Wednesday, September 2, 2009

साक्षरता निर्मूलन

दिड आठवड्याच्या मस्तपैकी सुटटीमुळे काही पोस्ट करता आलं नव्हतं, त्यामुळे क्षमस्व ( वाचक माझ्या पोस्ट्स ची आतुरतेने वाट बघतात अशातला काही भाग नाहीय, पण असं लिहिलं कि स्वत:लाच कसं बरं बरं वाटतं :) ). टॉपिक वर जास्त लक्ष देऊ नका. कळेलच का दिलाय असला उरफाटा टॉपिक :)

काही दिवसांपूर्वी ’आयुष्यावर बोलू काही’ च्या ५०० व्या प्रयोगात ’निशाणी डावा अंगठा’ या चित्रपटातील एक गाणं सादर करण्यात आलं होतं. apalimarathi.com वर हा चित्रपट पाहण्याचा योग आला. सरकारतर्फे तीन वर्षे गावा गावांत राबवण्यात आलेला प्रौढ साक्षरता कार्यक्रम आणि त्यासाठी हक्काच्या दावणीला बांधलेल्या गुरांची अर्थात शिक्षकांची होणारी ससेहोलपट या बद्द्ल हा चित्रपट आहे. निरक्षर शोधणे, सकाळ दुपार मुलांची शाळा चालवून रात्री ८ ते १० मोबदला न घेता हे साक्षरतेचे वर्ग घेणे या सर्व जबाबदाऱ्या शिक्षकांवरच टाकण्यात आलेल्या असतात. तीन वर्षांत एकही निरक्षराला साक्षर न करता आल्यामुळे बहिर्मुल्यमापनावेळी (स्पेलिंग बरोबर आहे ना) ते शिक्षक आणि गावकरी कशी वेळ मारुन नेतात याचं विनोदी ढंगाने चित्रण करण्यात आलय. काही अपवाद वगळता हा चित्रपट एकदा बघणेबल झालाय.

या लेखाचा हेतू चित्रपट परिक्षण हा नसून त्या निमित्त तशाच जुन्या आठवणी चाळवणे हा आहे. मी बहुतेक पाचवीला असताना आमच्या शाळेतर्फेसुद्धा साक्षरता अभियान राबवण्यात आले होते. पाचवीला पुजल्याप्रमाणे सरकारने शाळांना, शाळेंनी शिक्षकांना आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या कामाला जुंपले होते. या अभियानासाठी माझ्यासारख्या हुशार मुलांची निवड करण्यात आली होती. साक्षरता अभियानाचे निरक्षरता निर्मुलन हे ध्येय होते. या बाबतीत माझा नेमका घोळ व्हायचा. कुठले तरी शिक्षणमंत्री या अभियानाचे इन्स्पेक्टर म्हणून आले असताना आमच्या मुख्याध्यापकांनी लंबे चौडे भाषण ठोकुन भाषणाच्या मधेच विचारले होते,
" तर सांग पाताडे, आपण कुठलं अभियान करतोय आणि त्याचं ध्येय काय?"
" निरक्षरता अभियान अन त्याचे साक्षरता निर्मुलन हे ध्येय.." - द ग्रेट पाताडे उत्तरले.
नशिबाने त्या अभियानाचे धोरण बदलण्याचा मला प्रसाद खावा लागला नव्ह्ता. आता या साक्षरता अभियानासाठी निरक्षर शोधणं हा मोठा प्रॉब्लेम होता. म्हमै सारख्या शहरात निरक्षर आणायचे कुठून? तरी नशीबाने माझ्या मित्राची आजी निरक्षर होती. व्हय नाय करत म्हातारी एकदाची शिकायला तयार झाली होती. एक आठवडा घातल्यानंतर म्हातारीला अ लिहायला येवू लागला. माझे शिकवण्याचे आणि म्हातारीचे शिकण्याचे patience संपले होते. शाळेतर्फे बऱ्याच दिवसात या बद्दल न विचारल्याने एका दिवशी माझं शिकवणं आणि म्हातारीचं शिकणं थांबलं. त्यानंतर काहीच झालं नाही.

आज जेव्हा विचार करतो, तेव्हा असं वाटत की काय मिळवलं सरकारनं कर भरणाऱ्या लोकांचा पैसा असा उधळून? काय फायदा होणार होता ह्या म्हाताऱ्यांना शिकवून ? कुठे नोकरी धंदा करणार होते? कुठलाही मोबदला न देता शिक्षकांना या कामाला जुंपणं कितपत योग्य? हे अभियान संमत करण्याअगोदर तेव्ढ्या बजेट मध्ये किती गरजू विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं असतं याचा कुणीच विचार केला नव्ह्ता? मुंबईत किती साक्षर झाले ते माहित नाही पण एके दिवशी बातमी आली कि सिंधुदुर्ग जिल्हा १०० % साक्षर झाला म्हणून. ही गोष्ट साधारण १९८७ मधील असेल. आजही मी कमीत कमी १००० स्थलांतर न केलेले निरक्षर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखवू शकतो. त्यावरून अजून एक आठवलं. दोन तीन दिवसापूर्वी सकाळ मध्ये एक news प्रसिद्ध झाली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नववीतल्या १४७१६ मुलांना मोफत लॅपटॉप वाटण्यात येणार आहेत म्हणून. अरे काय चालवलय काय? काय करणार आहेत नववीची मुलं लॅपटॉप घेऊन? आणि फक्त नववीचीच का? दहावी अकरावीची का नाहीत? किंवा जी मुले पदवीधर होऊन नोकर्‍या शोधायला बाहेर पडतील ती का नाहीत? संगणक प्रशिक्षणच द्यायचे असेल तर तेवढ्या लॅपटॉपच्या किमतीत नवीन किंवा जुने डेस्कटॉप घेऊन पुर्ण सिंधुदुर्ग जिल्हा संगणक साक्षर करता आला असता. ज्याने हा प्रकल्प मंजूर केला त्याला माझ्या मते लॅपटॉप आणि डेस्कटॉप यातला फरकही कळत नसणार. ज्याची लायकी नाही ती माणसे पदावर बसतात. खेळाडू नसलेले क्रिडामंत्री काय होतात, अंगठेबहाद्दर शिक्षणमंत्री काय होतात, कशाला कशाचाच मेळ नाही. वाईट या गोष्टीचं वाटतं कि यांना आपणच निवडून देतो. ऑप्शन्सच नसतील तर आपण तरी काय करणार म्हणा. नो वंडर तरुण पीढी निवडणुकांवर बहिष्कार टाकते.

चला लेख कुठेतरी भरकटत चाललाय. लेखाला सुरूवात केली तेव्हा आता जे उतरलय पोस्ट मध्ये ते सांगायचे नव्हते आणि नक्की काय सांगायचे आहे ते नेमके आता सुचत नाहीय. पब्लिश करणार नव्हतो, पण कि बोर्ड वर दिड तास टकटकाट केलाय म्हणून पब्लिश करतोय. क्रुपया गोड मानून घ्या.

3 comments:

मीनल said...

he he..टकटकाट changala zalay.. :)

Unknown said...

good 1 boss.....govt.budget allocate karayala certified PMP appoint karayachi veel aahe!!

Satish Gawde said...

" निरक्षरता अभियान अन त्याचे साक्षरता निर्मुलन हे ध्येय...

पाताडे तुम्ही खरंच ग्रेट आहात :)

बाय द वे, मीही मागच्या रविवारी "निडाआ" अर्धवट पाहीला. मकरंद अनासपुरे कसाबसा झेपला पण निर्मिती सावंतची एंट्री झाली आणि मी "आपली मराठी" ची खिडकी बंद केली.

तू या दोघांचा पंखा असशील तर हलकेच घे :)