Friday, November 6, 2009

डबलढोलकी!!!

’मराठी माणसाने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला’ असे सामना ने कधीच म्हटले नाही (वाचा: http://saamana.com/2009/Nov/06/Index.htm पुन्हा भरती येईल). बहुतेक साहेबांची स्मरणशक्ती वयोमानानुसार खालावत चालली आहे. हा पहा त्याचा पुरावा (वाचा: http://saamana.com/2009/Oct/24/Index.htm अग्रलेख: बस्स झाले ते झाले). सर्व लेख वाचायचा कंटाळा आला असेल तर फ़क्त "...पण तरीही ज्या मराठी माणसासाठी शिवसेनेने ४४ वर्षे रान उठवले तो मराठी माणूसही निवडणूकीत शिवसेनेकडे पाठ फिरवील व पाठ फिरवतानाच आमच्या पाठीत खंजीर खुपसेल असे आम्हाला कधीही वाटले नव्हते.." एवढेच वाचा. एवढा ढळढळीत पुरावा, अन तोही सेनेच्याच मुखपत्रात असताना आम्ही असे म्हटलेच नाही असे माजी सेनाप्रमुख कसे म्हणू शकतात?

आता या स्टेट्मेंट्चा मोठा issue करण्याची काही गरज नाहीय पण बाळासाहेबांनी जे म्हटलय ते स्वीकारून गरज पडल्यास मराठी माणसाची माफ़ी मागायला हवी होती. अर्थात त्यांच्याकडून माफ़ीची अपेक्षा त्यांच्यावर प्रेम करणारा मराठी माणूस करत नाहीय, पण जे म्हटलय ते वाघाच्या काळजाने छातीठोकपणे स्वीकारले असतं तर त्यांच्याबद्दलचा आदर नक्कीच दुणावला असता.

बहुतेक शिवसेनेची, विशेषत: शिवसेनेच्या नेत्यांची पराभवानंतर खिलाडूवृत्तीने पराभव स्वीकारण्याची मानसिकताच जणू नाहीशी झालीय. उद्धव तर पराभवानंतर ३-४ दिवस अज्ञातवासात गेले. काय अर्थ काढायचा याचा शिवसेनेवर विश्वास ठेवणाऱ्या माणसाने? कमीत कमी मिडियासमोर येऊन आपण १-२ दिवसांत यावर आपले मत व्यक्त करू इतके तरी सांगावयास हवे होते. बरं येऊन मत मांडलं काय तर म्हणे आमचा पराभव झाल्लाच नाही. पराभवाचे मुख्य कारण काय तर मनसे. अरे लोकसभेला तेच सांगितलात ना? पुन्हा सगळ्या प्रचारात तोच राग आळवलात ना? मनसेचं अस्तित्व मान्य करून का नाही केलीत मोर्चेबांधणी? सेनेची मोर्चेबांधणी हा दुसराच विषय आहे. उत्तर भारतीय उमेदवार उभे करणे, जुन्या जाणत्या नेत्यांचा पत्ता कट करून नवनवीन ’आदेश’ देणं, लोकसभेत मनसेला मते देणारी लोक पुन्हा मनसेला मतदान करणार नाहीत या भ्रमात राहणं. अशी मोर्चेबांधणी झाल्यावर मोर्चा पडायला कितीसा वेळ लागणार. अर्थात म्या पामराने राजकारणाबद्दल शिवसेनेस काय शिकवावे, पण उघड्या डोळ्यांनी ज्या गोष्टी माझ्यासारख्या सामान्य माणसाला दिसल्या त्या सेनेच्या नेत्यांना दिसू नयेत याच आश्चर्य वाटतय.

अजूनही वेळ गेली नाहीय, म्हणजे तशी ती या विधानसभेत गेलीय निघून, पण पुढच्या निवडणूकीसाठी पूर्ण पाच वर्षे आहेत अजून. तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केलेली कामे वादातीत आहेत. मनसे पक्षामुळे मते विभागली गेली आहेत याबद्दल दुमत नाही, पण ती का विभागली गेलीत याच्याकडे लक्ष द्या. राज यांनी केलेल्या राजकीय टीकेकडे लक्ष द्या (रिलायन्स वर मोर्चा न्यायचा अन रिलायन्सच्याच जाहिराती सामनात छापायच्या, मराठी पाट्यांसाठी सेनेच्या काळात सेनेनं सक्ती न करणं वगैरे वगैरे). यापुढे मनसे पक्षाचे अस्तित्व मान्य करा अन त्यांच्यावर टीकाटिपण्णी करण्यात वेळ घालवू नका. मनसेने केवळ मराठी अस्मितेचा मुद्दा (जो कधीकाळी सेनेचा होता) लावून धरून एवढं यश संपादित केलय, तुम्ही मराठी अस्मितेबरोबर मराठी माणसाचे दैनंदिन जीवनातले मुद्देही लावून धरा.

४४ वर्षांचा पक्ष ४९ व्या वर्षात हाफ़ सेन्चुरीही पूर्ण न करता आऊट झालेला पाहायचा नाहीय आम्हाला.

4 comments:

Ajay Sonawane said...

तु़झ्या मताशी पुर्णपणे सहमत, मला ही समजत नाही की मनसे च अस्तित्व खुद्द शरद पवार मान्य करतात तर शिवसेना का नाही? राज जशी राजकारणात प्रगल्भता दाखवितो तशी उदधव का नाही दाखवत ? मराठीचा मुद्दा शिवसेनेचा होता हे मान्य आहे पण मग तुम्हाला हे आता सांगाव का लागत आहे ? याच कारण तुम्ही हा मुद्दा जेवढ्या जोराने आताच्या घडीत लावुन धरायला हवा होता तेवढा लावून धरला नाही. यूपी बिहारी ना डोक्यावर कुणी बसवलं , शिवसेनेनीच. मराठी माणसाला हे सगळ याच्या अगोदर ही कळत होतं पण त्याच्याकडे जोपर्यंत राजचा पर्याय समोर येत नव्हता तो पर्यंत तो शिवसेनेलाच मत देत होता.
तुझं विवेचन आवडल.

-अजय

सिद्धार्थ said...

शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनेला काय झालाय तेच कळत नाही. बोलतात एक आणि करतात भलतचं. मराठी मराठी म्हणताना तिकीट मात्र संजय निरुपमला दिले. आदेश बांदेकरला काय म्हणून उभे केले हे आज देखील कळले नाही. अरे काय पैठण्या वाटायच्या होत्या. मराठी माणूस अजूनही शिवसेनेला मत देईल पण त्यासाठी राज ठाकर्‍या सारखे खंबीर नेतृत्व हवे, जे शक्य वाटत नाही. हे जर असेच चालू राहीले तर शिवसेनेचे भविष्य काही ठीक दिसत नाही.

Photographer Pappu!!! said...

अजय सिद्धार्थ, दोघांनाही अनुमोदन. याच मार्गावर सेना जात राहिली तर सेनेच्या विनाशाचा दिन दूर नाही.

HAREKRISHNAJI said...

Noting New