टीत त्या घरात गुण्या गोविंदाने नांदत असत. मुंबईत केवळ लग्नाच्या वेळी दिसणार्‍या मोठाल्या टोपामध्ये त्या वेळी रोज दुपार संध्याकाळ इतक्या माणसांचे जेवण बने. रात्री झोपायला गावात कुणाच्याही अंगणात आडवे पडले तरी चालत असे. परवानगी मागण्याचा तर प्रश्नच नव्हता. गावातील सगळीच घरे आपलीच असल्याच्या थाटात सगळे गावकरी वागत. कुणाच्याही घरी कोणत्याही वक्ताला कुणीही जाऊ शकत असे. So called आगंतुक पाहुणा आणि यजमान कुणालाही त्यात काही वावगे आहे असे वाटत नसे.

मुंबईच्या त्या 10X20 च्या खुरड्यातून गावच्या त्या ऐसपैस घरात जायला जीव परीक्षेच्या अगोदरपासून आतुर व्हायचा.त्यात गावी जाणे हा एक मोठा event असायचा ज्याची तयारी साधारणपणे दोन एक महिने अगोदरपासून सुरू व्हायची. सगळ्यात महत्वाचे मिशन म्हणजे एस टी उर्फ लाल डब्ब्याची तिकिटे काढणे. त्या काळी कोरे झाली नव्हती. त्यासाठी वडील आणि भाऊ रात्रभर रिज़र्वेशन खिडकी पाशी रांगेत राहायचे. मग जायच्या आठवडाभर अगोदरपासून सामानाची बांधाबांध व्हयायची जी जायच्या मिनिटापर्यन्त चालू असायची. कुणी तिसर्‍या माणसाने पाहिले तर त्याला वाटेल की ही लोक हे घर सोडून दुसर्‍या घरात राहायला चाललीत इतके ते सामान असायचे. ते सामान आणि 10-12 माणसे कांजूरमार्ग ते ठाणे अथवा परेलपर्यंत मध्य रेलवे मधून सहीसलामत नेणे म्हणजे एक दिव्य असायचे आणि नंतर तेवढे सामान बस च्या टपावर चढवून सगळ्यांनी आपापल्या सीटवर बसणे हे त्याहून मोठे दिव्य असायचे. सगळ्यांना खिडकीजवळ जागा हवी असे, कारण बर्‍याच जणांना गाडी लागायची, त्यामुळे ती जागा सोइस्कर असायची :) मला मात्र ड्राइवर च्या मागची सीट आवडायची. रात्री बस मधले दिवे बंद झाले की मला रात्रभर समोरचा रस्ता बघायला कोण मजा यायची. मी आजही गावी जायच म्हटल तर कोकण रेलवे आणि वोल्वो पेक्षा एस टी लाच पसंती देईन. आयुष्यभर वोल्वो ने प्रवास करणार्‍या लोकांना कदाचित नाही कळणार एस टी च्या प्रवासातली मजा. कधी एस टी च्या प्रवासातल्या मजा सविस्तर लिहेन.

गावी पोचल्यावर पहिले एक दोन दिवस जो भेटेल तो 'काय चाकरमाण्यानू, कवा इलास' म्हणून विचारी. आम्ही त्याला किंवा तो आम्हाला ओळखत नसला तरी काही फरक पडत नसे. एक दोन दिवसात माझे समवयस्क भाचे / पुतणे /पुतण्या आले की खरी मजा सुरू होई. मुंबईत भल्या पहाटे नऊ वाजता उठणारा मी गावी मात्र सर्वांबरोबर सकाळी सहाला उठायचो. घरातल्या बायकांचा दिवस तर सकाळी चारच्या अगोदर पासून सुरू होई. उठल्यावर सगळ्या बाळगोपालांना उठवून एकत्र परसाकडे (शौचाला) जायचा कार्यक्रम असे. साधारणता 2000 सालापर्यंत आमच्या आणि कोकणातल्या बहुसंख्य गावांत निसर्ग हेच शौचालय असे. जाताना रस्त्यात असणार्‍या प्रत्येक आंब्याच्या झाडावर दगड मारुन 1-2 आंबे पाडून खाल्ल्याशिवाय कोणाचे पोट साफ होत नसे :)परत आल्यावर राखेने किंवा कोळशाने दात घासले जात. टूथपेस्ट ही तेव्हा चैनीची गोष्ट होती.असली तरी इतक्या लोकांमधे ती 1-2 दिवसात संपे. नंतर चहा नाश्ता होई. चहा शक्यतो बिन दुधाचाच असे.

साधारणतः 10-11 वाजता दोन वहिन्या आणि एखादी बहीण घरातल्या सगळ्या लोकांचे कपडे टोपल्यांमध्ये भरून नदीवर धुवायला नेत असत. इतक्या लोकांचे कपडे धुणे आणि जेवणाची भांडी घासणे ही महाकठीण कामे घरातल्या बायका लीलया पार पाडीत असत. पुरुषांनी घरकामात मदत करण्याइतपत समाज तेव्हा सुधारलेला नव्हता :) आदल्या दिवशी धुतलेल्या कपड्यांमधून आपले कपडे ओळखने मुश्कील ही नही नामुमकीन भी असे. खास करून सफेद बनियान. मग आपापल्या बनियानला रंगीबेरंगी धागे बांधून ठेवावे लागत. पण तेही फारसे टिकत नसत. बाय द वे आमच्यात बनियानला बॉडी म्हणतात. माझी बायको जेव्हा नवीन लग्न होऊन आली होती तेव्हा कुणीतरी कुणाला तरी विचारात होते की आमच्या अमक्या अमक्याची बॉडी बघलास खयसर (म्हणजे आमच्या अमक्या अमक्याची बनियान पाहिलित का कुठे?) माझ्या बायकोला वाटले की कोणीतरी कुणाची तरी डेड बॉडी शोधतय :)

बायका कपडे धुण्यासाठी नदीवर निघाल्या की आम्ही पोरटोर गुरांना नदीवर नेण्याच्या बहाण्याने नदीवर सटकत असू. वास्तविक पाहता गुरांना कुठल्या direction ची गरज नव्हती, पण आम्हाला नदीवर डुंबायला जाण्यासाठी काहीतरी बहाणा हवा असे. एकदा घर दिसेनासे झाले की गुरे आपणहून नदीकडे जात आणि आमचे पुन्हा आंबे, काजू पाडणे असले उद्योग चालू होत :) आयला कसला सॉलिड नेम होता आम्हा लोकांचा. चार पाच दगडात कितीही उंचावरचा आंबा पडलाच पाहिजे असा. मग अशीच मजल दरमजल करीत आम्ही नदीवर पोचायचो आणि धडा धड पाण्यात उड्या टाकायचो. नदीत विविध प्रकारची जनावर (अका साप) सुद्धा असायचे. नदीचे पाणी शांत असले की ते पाण्याच्या बाहेर डोकी वर काढून बसायचे. ते विषारी होते की बिनविषारी ते माहीत नाही पण आम्ही नदीत असताना मात्र आम्हाला ते कधी चावले नाहीत.

तास दीड तास मनसोक्त डुंबल्यावर परत घराकडे निघायचो. जाता जाता जमल्यास भिजलेले कपडे आमच्या घरातील बायकांकडे धुवायला द्यायचो. जाताना पुन्हा आंब्यांवर नेम धरणे ओघाने आलच कारण इतक्या लोकांच्या गदारोळात घरी पोटभर जेवायला मिळेलच याची शाश्वती नसायची. आम्ही इतके आंबे खायचो की महिन्याच्या अखेरीस आंबा तोंडाला लावला की दातातून शिरशिरी यायची. याला आम्ही दात आंबणे असे म्हणायचो. घरी आल्यावर गुरे परतली तरी आम्ही न परतल्याबद्दल आणि नदीत डुंबण्याबद्दल ओरडा मिळायचा. तो एका कानाने ऐकून दुसर्‍या कानाने सोडून देऊन जेवायला बसू. ते चुलिवरचे जेवण इतके रुचकर असे की आठवणीने आत्ताही माझ्या तोंडाला पाणी सुटलय.

[क्रमश:]

Saturday, August 1, 2009

होर्न ओके प्लीज़

एका टॅंकर च्या मागे लिहिलेल होत ,
कत्ल करो नजरो से तलवारो मे क्या रखा है
सफर करो टॅंकरो से कारो मे क्या रखा है :)

या ट्रक, लॉरी च्या मागे किती छान छान लिहिलेल असत नाही? हिंजवडिला आय टी पार्क कडे जाताना वाकड जवळ एक ट्रक बर्‍याचदा दिसतो. त्याच्या मागे लिहिलय

तेजस, वैशु, सचिन, रमेश, सुरेश, सायली, माया, चंदू
धन्य ते माता पिता

नावे नीट लक्षात नाहीत पण खरच त्या माता पित्यांना धन्य या पेक्षा दुसरी उपमाच देता येणार नाही.

सगळ्या ट्रक च्या मागे ' Horn OK Please' आणि 'मेरा भारत महान' असे का लिहिलेले असते हे मला आजतगायत न सुटलेले कोडे आहे. एकाने तर '100 मे से 80 बेईमान लेकिन फिर भी मेरा भारत महान' असे कटू सत्य लिहिले होते. मला ट्रक मागे लिहिलेले तत्वज्ञान् वाचायची सवयच जडली होती. ती सवय अमेरिकेत आल्यावरही कायम राहिली होती. ही पहा इकडची थोडी सुभाषिते :)

JESUS LOVES YOU
Everyone else thinks you are an a****le :)

I got this truck for my wife
Thought it was a pretty good trade

WIFE and DOG missing
REWARD FOR DOG

तसेच रस्त्यावर धोक्याची सूचना देणारे फलकही मजेदार असतात. हिमाचल मध्ये कुठेतरी हा फलक दिसेल
Please be soft on my curves
they are dangeorous
खाली अजुन काही साइन्स दिली आहेत.

Speed is a 5 letter word so is death
Slow is a 4 letter word so is life

Be Mr late
than LATE Mr.

Mind your brakes
or break your mind

घरी तुमची वाट पहात आहेत
तुमच्या अपघाताच्या बातमीची नाही

चला तर तुमच्याकडेही असली काही साइन्स असतील तर मला सांगा बघू.....