Tuesday, April 24, 2012

तूफान - ए - तेंडूलकर

सचिन रमेश तेंडूलकर उर्फ देवबाप्पांचा आज वाढदिवस. तसं मी त्याला शब्द्श: देवत्व बहाल करत नाहीय पण २२+ वर्षांची दैदिप्यमान कारकिर्द, १०० १००, अगदी श्रीकांत, अझर च्या खांद्याला खांदा लावून मैदान गाजवण्यापासून त्याच्या पदार्पणात अगदी लंगोटात असणाऱ्या वा जन्मालाही न आलेल्या खेळाडूंच्या खांद्यावर कौतुकाची थाप मारत त्यांच्यापेक्षा तसूभरही कमी नसलेल्या कारकिर्दीच्या मालकाकडे दैवी शक्ती नसेल यावर कुणाचा कसा विश्वास बसावा.

आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या एका ’तुफानी’ खेळीची सकाळपासून आठवण येत होती. म्हटलं की त्याच निमित्ताने २०१२ मधली आपली पहिला रन (उर्फ पहिली पोस्ट) काढावी.

नेमेची येतो पावसाळा प्रमाणे नेहमी प्रमाणे भारताला फायनलला पोहोचण्यासाठी ह्याने त्याला इतक्या रनरेटने हरवलं, त्याने ह्याला नाही हरवलं असली क्लिष्ट आकडेमोड करत ऑस्ट्रेलियाने केलेल्या २८४ धावांपैकी २५२ धावा करायच्या होत्या. ऑस्ट्रेलियाची बॅटिंग चालू असताना आम्ही गल्लीत तुफानी बॅटिंग करून घेतली. घरी गेल्यावर टीव्ही वर पाहिलं तर बेव्हन नेहमीप्रमाणे झोडत होता. बहुतेक शेवटच्या बॉलवर चौकार मारून त्याने शतक पूर्ण केलं होतं.

२८४ बघून आता कसले जिंकतोय आणि फायनलल जायला कसले २५२ करतोय असं वाटायला लागलं होतं. भारताने जवळपास ३० षटकात १३८ वर ४ विकेट पाडून हमारा शक जवळपास यकीन मे बदलवला होता. तेवढ्यात त्या मैदानाच्या दिशेने एक वादळ आलं. खेळ थांबला. सगळे खेळाडू त्या वादळाची धूळ डोळ्यात जाऊ नये म्हणून प्रयत्न करत होते. कुणी टोपी डोळ्यासमोर धरत होते तर कुणी टी-शर्ट ने चेहरा झाकत होते. कुणीतरी एकाने तर कुला वर करून मैदानावरच बसकण मांडली होती. तेवढ्यात कॅमेरा सचिनकडे वळला. तो एक हात कमरेवर ठेवून दुसऱ्या हाताने बॅट धरून तो वादळाच्या डोळ्यात डोळे भिडवून उभा होता. जणू त्याला सांगत होता, बस्स, इतकीच तुझी शक्ती?? आता बघच, तूफान - ए - तेंडूलकर काय असतं ते.

खेळ सुरू झाला तेव्हा टारगेट बदललं होतं. आता जिंकण्यासाठी ४६ षटकांत २७६ धावा करायच्या होत्या तर फायनलला जाण्यासाठी २३७ धावा करायच्या होत्या. सचिनच्या साथीला त्यावेळी व्हेरी व्हेरी नवीन असलेला लक्ष्मण होता. सचिनच्या बॅटमधून चेंडू गोळीसारखे निघू लागले होते. जिथे चौकार जाईल तिथे त्याने षटकार ठोकले, २ धावांच्या जागी चेंडूला सीमापार पाठवले आणि जिथे १ धाव होती तिथे धावून २-२ धावा घेतल्या. सहास सचिन मैदानावर शांत असतो पण एकदा कॉल दिल्यावर धावला नाही म्हणून तो कधी नाही तो त्या लक्षमणवरही तो ओरडला. त्याकाळी २०-२० आलं नव्हतं. षटकामागे ९-१० चा रनरेट त्याकाळी अशक्य वाटायचा. गावस्कर म्हणाला की आता लिट्ल मास्टरही ही मॅच भारतासाठी जिंकू शकणार नाहीय. त्यांनी गपचूप २३७ वर लक्ष केंद्रीत करावं. पण सच्याचा इरादा वेगळाच होता. २३७ च लक्ष तर कधीच पार झालं होतं. आता तो २७६ पार करायच्या इराद्याने खेळत होता. पण त्याचवेळी भारताचा सुख दु:खाचा साथी स्टीव बकनर धावून आला. (हा @#$@#$ नसता तर सचिनचं १०० १०० कमीत कमी दोन वर्ष अगोदर पूर्ण झाले असते.) ह्या माणसाने जो चेंडू नो बॉल आहे हे एखादं शेंबडं पोरही सांगू शकलं असतं त्या चेंडूवर सचिनला झेलबाद दिलं.

सचिन १४३ धावांवर बाद झाला तेव्हा ३ षटकात ३४ धावा हव्या होत्या, पण लक्ष्मण आणि कानिटकरांच्या ह्रुषिकेशने फक्त ८ धावा जमवल्या त्याही एकही चौकार/षटकार न मारता. ही मॅच हरल्याची परतफेड सचिनने बरोबर दोनच दिवसात फायनल जिंकून करून दिली. स्टीव वॉ ने आम्ही एका ग्रेट प्लेयर कडून हरलो आहोत असं म्हणत उरलेल्या संघाची चार चौघात उतरवली होती. आज सचिनच्या वाढदिवसानिमित्त त्याला इतकच सांगण आहे की सचिन जे लोक तुला निवृत्त व्हायला सांगत आहेत त्यांच्याकडे लक्ष न देता असाच खेळत राहा. ज्या दिवशी तू निवृत्ती जाहीर करशील त्याच दिवशी मी देखील क्रिकेट बघण्यापासून निवृत्ती जाहीर करणार आहे.

त्या सामन्याचा धावफलक इथे पाहता येईल. http://www.espncricinfo.com/ci/engine/match/65773.html

No comments: