Tuesday, April 24, 2012

तूफान - ए - तेंडूलकर

सचिन रमेश तेंडूलकर उर्फ देवबाप्पांचा आज वाढदिवस. तसं मी त्याला शब्द्श: देवत्व बहाल करत नाहीय पण २२+ वर्षांची दैदिप्यमान कारकिर्द, १०० १००, अगदी श्रीकांत, अझर च्या खांद्याला खांदा लावून मैदान गाजवण्यापासून त्याच्या पदार्पणात अगदी लंगोटात असणाऱ्या वा जन्मालाही न आलेल्या खेळाडूंच्या खांद्यावर कौतुकाची थाप मारत त्यांच्यापेक्षा तसूभरही कमी नसलेल्या कारकिर्दीच्या मालकाकडे दैवी शक्ती नसेल यावर कुणाचा कसा विश्वास बसावा.

आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या एका ’तुफानी’ खेळीची सकाळपासून आठवण येत होती. म्हटलं की त्याच निमित्ताने २०१२ मधली आपली पहिला रन (उर्फ पहिली पोस्ट) काढावी.

नेमेची येतो पावसाळा प्रमाणे नेहमी प्रमाणे भारताला फायनलला पोहोचण्यासाठी ह्याने त्याला इतक्या रनरेटने हरवलं, त्याने ह्याला नाही हरवलं असली क्लिष्ट आकडेमोड करत ऑस्ट्रेलियाने केलेल्या २८४ धावांपैकी २५२ धावा करायच्या होत्या. ऑस्ट्रेलियाची बॅटिंग चालू असताना आम्ही गल्लीत तुफानी बॅटिंग करून घेतली. घरी गेल्यावर टीव्ही वर पाहिलं तर बेव्हन नेहमीप्रमाणे झोडत होता. बहुतेक शेवटच्या बॉलवर चौकार मारून त्याने शतक पूर्ण केलं होतं.

२८४ बघून आता कसले जिंकतोय आणि फायनलल जायला कसले २५२ करतोय असं वाटायला लागलं होतं. भारताने जवळपास ३० षटकात १३८ वर ४ विकेट पाडून हमारा शक जवळपास यकीन मे बदलवला होता. तेवढ्यात त्या मैदानाच्या दिशेने एक वादळ आलं. खेळ थांबला. सगळे खेळाडू त्या वादळाची धूळ डोळ्यात जाऊ नये म्हणून प्रयत्न करत होते. कुणी टोपी डोळ्यासमोर धरत होते तर कुणी टी-शर्ट ने चेहरा झाकत होते. कुणीतरी एकाने तर कुला वर करून मैदानावरच बसकण मांडली होती. तेवढ्यात कॅमेरा सचिनकडे वळला. तो एक हात कमरेवर ठेवून दुसऱ्या हाताने बॅट धरून तो वादळाच्या डोळ्यात डोळे भिडवून उभा होता. जणू त्याला सांगत होता, बस्स, इतकीच तुझी शक्ती?? आता बघच, तूफान - ए - तेंडूलकर काय असतं ते.

खेळ सुरू झाला तेव्हा टारगेट बदललं होतं. आता जिंकण्यासाठी ४६ षटकांत २७६ धावा करायच्या होत्या तर फायनलला जाण्यासाठी २३७ धावा करायच्या होत्या. सचिनच्या साथीला त्यावेळी व्हेरी व्हेरी नवीन असलेला लक्ष्मण होता. सचिनच्या बॅटमधून चेंडू गोळीसारखे निघू लागले होते. जिथे चौकार जाईल तिथे त्याने षटकार ठोकले, २ धावांच्या जागी चेंडूला सीमापार पाठवले आणि जिथे १ धाव होती तिथे धावून २-२ धावा घेतल्या. सहास सचिन मैदानावर शांत असतो पण एकदा कॉल दिल्यावर धावला नाही म्हणून तो कधी नाही तो त्या लक्षमणवरही तो ओरडला. त्याकाळी २०-२० आलं नव्हतं. षटकामागे ९-१० चा रनरेट त्याकाळी अशक्य वाटायचा. गावस्कर म्हणाला की आता लिट्ल मास्टरही ही मॅच भारतासाठी जिंकू शकणार नाहीय. त्यांनी गपचूप २३७ वर लक्ष केंद्रीत करावं. पण सच्याचा इरादा वेगळाच होता. २३७ च लक्ष तर कधीच पार झालं होतं. आता तो २७६ पार करायच्या इराद्याने खेळत होता. पण त्याचवेळी भारताचा सुख दु:खाचा साथी स्टीव बकनर धावून आला. (हा @#$@#$ नसता तर सचिनचं १०० १०० कमीत कमी दोन वर्ष अगोदर पूर्ण झाले असते.) ह्या माणसाने जो चेंडू नो बॉल आहे हे एखादं शेंबडं पोरही सांगू शकलं असतं त्या चेंडूवर सचिनला झेलबाद दिलं.

सचिन १४३ धावांवर बाद झाला तेव्हा ३ षटकात ३४ धावा हव्या होत्या, पण लक्ष्मण आणि कानिटकरांच्या ह्रुषिकेशने फक्त ८ धावा जमवल्या त्याही एकही चौकार/षटकार न मारता. ही मॅच हरल्याची परतफेड सचिनने बरोबर दोनच दिवसात फायनल जिंकून करून दिली. स्टीव वॉ ने आम्ही एका ग्रेट प्लेयर कडून हरलो आहोत असं म्हणत उरलेल्या संघाची चार चौघात उतरवली होती. आज सचिनच्या वाढदिवसानिमित्त त्याला इतकच सांगण आहे की सचिन जे लोक तुला निवृत्त व्हायला सांगत आहेत त्यांच्याकडे लक्ष न देता असाच खेळत राहा. ज्या दिवशी तू निवृत्ती जाहीर करशील त्याच दिवशी मी देखील क्रिकेट बघण्यापासून निवृत्ती जाहीर करणार आहे.

त्या सामन्याचा धावफलक इथे पाहता येईल. http://www.espncricinfo.com/ci/engine/match/65773.html

Tuesday, November 22, 2011

झोप!!!!!

शनिवारी रविवारी वा एखाद्या लाँग विकेंडला जर का कुठे भटकंतीचा बेत नसेल तर जास्तीत जास्त कसं काय झोपता येईल याचाच विचार मनात असतो. तशी माझी झोप म्हणजे कुठेही खुट्ट झालं कि डोळे खाडकन उघडणारी त्यामुळे गाढ झोप येणारयांची मला जरा असुयाच वाटते. पण तरीही झोपणे हा माझा फेवरेट टाईमपास आहे :) तसंच एकदा झोपल्यावर पुढच्या दिवशी मी अलार्म न लावताही उठू शकतो. म्हणजे तसा मी अलार्म लावतोच आणि अलार्म वाजायच्या २ मिनिटं अगोदर उठून तो वाजल्यावर स्नूझ करून पुन्हा १०-10 मिनिटं झोपतो. असं जवळपास ४-५ वेळेला झाल्यावर एकदाचा उठतो. गरज पडल्यास रात्री कितीही वेळ मी जागू शकतो पण सकाळी उठण्यासाठी तितकंच सॉलिड आमिष असल्याशिवाय उठणं शक्यच नाही. लहान असताना सुद्धा घरचे परीक्षेचा अभ्यास करायला भल्या पहाटे उठवायचे पण पुस्तकातले काही दिसले असेल तर शप्पथ. एक वाक्य वाचता वाचता मन ब्रम्हांडाच्या चार फेऱ्या मारून यायचं पण पुस्तकातले ते एक वाक्य काही डोक्यात घुसायचे नाही. नशिबाने शाळा घराच्या जवळच होती. धावत जास्तीत जास्त २ मिनिटांत मी शाळेत पोहोचायचो. ७ ला शाळा भरून प्रार्थना वगैरे होऊन ७:३० ला सुरु व्हायची आणि मी ६:३५ ला उठून अंघोळ करून तयार होऊन चहा पिऊन ७ च्या जरा अगोदरच शाळेत पोचायचो.

कामानिमित्त बंगलोरला असताना एक रूम आम्ही तिघांनी मिळून शेअर केला होता. तिघंही एकाच ऑफिस मध्ये असल्यामुळे एकत्रच निघायचो. त्यामुळे आम्ही रोज पहिलं, दुसरं कोण उठणार याचे दिवसच ठरवून ठेवले होते. एखाद्याच्या पहिलं उठायच्या दिवशी सुट्टी आली तर तो लकी. मी व्यवस्थित उठून तयार व्हायचो पण हे दोघं #$#@ कधीच XX वर लाथा खाल्याशिवाय उठायचेच नाहीत. त्यांना रोज उठवून ते तयार होईपर्यंत मी पुन्हा झोपायचो :) शुक्रवारी रात्री ऑफिस नंतर सिनेमे बघून डीनर करून कमीत कमी ४०-५० किमी मोटरसायकल वर चढवल्यावर कधीतरी पहाटे ३-४ वाजता आम्ही झोपायचो. शनिवारी दुपारी १-२ च्या सुमारास कधीतरी पोटातल्या कावळ्यांनी चोची मारून उठवल्यावर उठायचो. सुखसागर मध्ये जाऊन मस्त पैकी एक थाळी आणि एक लस्सी मारून परत यायचो. दुवायचे कपडे सर्फ एक्सेल मध्ये गरम पाण्यात बुडवायचो आणि पुन्हा तंगड्या वर करून ताणून द्यायचो ते पुन्हा सात आठ वाजल्याशिवाय उठायचो नाही. मग भिजत टाकलेले कपडे साफ पाण्यातून खंगाळून काढून सुकत टाकायचे आणि पुन्हा रात्रीचे भटकायला मोकळे. रविवारी शक्यतोवर दुपारी न झोपण्याचा प्रयत्न करायचो, पण डोळे हे जुलमी गडे, ते ऐकायचेच नाहीत.

अमेरिकेत आल्यावर सुद्धा शक्यतोवर मी झोपायचा प्रयत्न करतो परंतू लग्नानंतर वाढलेल्या प्रापंचिक जबाबदारीमुळे वाटेल तेवढे झोपता येत नाही. त्याचा साइड इफेक्ट म्हणून ६ वर्षानंतर सुद्धा माझा जेटलॅग कायम आहे. दुपारी असली झोप येते म्हणून सांगू. पण पापी पेट का सवाल असल्यामुळे जुलमी डोळ्यांच्या पापण्यांना एकमेकांना भेटू न देण्याची कसरत करावी लागते. या झोपेचा अजून एक पैलू म्हणजे झोपल्यावर पडणारी स्वप्नं. सुरुवातीची काही वर्ष माझ्या मेलच्या सिग्नेचर Your future depends on your dream वा झोप आहे तर होप आहे अशा असायच्या:) मागे कुणाचा तरी झोपेवराचा लेख वाचत होतो. त्यात लेखिकेच्या भावाला त्याचे वडील उठवत होते तर तो पठ्ठ्या वडीलांना म्हणतो कसा, " बाबा अजून पाचच मिनिटं, स्वप्न पडतंय.." :) तर अशी स्वप्न मला रोज रात्री न चुकता पडतात आणि शेंडा ना बुडखा असलेल्या या स्वप्नांचा सिनेमा मी मस्त एन्जॉय करतो. ४-५ दिवसांपूर्वीच मला एक सॉलिड स्वप्न पडलं होतं. भगतसिंग, सुभाष चंद्र बोस, महात्मा गांधी, अण्णा हजारे आणि मी एकाच तुरुंगात आहोत. तुरुंगात गप्पागोष्टी करताना भगतसिंग त्यांची hat तर सुभाष बाबू त्यांचा चष्मा मला भेट म्हणून देतात आणि या दोन्ही गोष्टी मी ebay वर विकतो :)

काही वर्षापूर्वी मला सगळी स्वप्नं जशीच्या तशी लक्षात राहत. अगदी मध्येच डोळे उघडले आणि मी ते पुन्हा मिटले तर तेच स्वप्न पुढे कंटिन्यू पण होई. पण आजकाल (बहुतेक वय वाढत चालल्याने) ती लक्षात राहत नाहीत. पण तरीही माझा जोपायाचा उत्साह काही कमी झालेला नाही. आता ४ दिवसांचा thanksgiving चा विकेंड आहे. चार दिवसांपैकी कमीत कमी ३ दिवस झोपायचा बेत आहे. बघुया कितपत शक्य होतंय ते :)

Tuesday, May 10, 2011

जय बजरंगा हुप्पा हुय्या !!!!

"काय रे तुका आव्स बापूस खाव्क घालित नाय काय"

"ह्येची हाडाची काडा नी **चा तुनतुना"

"अर्रे बाबा, जास्त धावूबिवू नुको, वाऱ्यान उडान जाशी..."


घरी येणाऱ्या अतिथी देवोभवांकडून अशी अनेक मुक्ताफळे ऐकल्यावर आपण लाईट्वेट चॅम्पियन असल्याबद्दल स्व:ताचा खूप राग येई. भरपूर पेट्रोल पिऊनही १५ च्या स्पीडने जाणाऱ्या गाडीसारखी आमची बॉडी. कितीही खा पण अंगावर चरबी चढायची नाही म्हणजे नाही. व्यायामाच्या नावाने आनंदच होता. एक तर आमच्या खानदानाची हाताच्या बोटावर मोजण्याइतकी संपत्ती असल्यामुळे जिम परवडायची नाही आणि दुसरं म्हणजे पायावर डंबल पडला तर काय घ्या त्यामुळे जिमच्या वाट्याला गेलोच नाही. नाही म्हणायला उन्हाळ्याच्या सुट्टीत लवकर उठून जॉगिंगला जाणं हा व्यायाम दरवर्षी व्हायचा. पण कडका असलो तरी कोणी माझ्याशी मारामारी करायच्या भानगडीत पडायचा नाही. समोरचा माझ्यापेक्षा चारपटींनी असला तरी मी त्याला बुकलून काढायचो. कडका आहे पण काय सॉल्लिड मारामारी करतो असं जेव्हा मित्र म्हणायचे तेव्हाच काय ते अंगावर मूठभर मांस चढायचं.

कोणी सांगितलं कि कराटे केले की समोरच्याला मारता पण येतं आणि ऑटोमॅटिकली बॉडी पण बनते. शाळेत कराटे स्वस्त दरात शिकवायचे म्हणून कराटे मध्ये नाव घालायचं ठरवलं तर आमच्या मातोश्रीनी "कराटे करशी नी आमकाच तंगडी घालून पाडशी" म्हणून परवानगी नाकारली. शेवटी हो ना करता एकदा कराटेला जायची परवानगी मिळाली. २ वर्षे हू हा करून अर्ध्या फूटाने उंची, ५-६ किलोमीटर पळण्याचा स्टॅमिना आणि एक नारंगी पट्टा एवढी कमाई केली पण अंगावरची चरबी जैसे थे. कराटे डोक्यात जायला लागले होते. शेवटी १० वीचं वर्ष म्हणून कराटे बंद करण्यात आले.

दहावीच वर्ष बाकीच्या १०वीच्या विद्यार्थ्यांचं जितक्या रोमॅण्टिकली जातं तितकच आमचही गेलं. नंतर महाविद्यालयात गेलो तर तिथे आमचा काटकपणा आमच्याच डोळ्यात खुपायला लागला. महाविद्यालयात जिमखाना होता. ४ टी टी टेबल्स, ८-९ कॅरम आणि १०-१० पौंडाचे दोन डंबल असं त्या जिमखान्याचं रूपडं होतं. कॅरम किंवा टी टी साठी वाट बघताना कधी त्या डंबेल्स्ना उचललं तेवढच. ते पण धड उचलता यायचे नाहीत. शेवटी ठरवलं कि आता जिम लावलीच पाहिजे. घराजवळची जिम महिन्याला ५० रूपये घेत होती. ते घरात परवडत नव्हतं. त्यामुळे चालत ४५ मिनिटे दूर असलेल्या आणि महिना १५ रुपये घेणाऱ्या जिममध्ये नाव नोंदवणी करण्यात आली. माझ्यासारखी अजून ५ टाळकी तयार झाली. सकाळी पाच वाजता उठून ४५ मिनीटं एकमेकांशी गप्पा मारत (आणि शिव्या देत) जिमला जायचं, सहा ते सात असा एक तास व्यायाम करायचा असा प्लॅन ठरला. पण एक गोची होती. जिमच्या बाजूला एक महाविद्यालय होतं. सकाळची बॅच सातची असायची, त्यामुळे साडे सहा पासून महाविद्यालयीन कन्यांचे झुंडच्या झंड जिमच्या बाजूच्या रस्त्याने जायचे. या अर्ध्या तासात जिममधील सगळी उपकरणं वापरण्यासाठी उपलब्ध असत कारण सगळे पैलवान तेवढ्या वेळात जिमच्या बाहेर असलेल्या पुल अप रॉडवर तरी असायचे नाही तर उगाच स्ट्रेचिंग करत उभे राहायचे. आम्हीही त्याला अपवाद कसे असणार :) तरी आपलं एक तास नाही तर अर्धा तास व्यायाम व्हायचा. चार पाच दिवस व्यायाम करून आल्यावर अंगावर किती मांस चढलय ते उगाच आरशासमोर बघत राहायचो. महिना व्यवस्थित गेला. मग हळूहळू सहा टाळक्यांची पाच, पाचाची चार, चाराचे तीन झाले. दिड महिन्यानंतर पहाटे पाचला झापडं उघडेनाशी झाली. त्यात पावसाळा सुरू झाला आणि झापडांना न उघडण्यासाठी सबळ कारण मिळालं. शेवटी उरलेली ३ टाळकीही घरी झोपा काढू लागली. हाडाची काडं तशीच राहिली आणि वरून घरातून जिमवर घातलेले पैसे फुकट घालवले म्हणून पावलो पावली उद्धार होत राहिला तो वेगळाच.

त्यानंतर पुढची चार वर्षे जिमचं तोंडदेखील पाहिलं नाही. कॉलेज संपताच बंगलोरला (हो बंगलोरच, मी गेलो तेव्हा ते बेंगलूरू झालं नव्हतं) नोकरी मिळाली. तिथे इतर लोकांच्या मानाने मी १२ वीतला मुलगाच वाटायचो. माझा एक रूममेट जिमला जायचा. शेवटी त्याच्याबरोबर जायला लागलो. अगदी इन्स्ट्रक्टर सुद्धा लावला. त्याने सांगितलं कि भात आणि डाळ भरपूर खा. त्याला बिचाऱ्याला माहित नव्हतं की मी जितका डाळ भात दिवसाला खायचो बहुधा त्याच कुटूंब तेवढा आठवड्याला खात नसेल. त्याला माझ्या खाण्याबद्दल सांगितलं तेव्हा फक्त त्याचे डोळे पांढरे व्हायचे बाकी होते. त्यानंतर प्रोजेक्ट प्रेशरच्या नावाखाली ती जिमदेखील कधी बंद झाली ते कळलं नाही.

शेवटी ते जिमचं भूत मी माझ्या मानगुटीवरून काढून टाकलं. आपल्याला बॉडी बनवून कुठे मारामारी करायला जायचं नाहीय हे स्व:ताला समजावलं. बॉडी बिल्डींगपेक्षा फिटनेस महत्वाचा आहे हे मनाला पटवलं. आज रोज बऱ्यापैकी अंतर चालणं, लिफ्ट न घेता जिन्याने चढणं, बऱ्याच लॉंग डिस्टन्स मोटर सायकल राईड्स करणं, अधून मधून क्रिकेट खेळणं असं करून मी आजपर्यंत माझा फिटनेस टिकवून आहे, पण अंगावर मांस कधी चढलं नाही ते नाहीच.

Sunday, February 13, 2011

आगीचा धबधबा!!!!


नुकतच पाहिलं की माझी गेली २-३ पोस्ट्स मोटरसायकलिंग वरच आधारित होती. थोडासा चेंज म्हणून हे पोस्ट मोटरसायकलिंग वर नाहीय (पण भटकंतीवरच आहे :)). योसेमिटे नॅशनल पार्क मध्ये होर्स टेल नावाचा अगदी दुर्बीण घेऊन बघावा लागणारा एक धबधबा आहे. फक्त उंचीवरून खाली कोसळतो म्हणून त्याला धबधबा म्हणायचं इतकाच. नाहीतर त्यातले पाण्याचे प्रमाण पुरुष वर्गाने मारलेल्या धारे इतपतच असते. वर्षातले जवळपास ३५५ दिवस या धबधब्याला कोणीही भाव देत नाही. कोणी त्याचे फोटोही काढत नसेल या ३५५ दिवसात. पण फेब्रुवारी मधल्या ८-१० दिवसात मात्र योसेमिटे मधल्या इतर कोणत्याही धबधब्याकडे फोटोग्राफर्स चे इतके लक्ष जात नाही. हे ८-१० दिवस या धबधब्याच्या आसपासच्या पार्किंगस्पॉट वर सूर्यास्ताच्या वेळी एकाही जागा मिळत नाही. याचे कारण म्हणजे या ८-१० दिवसात सूर्यास्ताच्यावेळी असलेला सूर्याचा कोन. त्या कोनामुळे सूर्यास्ताच्या वेळी जवळपास १५-२० मिनिटे ह्या धबधब्यातून अक्षरश आग कोसळते.


गेली २-३ वर्षे मला ही गोष्ट अनुभवायची होती, पण नेमके दिवस कळत नव्हते. शेवटी २०११ मध्ये तो योग आला. सूर्याचा हा कोन १० फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी पर्यंत राहणार होता. याबद्दल माहिती मला ११ फेब्रुवारीला मिळाली. १९ फेब्रुवारीला विश्व चषक सुरु होत होता आणि त्याच दिवशी हिमवृष्टी आणि पाउस होणार होता. त्यामुळे १२/१३ फेब्रुवारीलाच जाणं भाग होतं. एकतर्फी अंतर फक्त ३.५ तास असूनही बायको मला एकट्याला पाठवायला तयार नव्हती. तिला भरपूर काम असल्यामुळे ती देखील येऊ शकत नव्हती. दुसरं कारण म्हणजे जो फिनोमिना फक्त १५-२० मिनिटे चालणार त्यासाठी ७ तास गाडीत बसायची तिची तयारी नव्हती :) शेवटी माझा एक मित्र पियुष यायला तयार झाला. त्याची कार manual transmission वाली होती आणि तो ती मला चालवायला द्यायला तयार झाला. मी अमेरिकेत आत्तापर्यंत एकदाही manual transmission वाली कार चालवली नव्हती त्यामुळे मी ती चालवायला उतावळा झालो होतो. योसेमिटेचे जवळपास सर्व कोनांतून फोटो काढून झाल्यामुळे आम्ही फक्त हा फिनोमिना कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी मस्तपैकी लंच करून निघायचं ठरवलं .

३.५ तास manual transmission वाली कार चालवण्याचा मस्त अनुभव घेत आम्ही योसेमिटेला पोहोचलो. पण आमच्या नशिबात पार्किंग नव्हती. सूर्यास्त जवळ येत चालला होता आणि पार्किंग मध्ये वेळ दवडायाचा नव्हता. शेवटी तिथेच रस्त्याच्या कडेला मी कार दाबून लावली. आमच्यासारख्या अनेकांनी तशीच पार्क केली होती. पियुषला सांगितलं कि पार्किंग तिकीट आलं तर मी भरेन म्हणून. कॅमेऱ्याचा लवाजमा घेऊन निघालो आणि पाहतो तर काय मोक्याच्या जागांवर गुढघाभर बर्फ साचला होता. तशाच बर्फात चालत त्यातल्या त्यात एका बर्फ नसलेल्या एका मोक्याच्या जागी आम्ही दोघांनी आमच्या ट्रायपॉडचा संसार थाटला आणि त्या १५-२० मिनिटांच्या काळात आम्ही त्या आगीच्या धबधब्याचे शेकड्याने फोटोज काढले. आमच्या नशीबाने आकाश पूर्णत: निरभ्र होते. जनरली या ८-१० दिवसात एक तर बर्फ तरी पडत असतो नाहीतर आकाशात ढग तर असतात. त्यामुळे फार थोडे छायाचित्रकार याचे फोटो काढू शकतात. त्या फार थोड्या छायाचित्रकारांमध्ये आता प्रवीण आणि पियुषचं नावसुद्धा आता जोडलं गेलंय :)

Wednesday, February 9, 2011

मुसाफिर हूँ यारों

बरेच महिने ब्लॉग विश्वापासून फरारी असल्याबद्दल क्षमस्व. मॅक वर मराठी टायपिंगचे लोचे, घराच्या छतावर उभे राहिलं तरी गळ्यापर्यंत येणारं काम अशी अनेक कारणं देता येतील, पण कधी कधी वेळ असूनही काही न लिहिण्यामागे आळशीपणा हेच एकमेव कारण आहे :( माझा हा लेख मायबोलीच्या २०१० हितगुज दिवाळी अंकात प्रकाशित झाला होता. २०११ मध्ये कमीत कमी एक तरी लेख असावा म्हणून इकडेही पेस्टतो आहे. :)

********************************************************************************************************************************

ऑगस्ट महिन्यात अजून एक ट्रीप झाली नाही तर नॅशनल पार्क चा पास एक्स्पायर होतोय आणि ८० डॉलर वसूल होत नाहीयत, उन्हाळा संपत आला तरी कुठेच भटकंती झाली नाहीय, मोटरसायकल पार्किंग मध्ये धूळ खातेय, ऑफिस/घर/ऑफिस करून करून गाढवाचं जीणं नशीबी येतय, .... एवढी कारणं माझ्यातला भटका भगत जागवायला पुरेशी होती. बुधवारी रात्री निर्णय घेतला की येत्या विकांताला योसेमिटे-मोनो लेक ला मोटरसायकल दामटायची. कोणी कंपनी द्यायला येतय का म्हणून विचारायला चार बाईकर्स आणि १५-२० कारवाल्या मित्रांना मेल केला. अर्थात इतक्या शॉर्ट नोटीसवर कोणीही यायला तयार झाले नाही. पण आपला विचार एकदा झाला कि झाला. शेवटी एकट्यानेच जायचं ठरवलं. होम मिनिस्टरांची इतक्या लांब मोटरसायकल वर बसण्याची शक्यता अजिबात नव्हती. शेवटी होम मिनिस्टरांकडून हो ना करत मला एकट्याला जाण्याची परवानगी पदरात पाडण्यात मी यशस्वी झालो.

मोटरसायकलवर रपेट करायची तर सुरक्षितता सर्वात महत्वाची. भारतात असताना मोटरसायकलवर अगदी ब्रेड आणायचा झाला तरी मी हेलमेट वापरत असे. हेलमेट हवं की नको हे वाद फक्त भारतातच नाही तर अगदी अमेरिकेतही होतात, पण म्हणतात ना सर सलामत तो राईड पचास. त्यातल्या त्यात भारतात मोटरसायकलचा वेग आणि वजन पाहता हेलमेट आणि थोडं जाड जॅकेट असले कि चालून जातं पण इकडे मात्र हेल्मेट सोबत राईडीन्ग जॅकेट , पॅंट, बूट आणि ग्लोव्ज वापरलेलं चांगलं असतं. ३०० किलो च्या मोटारसायकलवरून १२० kmph च्या वेगाने पडलो तर जगायला एवढं सगळं लागणारच ना :) त्याचबरोबर मोटरसायकल चालवायला सुरक्षित आहे की नाही हे देखील वेळोवेळी पाहणं योग्य असतं. टायर थ्रेड चेक करणे, तेल हवा पाणी योग्य आहे की नाही ते पाहणे, लादलेले सर्व सामान व्यवस्थित लादले गेलेय कि नाही ते पाहणे, कुठून खड खड आवाज येत असेल तर त्याचा योग्य तो बंदोबस्त करणे इतक्या गोष्टी तर नेहमीच केल्या गेल्या पाहिजेत. कार च्या तुलनेत मोटरसायकल ट्रिपसाठी जरा जास्त काळजी घ्यावी लागते पण एकदा का मोटरसायकल रपेटीचं व्यसन जडलं की ते मग उतरताना कठीण असतं. या सर्व गोष्टी आदल्या रात्रीच करून झाल्या होत्या. सकाळी बेसिक चेक करून लगेच निघायचा बेत होता. पण एरवी चटकन संपणारा शुक्रवार आज रेंगाळत होता. सगळी पॅकिंग संपवूनही बराच वेळ शिल्ल्क होता. लवकर उठायचं म्हणून लवकर झोपायला गेलो तर झोपही येत नव्ह्ती. अखेरीस रात्रभर ५० वेळा घड्याळ पाहून झाल्यावर एकदाची शनिवारची पहाट उजाडली. पावणे सातला मोटरसायकलला कॅमेरा बॅग, सॅडल बॅग, टॅंक बॅग आणि ट्रायपॉड बांधून मी तयार झालो. ६५ मैल/तास(१०५ kmph) च्या वर मोटरसायकल न्यायची नाही, सांभाळून जायचं, झोप आली तर मोटरसायकल बाजूला लावून तोंड धुवायचं अशा १००० सुचना ऐकता ऐकता ७ वाजले आणि एकदाचा मी मार्गाला लागलो. जीपीएस योसेमिटे ३.५ तासाच्या अंतरावर दाखवत होता, एखाद-दूसरा फोटो ब्रेक आणि फ्युएल ब्रेक घेऊन माझ्या अंदाजाप्रमाणे साधारण ११-११:३० पर्यंत पोहोचायला काही हरकत नव्हती. पहाटे हवेत गारठा होता. मूठी ग्लोव्ह्ज असूनही गारठत होत्या पण त्या गारठ्यामुळे निसर्गाच्या एकदम कुशीत शिरल्यासारखं वाटत होतं. मला वाटतं असला अनुभव घेण्यासाठी बाईकच हवी, कार नामक पिंजऱ्यात तो कधीच मिळणं शक्य नाही. शहरातल्या गर्दीत मोटरसायकल चालवणे आणि शहराबाहेरच्या मोकळ्या निसर्गात मोटरसायकल चालवणे यात अल्ताफ राजाचं गाणं ऐकणे आणि रफी साहेबांच गाणं ऐकण्यातला जो फरक आहे तो आहे. ज्यांनी मोटरसायकल वर अजून शहराबाहेर एकाही रपेट केली नाहीय त्यांनी शहराबाहेर एखाद्या विकांताला ३-४ तासांची एक रपेट करून बघा. पुण्याचे लोकं महाबळेश्वरला जाऊ शकतात आणि मुंबईचे लोक लोणावळा खंडाळा वा माथेरान करू शकतात. कोकणातले रस्ते तर एकदम मस्तच आहेत, ख़ास करून NH17 पण हो, safety first बरं का :)

२ तासांनी योसेमिटेचा घाट सुरू व्ह्याय्चा आत एक ब्रेक घेतला. गुड डे बिस्कीटे खाऊन येण्या जाणाऱ्या मोटरसायकल वाल्यांना हात दाखवत त्यांना गुड डे विश करत होतो :)फक्त ४५ मैल अंतर बाकी राहिले होते. पण आता उरलेले अंतर घाटात होते. जस जसा वर चढत होतो तस तसे दरीचे रूप मोहक होत होते. प्रत्येक हेअर पिन बेंडला उभं राहून फोटो काढावासा वाटत होता. दरीत फॉल कलर्स ऑगस्ट मध्येच यायला सुरुवात झाली होती, पहा तुम्हाला दिसतायत का ते.



योसेमिटे हा पार्क जवळपास १२०० चौ.मैलांवर पसरलेला आहे. नयनरम्य धबधबे, श्वास रोखून धरायला लावणारी सिनरी, जंगली जनावरं आणि रोज भेट देणारी माझ्यासारखी असंख्य टाळकी यासाठी प्रसिद्ध आहे. हायकिंगची मजा लुटण्यासाठी फार चांगले ठिकाण आहे. मर्क रिव्हर व्हाईट वॉटर राफ्टींगसाठी प्रसिद्ध आहे. पाचव्या स्तरापर्यंत तेथे राफ्टींग करता येते.

११:१५ च्या सुमाराला योसेमिटेच्या गेटवर पोहोचलो. तिथे वाहनांची भली मोठी रांग लागली होती. माझा नंबर येईपर्यंत १५-२० मिनिटे गेली. माझ्याकडे पास आहे असं सांगितल्यावर तो न पाहताच मला आत सोडण्यात आलं. आत गेल्यावर पावला पावलावर फोटो काढावेसे वाटत होते. मोटरसायकल असल्यामुळे पार्किंगचा जास्त प्रॉब्लेम नव्हता. योसेमिटेत काढलेले हे थोडे फार फोटो. त्या रिफ्लेक्श्न लेकचा एक फोटो काढल्यावर कुणीतरी उपद्व्यापी कार्ट्याने त्या पाण्यात एक दगड मारला, त्याच्यापाठोपाठ त्याच्या बापाने एक मारला. मला त्या दोघांनाही मारून पाण्यात फेकावेसे वाटत होते पण इंग्रजीतला एक चार अक्षरी शब्द उच्चारण्यापलीकडे काहीच करता आलं नाही.


दिवसभर साफ असणारे आकाश आता भरून यायला लागले होते. मग मी ते पाणी स्थिर होण्याची वाट न पाहता तिथून काढता पाय घेतला. मला सूर्यास्तापूर्वी मोनो लेकला पोचायचे होते. आकाश आता पूर्ण अंधारून आले होते. वाटेत टेनाया लेकच्या इथे हे विलोभनीय दृश्य दिसले आणि थांबलो.



एका छोट्याश्या सरीनंतर आता आकाशातील मळभ सरू लागलं होतं, पण कॅलिफोर्नियातील सर्वात उंच मानल्या जाणाऱ्या टिओगा पासच्या घाटात अत्यंत वेडीवाकडी हवा वाहत होती. ६५० पौंडाच्या मोटरसायकलीला त्याच्यावरच्या १५० पौंडाच्या स्वारासहीत दरीत ढकलायला बघत होती. त्या घाटात दरीच्या दिशेला संरक्षक कठडेही नव्हते.



उन्हाळा संपायला आला तरी जागोजाग बर्फाच्छादित टेकड्या दिसत होत्या. थांबून फोटो काढावेशे वाटत होते, पण न जाणो ह्या हवेने १५० पोंडाच्या मला दरीत भिरकावले तर या भीतीपायी मी न थांबता चालत राहिलो. संध्याकाळी ५.३० च्या सुमारास मोटेल मध्ये चेक इन केले. जाऊन पाहतो तर काय, रूम मध्ये फक्त बेसिन आणि बेड होता. फोनवर बुक करताना त्यांनी मला बेसिन आणि बाथरूम शेपरेट असतील म्हणून सांगितलं होतं. मला वाटलं की एकाच रूम मध्ये बेसिन बाथरूमच्या बाहेर असेल, पण ते एवढे शेपरेट असतील असं वाटलं नव्ह्तं :) सुर्यास्ताला अजून अवकाश होता. एक कॉफी मारून जरा ताजातवाना झालो. साऊथ टुफा तिथून ७ मैलांवर होती. म्हटलं लवकर जाऊन थोडी मोक्याची जागा पटकवावी. जाऊन पाहतो तर मोक्याच्या जागा अगोदरच पटकवल्या गेल्या होत्या. त्यातल्या त्यात एका बऱ्या जागेवर मी माझ्या ट्रायपॉडचा संसार मांडला. थोडेफार प्री-सनसेट फोटो काढून झाल्यावर सूर्यास्ताची वाट पाहू लागलो. पण नशीबात बहुते सूर्यास्ताचे रंग नव्हते. तासाभरापूर्वी निरभ्र असणारी पश्चिम दिशा अचानक ढगांनी भरून गेली. सूर्यास्त नशीबी नाही म्हटल्यावर सगळे फोटोग्राफर काढता पाय घेऊ लागले. काही वेळापूर्वी असणारी शेकडा माणसे निघून गेली आणि हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच टाळकी तिथे शिल्लक राहिली. निसर्गाला बहुतेक उरलेल्यांची दया आली असावी, त्यामुळे सूर्यास्ताचे नारिंगी केशरी नसले तरी आसमंत एका गूढ निळ्या रंगाने त्याने भरून टाकला.



अंधार पडल्यावर मी परत निघालो, वाटेत एक नेव्ही बीच १ मैल दर्शवणारी पाटी दिसली. म्हटलं एवढं आलोय तर अजून एक मैल जाऊन येऊ आणि वळवली मोटरसायकल तिकडे. मोठ्ठी चूक. तो रस्ता एकतर निर्मनुष्य होता आणि कच्चा होता. शेवटी होऊ नये ते झालं. माझ्या बाईकचं मागील चाक मातीत रुतून बसलं.


ते ३०० किलोचं धूड माझ्या एकट्याने हलणं तर शक्यच नव्हतं. इमर्जन्सी सर्विस वाले म्हणाले की आम्ही नाय बा कच्च्या रस्त्यावर येत. आजूबाजूला चिटपाखरूही नव्हतं आणि रात्रीचे ९ वाजले होते. मला दूरवर एक दिवा लुकलुकताना दिसला. जाऊन पाहतो तर एका आर.व्ही मध्ये एक गोरे कपल व्हेकेशन वर आलं होतं. त्यांना मोटरसायकल हलवण्याबाबत विनंती केली. नशीबाने ते तयार झाले. त्यांच्या मदतीने कशी तरी ती मोटरसायकल बाहेर काढली आणि नशीबाने त्याच्या नंतर मुख्य रस्त्यावर येईपर्यंत ती कुठे अडकली नाही.

मोटेलवर परत आलो तेव्हा दिवसभरात २८१ मैल रपेट करून झाली होती. त्या छोट्याश्या गावात रात्री मी पोहोचेपर्यंत खायचे सगळे पर्याय बंद झाले होते, पण बराच थकल्यामुळे भुकेल्या पोटीही मस्त झोप लागली.

रात्रीच्या प्रकारामुळे होम मिनिस्टरांकडून रविवारी सकाळी उजाडलं की गपगुमान घरी यायचं अशी सक्त ताकीद मिळाली होती. पण घरच्या वाटेत बोडीचं स्टेट पार्क आहे म्हटल्यावर माझ्यातला फोटोग्राफर चाळवला. म्हटलं फक्त बोडीसाठी पुन्हा एक ट्रिप होईल की नाही कोणास ठाऊक. बोडी हे कॅलिफोर्नियाच्या गोल्ड रश साठी उभारलेलं आणि एकेकाळी १०००० लोकसंख्या असणारं एक छोटसं गाव. पण त्या गावात गोल्ड रश मुळे रोजच एक दोन मुडदे पडायला लागले. अस होता होता साधारण ५०-६० वर्षापूर्वी तिथला शेवटचा माणूस सोडून गेल्यावर ज्या स्थितीत गाव आहे त्याच स्थितीत त्याचं जतन करण्यात आलं. फोटोग्राफर्स पॅराडाईस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागांपैकी ही एक जागा आहे. होम मिनिस्टरच्या धमकीमुळे तिथे केवळ एक तास घालवून मी परतलो. ही त्या भुताटकीने झपाटल्यासारखी दिसणाऱ्या गावाची काही चित्रे.






परतताना सोनोरा पास नावाच्या घाटातून गेलो. हा माझ्या आत्तापर्यंतच्या रपेटीतला सर्वात सुंदर मार्ग होता, पण घरी लवकर पोहोचायचं असल्यामुळे मी तिथे थांबलो नाही. तेवढंच पुन्हा राईड करण्यासाठी निमित्त :) ६ तासांच्या राईडनंतर आणि ५६२ मैलांच्या रपेटीनंतर जेव्हा संध्याकाळी घरी पोहोचलो तेव्हा शरीर थकलं होतं, होम मिनिस्टर रागावले होते पण मन मात्र एकदम ताजंतवानं झालं होतं...

Friday, April 30, 2010

फोर्ट ब्रॅग

माझी मोटरसायकल बहुतेक माझ्यावर रुसली होती. हजार वेळा स्टार्ट करूनदेखील स्टार्ट होत नव्ह्ती. जॉय आणि मी होण्डा व्ही टी एक्स १३०० एस चे सगळे फोरम्स वाचून काढले होते. स्पार्क प्लग बदलले, धक्का स्टार्ट, जम्प स्टार्ट करायचा प्रयन्त केला, पण तरीही ती सुरू होईना. शेवटी जॉय ने पेटकॉक पासून निघालेला छोटा वॅक्युम पाईप पाहिला. तो पुन्हा जोडल्यावर ती फुरफुरत स्टार्ट झाली. बहुतेक आठवडाभर बाहेर न नेल्यामुळे रुसली होती. म्हणून विकांताला तिला कुठेतरी लांब फिरायला न्यायचं ठरवलं.

जॉय/प्रिति आणि पियुश यांनी जवळपास २०० मैलांवर असलेल्या फोर्ट ब्रॅग येथे जायचं ठरवलं. शनिवारी भल्या पहाटे ९:३० वाजता जॉयच्या घरी भेटायचं ठरलं. इतर राईड्स प्रमाणे ही राईड मध्यरात्री ६:०० वाजता सुरु न झाल्याने मी तसा आनंदी होतो :) जॉयच्या घरी जॉयचा मित्र वैभव याने बनवलेली ऑम्लेट्स आणि कॉफी हादडून शेवटी ११:३० ला आमची राईड सुरु झाली. हो ना करत शेवटी वैभव, पूजा आणि त्यांची क्युट ८ महिन्यांची मुलगी सिमी कारमधून आमच्या बरोबर यायला तयार झाले. जॉय/प्रिती त्यांच्या १८०० सीसी च्या होण्डा गोल्डविंग वर, पियुश त्याच्या होण्डा व्हीएफ़ार ८०० सीसी वर आणि मी माझ्या होण्डा व्हीटीएक्स १३०० सीसी वर असा आमचा लवाजमा निघाला.


सुरुवातीला मुक्तमार्ग १०१ वर जवळपास २ एक तास चालायचं होतं. मुक्तमार्गावर मोटरसायकल चालवणं यासारखं बोरिंग काम या जगात दुसरं कोणतच नसेल. सुरुवाती सुरुवातीला हाय स्पीड ची मजा वाटायची पण आता नाही :( त्यात १०१ मार्गावर या हाय स्पीड मुळे माझं इंजिन कव्हर निखळून पडलं. बहुतेक स्पार्क प्लग लावल्यावर मी घट्ट बंद केलं नव्हतं. मी बाकिच्यांना थांबायला सांगेपर्यंत आम्ही जवळपास अर्धा पाऊण मैल पुढे आलो होतो. मुक्तमार्गावर मागे जाऊन रस्त्याच्या मधोमध पडलेलं कव्हर उचलणे म्हणजे मरणाला स्वत:हून मिठी मारण्यासारखं होतं, म्हणून शेवटी तसच पुढे जायचं ठरलं. त्यात माझ्या मोटरसायकलची पेट्रोल टाकीची क्षमता फक्त ५ गॅलन (जवळपास १९ लिटर) आहे. पुढे घाटात पेट्रोलपंप असेल की नाही याची गॅरण्टी नव्हती, त्यामुळे आमचं दिसला पम्प की भर पेट्रोल असं चालू होतं.

शेवटी एकदाचा १०१ मुक्तमार्ग संपला. आम्ही दुपारचा लंच केला आणि हाय्वे १२८ च्या घाटाला लागलो. आता फोर्ट ब्रॅग येईपर्यंत या घाटात चालायचं होतं. दोन्ही बाजूला दाट झाडी आणि वळणावळणांचा रस्ता, आत्ता कुठे राईडची मजा यायला सुरुवात झाली होती. पियुश एकदम धूम स्टाईलने पुढे दिसेनासाही झाला. बाकीच्या तीन गाड्या एकत्र चालल्या होत्या. शेवटी एका जागेवर पियुश आणि आम्ही एकत्र आलो आणि फोटो सेशन सुरु केलं.


जवळपास २४० मैल चालवल्यावर आम्ही फोर्ट ब्रॅगला पोचलो. फोनवर बुक केलेलं मोटेल बाहेरून तरी आमच्या पसंतीस उतरलं नव्ह्तं. पण दुसरी काही व्यवस्था होण्यासारखी नसल्यानं आम्ही तिथेचं राहायचा निर्णय घेतला. त्या माणसाने पर नाईट रेट म्हणून ६५ डॉलर लिहिला. प्रिती ने सांगितलं कि फोनवर ४५ सांगितलं होतं, तेव्हा त्याने ६५ खोडून ४५ लिहिलं :) रूम्स ठिकठाक होत्या. बाहेर पार्किंगमध्ये मला एक इंटरेस्टिंग हार्लेचा साईड स्टॅण्ड दिसला. तुम्हीही पहा :)



संध्याकाळी आम्ही जवळच्याचं ग्लास बीचला सनसेट पाहण्यासाठी गेलो होतो. त्या ग्लासबीच वर एक बीअरची बाटली वगळता दुसरा कुठलाही ग्लासचा तुकडा दिसला नाही. सनसेट पाहून आणि थोडे फोटो काढून आम्ही मोटेलवर परतलो.
रात्री जेवणानंतर गप्पा मारता मारता झोपी गेलो. त्या जागेवर बीचवर जाण्याव्यतिरिक्त दुसरे करण्यासारखे काहीही नव्हते, त्यामुळे दुसऱ्या दिवशी कोणतातरी वेगळा मार्ग पकडून घरी जायचं ठरलं.

सकाळी जवळच्याच एका रेस्टॉरंट मध्ये एकदम पोटभरून नाश्ता झाला. नाश्ता केल्यावर आम्ही आमच्या मार्गी लागलो. नवीन रस्ता देखील घाटाघाटांचा आणि दोन्ही बाजूला गर्द झाडी असणारा होता. जवळपास अर्धा तास चालल्यावर एका जागी फोटो शूट साठी थांबलो. कॅमेरा घेण्यासाठी टॅंन्क बॅग काढायला गेलो आणि पाहतो तर काय, टॅंन्क बॅग नव्हतीच पेट्रोलच्या टाकीवर. थोडक्यात मी ती रेस्टॉरंट मध्येच विसरलो होतो. माझ्या बाईकवर जाण्यापेक्षा ट्विस्टीमास्टर पियुशच्या बाईकवर जाणे हा वेगवान मार्ग होता. मी आणि पियुश परत गेलो आणि बाकीची जनता तिथेच फोटो काढत थांबली. माझ्या नशीबाने रेस्टॉरंटवाल्यांनी ती बॅग जपून ठेवली होती. पियुशच्या बाईकवर गेल्यामुळे आम्ही अर्ध्या तासाचा रस्ता जवळपास वीस मिनिटातच कव्हर केला :)

परत येताना आम्ही क्लिअर लेक स्टेटपार्क मध्ये थोडा वेळ थांबलो. नंतर पुढचे ६० मैल आम्ही एकमेकांच्या बाईक्स चालवल्या. मी जॉयची, जॉयने पियुशची आणि पियुशने माझी बाईक चालवली.



नंतर घरापर्यंतची राईड पुन्हा मुक्तमार्गावरची असल्याने बोरिंग होती :( रात्री ८:३० वाजता आम्ही घरी पोचलो. जवळपास ५२५ मैलांची आम्ही दोन दिवसांत रपेट केली. दुर्दैवाने माझा फोटोशॉप असलेला लॅपटॉप खराब झाला असल्याने अजून फोटो प्रोसेस केलेले नाहीत. वरच्या फोटोंचं क्रेडिट जॉय आणि प्रितीला जातं :)

तर पुन्हा भेटू असेच... कधीतरी.... कुठेतरी ...

Sunday, March 21, 2010

Life at 150kmph

मस्तपैकी चहा ढोसत मुंबई ईंडियन्सची इनिंग सुरू व्हायची वाट बघत होतो. तेवढ्यात जॉय चा मेसेज आला की गोल्डविंगर ग्रुप ची मीट आहे आणि त्यानंतर कुठेतरी रपेटीला जायचा बेत आहे. मी जाऊ की नको हा विचार करत होतो. तेवढ्यात सचिन ने स्टेन ला खणखणीत ३ चौके लावले आणि माझी द्विधा मन:स्थिती अजूनच वाढली. पण सचिननेच बाद होऊन माझी द्विधा मन:स्थिती दूर केली. कॅमेरा टॅन्क बॅग मध्ये टाकला, रायडिंग जॅकेट, पॅण्ट, ग्लोव्ज आणि हेल्मेट चढवले. बायको अजून झोपलेलीच होती. तिला सांगितलं कि मी चाललोय घर सोडून, तर झोपेतच म्हणाली कि बरं जा म्हणून. :) बाहेर आलो आणि मारली किक मोटरसायकलला (म्हणजे बटन स्टार्ट केली, च्या मारी माझ्या बाईकला किकच नाहिय)

मी पोचलो आणि १५-२० १८०० सीसी गोल्डविंग बाईकच्या मध्ये माझी VTX १३०० सी सी उभी केली. त्या दैत्यांसमोर माझी मोटरसायकल एकदम कुक्कुलं बाळ वाटत होती.




जॉय आणि प्रिति अगोदरच तिथे पोचले होते. सगळ्यांशी ओळख झाली. सगळे कमीत कमी ५० च्या वरचे म्हातारे म्हाताऱ्या होत्या पण बाईक चालवायचा उत्साह एकदम दांडगा. अर्ध्याहून अधिक लोकांकडे मोटरसायकल चालवताना एकमेकांशी बोलण्यासाठी हेल्मेटमध्ये इंटिग्रेट केलेले रेडिओ सेट होते. जवळपास प्रत्येक गोल्डविंगमध्ये सीडी प्लयेअर आणि जीपीएस होता. एका सुजान नावाच्या म्हातारीकडे बहुतेक या जगातली सर्वात रंगीबेरंगी गोल्डविंग होती. हा पहा तिचा तिच्या मोटरसायकलसहीत फोटो. किरण, ही बाईक म्हणजे a car on two wheels आहे.



मीटिंग नंतर माऊंट हॅमिल्टन येथे जायचे ठरले. साधारण ८० मैलांचा घाटात रस्ता होता. १०-१५ मैल, हायवेवर १८०० सीसी गोल्डविंग्सशी बरोबरी करताना नाकीनऊ येत होते. ते सर्वजण १००+ मैल/तास (१६० किमी/तास) ने चालवत होते. मी माझ्या लिमिटमध्ये(९५ मैल/तास) राहूनच त्यांना फॉलो करायचे ठरवले. फ़्री वेवर १० मोटरसायकल्स स्टॅगर्ड फॉर्मेशन मध्ये एका लेन मध्ये धावताहेत हे दॄष्यचं मोठं विलोभनीय होतं. तो आवाज ऐकून आमच्या लेनमधील मोटारी एक एक करत बाजूला होऊन आमच्यासाठी लेन मोकळी करून देत होत्या. १० मैलांनंतर घाटातला रस्ता सुरू झाला आणि मला माझ्या पुणे-मुंबई-गोवा राईडची आठवण झाली. कशेडी, परशूराम घाटात जशी नागमोडी वळणे होती अगदी तशीच इथेही होती पण जवळपास ८० मैल तसेच चालवायचे होते. त्या वळणांवर ३१५ किलो ची बाईक चालवताना भारीच मजा येत होती.

२५-३० मैलानंतर आमच्या लीडरने थांबायची खूण केली. त्यांना रॅन्च मध्ये घोडे दिसले. मग एक फोटो ब्रेक झाला. सगळे म्हातारे म्हाताऱ्या घोड्यांना काही ना काही खायला देऊ लागले.


१२० हॉर्सपावर असलेल्या गोल्डविंग्चे मालक मालकीणी ४ हॉर्स ना चणे खायला देताहेत हे पाहून १ हॉर्सपावर अशी दात काढून हसली.

तिथून निघालो आणि पुन्हा मार्गी लागलो. रस्ता आता अजूनच अरुंद होत चालला होता. मधली येलो लाईन नाहीशी झाली होती आणि रस्ताभर माती पसरली होती. फ्रीवेवर १०० च्या स्पीडने चालणारे आता २५-३० च्या स्पीडवर आले होते. रस्त्यात असणाऱ्या ऑब्स्टॅकल्स ची एकमेकांना जाणीव करून देत होते. एकदम शिस्तीत एकामागून एक चालले होते. ५० एक मैलानंतर एका रेस्टॉरंट जवळ एक ब्रेक घेतला. निसर्गसानिध्यात आत्तापर्यंत ३ तासांची राईड झाली होती, पण तरीही निसर्ग हाक देतच होता. रायडिंग जॅकेट आणि जीन्स वर रायडिंग पॅण्ट घालून निसर्गाच्या हाकेला ओ देण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. रायडिंग पॅण्ट्ची झिप अनझिप करून मी ’ते’ शोधायला लागलो आणि मग लक्षात आलं की अजून एक लेयर अनझिप करावी लागणार :)

या राईड साठी मी मला टाईट होणारा बाईकनोमॅडचा टी-शर्ट घालून गेलो होतो. माझ्या बाइकनोमॅड च्या मित्रांनो, bikenomad rides go international. हा त्याचा पुरावा


तिथून जॉय आणि मी लवकर निघालो आणि बाकिच्या लोकांचा फोटो काढण्यासाठी एक मोक्याची जागा पाहून थांबलो. मग येणाऱ्या बाईकर्स चे असे फोटो काढले.

शेवटी माऊंट हॅमिल्टन च्या माथ्यावर पोचलो. एक ग्रुप शॉट घेतला, थोड्या गप्पा मारल्या आणि पांगलो. जॉय आणि मी थोडी फोटोग्राफी करत थांबायचं ठरवलं आणि बाकीच्या ग्रुप ला बाय बाय केलं. ते पुढे निघून गेले आणि मग आम्ही ब्रेक घेत घेत फोटोग्राफी करत परत आलो.


ट्रिपचे सगळे फोटो पाहण्यासाठी खाली टिचकी मारा.

http://www.flickr.com/photos/pappupp/sets/72157623660591012/

Wednesday, January 13, 2010

टांगलंय

भारत वारीवर असताना मीनल आणि सिद्धार्थ ने टॅगलं, पण ईमेल न बघितल्याने ते तसच टांगून राहिलं. आता दोन तास काही खतरनाक उत्तरं लिहिता येतील का हे विचार करण्यात घालवले, पण जेट लॅग डोळ्यावर असल्याने फारसं काही सुचलं नाही, म्हणून ही सरळसोट उत्तरं.



1.Where is your cell phone?

माझा सेलफोन नाहीय. आहे तो ऑफीस तर्फे दिलेला आहे. ११ सेलफोन हरवाल्यानंतर स्वत:चा फोन ठेवण्याची छाती होत नाही :)

2.Your hair?

भारतातून परत येताना मस्तपैकी बारीक करून आलोय. आता अजून २ महिने तरी चिंता नाही. जायच्या अगोदर ३ महिने केस कापले नव्हते. माझे केस बघून माझा भारतातला न्हावी म्हणाला की साहेब तुमचे केस वाढल्यावर लय डेंजर दिसतात म्हणून :)

3.Your mother?
इमोशनल अत्याचार!! आता भारतात गेलो तेव्हा तिला सांगितलं नव्हतं, सर्प्राइज़ विज़िट होती. बघून खूष झाली तरी बाकी सगळ्यांना सांगताना माका येकट्याकच तेवडा सान्ग्लानी नाय म्हणून इमोशनल अत्याचार चालला होता.

4.Your father?
देवमाणूस. दिवसातले ४ तास तरी देवपूजेत घालवायचे. आता देवाच्यादारी जाऊन देवाच्या चरणी सेवा अर्पण करताहेत.

5.Your favorite food?
Anything spicy, पण जीव की प्राण म्हणजे वरण-भात, चपाती आणि गोड्या बटाट्याची भाजी. उरलेलं आयुष्य मी एवढ्या चार गोष्टींवर जगू शकतो.

6.Your dream last night?
कालचं आठवत नाही पण काही दिवसांपूर्वी एक ब्लॅक अँड व्हाईट स्वप्नं पडलं होतं.

7.Your favorite drink?
चहा

8.Your dream/goal?
काहीही नाही. मी काही महत्वाकांक्षी मनुष्य नाही आहे. येणारा दिवस मजेत जावा एवढं एकच स्वप्न.


9.What room are you in?
भाड्याच्या खोलीतला हॉल.


10.Your hobby?
फोटोग्राफी आणि मोटरसायकल वर दूर दूर चा प्रवास.

11.Your fear?
भूते खेते. विश्वास नाही पण भीती मात्र वाटते. हॉरर सिनेमे बघायची अजून हिंमत होत नाही आपली

12.Where do you want to be in 6 years?
क्र. ८ चे उत्तर पहा :)

13.Where were you last night?
घरीच होतो (स्वत:च्याच)

14.Something that you aren’t diplomatic?
कधीच नाही. मनात आणि ओठांवर एकाच गोष्ट असते आपल्या.एक वेळ बोलणार नाही पण डिप्लोमॅटिक बोलणं जमत नाही.

15.Muffins?
गोड खाण्यापासून मैल भर दूर राहतो :)

16.Wish list item?
कॅमेरयासाठी $१०००० ची एक लेन्स

17.Where did you grow up?
आमची मुंबई


18.Last thing you did?
सोफ्याच्या कूशन ला कवर घातली


19.What are you wearing?
टी शर्ट जीन्स आणि सॉक्स

20.Your TV?
सॅमसंग चा ४०" एच डी टी वी


21.Your pets?
None..

22.Friends
Lots of them...

23.Your life?

जगा आणि जगू द्या. अल्प संतोषी माणूस.

24.Your mood?
jetlagged.

25.Missing someone?
होय. बायकोला. अजून भारतात आहे


26.Vehicle?

Nissan Altima 2.5 S

27.Something you’re not wearing?
शेरवानी. कशी घालणार? १९ मध्ये टी शर्ट जीन्स आणि सॉक्स अगोदरच घातलेत ना :)

28.Your favorite store?
Any electronics store.

29. Your favorite color?
black



30.When was the last time you laughed?
३ ईडियट्स चं बलात्कारी स्पीच ऐकून :)


31.Last time you cried?

१९९३ जेव्हा वडिलांचा स्वर्गवास झाला.

32.Your best friend?

सचिन. तेंडुलकरांचा नाही सावंतांचा. गिनी आणि जॉयसी

33.One place that you go to over and over?
flickr.

34.One person who emails me regularly?
गिनी

35.Favorite place to eat?
अंजप्पर, ऑलिव गार्डन, बनाना लीफ

मी हेरंब ओक याना टॅगतोय

Friday, November 20, 2009

अल्केमिस्ट्री

राजू परूळेकर याने सचिनबद्दल लिहिलेल्या अल्केमिस्ट्री मधील सचिनचा उल्लेख मला योग्य वाटला नाही, त्याबद्दल त्याला मी एक इ-पत्र लिहिले. तेच इ-पत्र जसेच्या तसे.


राजू परुळेकर यास,

तुझी सचिन बद्दलची अल्केमिस्ट्री वाचली. माझ्या छोट्या मेंदूला तुला त्यात नक्की काय म्हणायचय ते झेपलं नाही. मला समजलेलं थोडक्यात सांगतो, १. तुला सचिनबद्दल कसल्याही भावना (आदर, प्रेम, तिरस्कार वगैरे) नाहीत. २ सचिनने कितीही धावा केल्यात तरी भारताचे महत्वाचे प्रश्न ( उदा. शेतकरी आत्म्हत्या) सुटणार नाहीत. ३. हिम्मतरावांसारखे लोक जे मानवजमाती साठी उपयुक्त काम करतात त्याबद्द्ल लोकांना माहितीही नसते. ४. मराठीतल्या अनेक प्रतिष्ठित लोकांनी त्याच्या वीस वर्षाच्या कारकिर्दीबद्दल भरभरून लिहिलं आहे ते दुसरं तिसरं काही नसून वैचारिक दिवाळखोरी आहे. ५. सचिनने केलेलं मुंबई सर्वांची हे विधान त्याच्याकडून केलं जायला नको होतं.

सर्वात महत्वाचं म्हणजे पहिला आणि पाचवा मुद्दा वगळता बाकिच्या साऱ्या मुद्द्यांसाठी सचिनला या लेखात आणण्याची खरचं काही गरज नव्ह्ती. पहिला मुद्दा तुझा तुझ्यापाशी राहिला असता तरी चाललं असतं (जसं तुझ्या मते प्रतिष्ठित लोकांनी सचिनच्या वीस वर्षाच्या कारकिर्दीबद्दल जे भरभरून लिहिलं ते नाही लिहिलं तरी चाललं असतं). पाचव्या मुद्द्याबद्दल मी शेवटी बोलतो.

मला कळत नाही की सचिनचा क्रिकेट खेळण्याचा आणि महाराष्ट्रातील समस्यांचा संबंधच काय? त्यातल्या त्यात तुमच्या पत्रकारितेचा आणि महाराष्ट्रातील समस्यांचा थोडाफार तरी संबंध आहे, म्हणून तू तुझ्या दोन वेळच्या जेवणाऐवजी एकच वेळ जेवण घेऊन एक वेळचे जेवण उपाशीपोटी लोकांसाठी दान करतोस असे काही ऐकिवात नाही (खरंच करत असशील तर गोष्ट वेगळी). या मुद्यासाठी सचिनला लेखात गोवणं नक्कीच योग्य नव्हे.

दुसरा मुद्दा हिम्मत राव आणि इस्रो चे संशोधक यांच्याबद्दल सामान्यांना जास्त माहिती नसते. आमटे, बंग यासारखे लोकांच्या कारकिर्दी माध्यमांनी सेलिब्रेट केल्या नाहीत. यात सचिनची काही चूक आहे असं मला वाटत नाही. बरं हा ही मुद्दा सचिनला न आणता मांडता आला असता. जे विकतं ते पिकतं हा नियम तुझ्यासारख्या पत्रकाराला नक्कीच माहित असेल. म्हणूनच तर तू हे मुद्दे मांडायला सचिन सोडून इतर कोणालाही घेतलं नाहीस असं माझं प्रामाणिक मत आहे. हे मुद्दे बॉलिवूडच्या कोणत्याही अभिनेत्याला घेऊनही तू मांडू शकला असतास. एका गोष्टीची नोंद घ्यावी, तू उल्लेख केलेल्या अनसंग हिरोंबद्दल मलाही अतीव आदर आहे.

सचिन च्या २० वर्षाच्या कारकिर्दीबद्दल अनेक प्रतिष्ठीत लोकांनी त्याच्या बद्दलच्या आठवणी सांगितल्या ज्या तुझ्या मते वैचारिक दिवाळखोऱ्या आहेत (का ते समजले नाही). आमटे वा तत्सम लोकांवर लिहून आलेल्या लेखांना, त्यांच्याविषयीच्या आठवणींना कुणी वैचारिक दिवाळखोरी म्हणत नाही, कारण ते त्यांच्या क्षेत्रात सर्वोत्तम आहेत. त्याच प्रमाणे सचिन त्याच्या क्षेत्रात सर्वोत्तम आहे. त्यामुळे त्याच्या बद्दलच्या मतांना वैचारिक दिवाळखोरी म्हणण्याचं वास्तविक पाहता काहीच कारण नाहीय. बरं तू क्रिकेटचा पंडीत असतास आणि मग सचिनबद्दलच्या लेखांचा असा उल्लेख असतास तरी गोष्ट वेगळी होती, पण तुझ्या म्हणण्याप्रमाणे क्रिकेट मध्ये तुला रस नाही. त्यामुळे हे लेख कदाचित तुला दिवाळखोरी वाटले असतील. त्यामुळे मला नाही वाटत कि सचिनचा उल्लेख इथेही फिट बसतो.दुसरी गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे टी.व्ही. वरील एखादा कार्यक्रम पाहायचा नसेल तर रिमोटने चॅनेल बदलता येतं त्याचप्रमाणे एखादी बातमी वाचायची नसली तर सोडून देता येते की? पण तू त्या सर्व आठवणी (उर्फ तुझ्या मते वैचारिक दिवाळखोऱ्या) वाचल्यास. सोडून का दिल्या नाहीस? बरं तुझ्या मते सचिनच्या बद्दल जे लिहून आलंय त्यामुळे मानवजातीला कोणतही वरदान प्राप्त झालं नाहीय. अगदी खरी गोष्ट, पण त्याने काही वरदान प्राप्त व्हावे अशी कोणाची अपेक्षाही नाही. पुढच्या वर्षी तुझ्या कारकिर्दीला वीस वर्षे पूर्ण होतायत. माझ्यामते तू पत्रकार असल्याने कुठेतरी ते लिहून येईल (अर्थात सचिन च्या बद्दल लिहून आलंय तितकं नाही), त्यामुळेही मानवजातीला काही वरदान प्राप्त होईल असं काही वाटत नाही. मानवजातीला वरदान प्राप्त करून देण्याची क्षेत्रे वेगळी आहेत. उदा. अवकाश संशोधन, भारताने ३८४ करोड खर्चून चंद्रावर पाणी असण्याच्या (फक्त) संभावनेचा शोध लावला. त्याचाही बराच बोलबाला झाला, पण त्याने मानवजातीला काय मिळालं? पुढेमागे चंद्रावरून एखादी पाईपलाईन टाकून ते पाणी इथे आणूही कदाचित, पण आजच्या घडीला तरी ते संशोधन काही फायद्याचं नाही. त्याबद्दल लिहून जर का तू मानवजातीला कोणतं वरदान प्राप्त झाला हा प्रश्न विचारला असतास तर ते समजण्यासारखं होतं. जर का सचिनबद्दल मिडियामध्ये लिहिण्या-बोलण्याने मानवजातीला कोणतेही वरदान प्राप्त होत नसेल तर बहुतेक तुझ्या मताप्रमाणे कोणत्याही ’सिंथेटिक’ गोष्टींना कोणत्याही प्रकारच्या मिडियामध्ये स्थानच मिळायला नको कारण कोणत्याही सिंथेटिक(अनैसर्गिक) गोष्टीमुळे मानवजातीला कधीच वरदान मिळणार नाहीय. जरा विचार करून बघ कि असं करणं कितपत शक्य आहे ते.

तुझ्या लेखातले इतर छोटे-मोठे मुद्देही वरील मुद्द्यांप्रमाणे सचिनला न आणता मांडता आले असते. राहता राहिला मी उल्लेखला पाचवा मुद्दा. सचिनने म्हटले कि मुंबई सर्वांची. ही लोकशाही आहे आणि प्रत्येकाला त्याचं मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. बरं त्याच्या स्टेटमेंट मध्ये चुकीचं काहीचं नाही, असलीच तर राष्ट्रीय एकता आहे. तुझ्या मताप्रमाणे त्याने क्रिकेटची खेळपटटी सोडून राजकीय खेळपटटीवर खेळायला नको होतं, त्यासाठी तू ते काय ते स्वादूपिंडाच्या ऑपरेशनचे उदाहरणही दिलंयस. अगदी बरोबर जेणू काम तेणू ठाय, बिजा करे गोता खायं, पण एक गोष्ट लक्षात घे, सचिनने स्वत: प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे स्टेटमेंट दिलेलं नाहीय. तुझ्यासारख्याचं कुणातरी पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना हे उदगार आलेले आहेत. आता त्या पत्रकाराला एखाद्या खेळाडूला राजकारणासंबधी प्रश्न विचारायची काही गरज होती का? खेळाडूला खेळासंबंधीचे प्रश्न विचारावेत असा पत्रकारिकेत रूल नाहीय का? तुझ्याच भाषेत सांगायचे झाले तर पत्रकारिता सोडून तो पत्रकार ऑपरेशन करत होता. स्वादूपिंडाच्या ऑपरेशनची सुरुवात कुणी केली असेल तर ती त्या पत्रकाराने, सचिनने नव्हे.

तू सचिन आणि गांगुलीची देखील तुलना केली आहेस. गांगुली बंगाली पत्रकारांना धरून राहतो, तर सचिन नाही. कुणाचे पॉलिटिकल व्ह्यूज काय असावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न नाही का? अन मला वाटतं की जोपर्यंत ते समाजाला कोणती हानी पोहोचवत नाहीत तो वर त्यांच्यावर टीका करणं योग्य नव्हे.

थोडक्यात तू तुझ्या लेखामध्ये सचिनचा उल्लेख न करता तुझे मुद्दे मांडले असतेस तर त्यांना मी आक्षेप घेतला नसता. माझा तुझ्या मुद्द्यांना अजूनही आक्षेप नाहीय, ते त्यांच्या जागी एकदम बरोबर आहेत. माझा आक्षेप आहे तो सचिनला विनाकारण या लेखात गोवण्याचा.

माझा तुझ्यावर वैयक्तिक आक्षेप नाहीय (लिहायची गरज नाहीय तरीही). तुझ्या लेखातला सचिनचा उल्लेख मला पटला नाही, म्हणून हा पत्रप्रपंच. वाटल्यास उत्तर दे, वाटल्यास नको देऊस.

प्रवीण

Saturday, November 14, 2009

सचिन रमेश तेंडुलकर

२० वर्षे एक असामान्य व्यक्तिमत्व पहिल्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून विसाव्या वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत* एकच गोष्ट करत आलाय पण तरीसुद्धा आपल्याला जराही कंटाळा आला नाहीय किंबहुना हेच तो येती काही वर्षे करत राहो हिच मनोमन प्रार्थना करतोय यातच त्या व्यक्तिचं मोठेपण सामावलय. एव्हाना वरचा * म्हणजे Conditions Apply नसून नाबाद चिन्ह आहे अन मी कोणाबद्दल बोलतोय हे ही चाणाक्ष क्रिडाप्रेमींच्या लक्षात आलं असेल.

सचिन रमेश तेंडुलकर. बऱ्याच भारतीयांसाठी क्रिकेटमधील देव आणि इतरांसाठी नंबर वन बॅट्समन. वीस वर्षे सतत खेळून अन करोडो रुपये कमवूनही ज्याच्या डोक्यात हवा गेली नाही असा माणूस. वीस वर्षात ज्याच्या नावाला कुठला वाद नावालाही चिकटला नाही असा तुमचा आमचा सचिन. याबाबत मला इच्छा नसतानाही विनोदचं उदाहरण घ्यावं लागतय. आचरेकर सरांच्या मते विनोद गुणवत्तेत सचिनहून थोडा उजवा होता पण तो यश टिकवू शकला नाही. वीस वर्षे कोणत्याही विवादापासून दूर राहणं हे येऱ्यागबाळ्याचं काम नाही. असे खेळाडू एका हाताच्या बोटावर सोडण्याइतकेच सापडतील.

सचिन तंत्रशुद्ध फलंदाज आहे याबाबत वादच नाही, त्याच बरोबर आक्रमकही आहे. बचाव आणि आक्रमण यांचा सुरेख मिश्रण त्याच्या खेळात पाहायला मिळतं. त्याचे चाहते तर अगणित आहेत पण त्याचबरोबर तो स्वत:साठी खेळतो, दबावाखाली खेळत नाही, तो चांगला finisher नाही असे म्हणणे असणारे देखील अगणित आहेत. त्याचाच एके काळचा सहकारी संजय मांजरेकर यात आघाडीवर आहे.

या लेखाचा हेतू हा हे मुद्दे खोडून काढणं हा आहे. जी लोकं शतकाच्या जवळ आल्यावर एकेरी धावा घेऊन शतक पूर्ण करणे याला स्वार्थीपण म्हणतात त्यांना क्रिकेट कळत नाही असं माझं म्हणणं आहे. भारत सचिन वेगात खेळला तर जिंकला असता पण सचिनने स्वार्थीपणे हळू खेळून आपले शतक/अर्धशतक पूर्ण केलं अशी एकही मॅच दाखवा, दाखवणाऱ्याच्या ढेंगाखालून जायला तयार आहे मी. वीस वर्षांत ८५ हून अधिक स्ट्राईक रेट असलेला फलंदाज स्वार्थी कसा असेल (अन हा स्ट्राईक रेट तेव्हा पासून आहे जेव्हा ५० षटकांत २२०-२३० धावा पुरेशा असत. २५० धावा म्हणजे डोक्यावरून पाणी)

दुसरी गोष्ट म्हणजे तो चांगला finisher नाहीय, हा आरोप. तो ५-६ व्या क्रमांकाचा खेळाडू नाहीय. तो सलामीचा फलंदाज आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक फळीच्या ठराविक जबाबदाऱ्या असतात. ५-६ व्या क्रमांकाच्या खेळाडूवर फ़िनिशेर असण्याची जबाबदारी असते. बरं तो जेव्हा जेव्हा बाद झालाय तेव्हा तेव्हा विजय आवक्याबाहेर नव्हता अन विकेटही हातात होते (आठवा चेन्नई ची कसोटी, परवाची १७५ धावांची खेळी), पण इतर फलंदाजांनी नेहमीच कच खाल्लीय, पण हात धुऊन सगळे सचिनच्याच मागे पडतात.

तो दबावाखाली खेळत नाही या आरोपासाठी हा पुढील लेखाजोखा

सचिनने कमावलेल्या ५४ सामनावीर किताबांपैकी ३१ सामन्यात दुसऱ्यांदा फलंदाजी करताना मिळवली आहेत तर २३ पहिल्यांदा.

त्याव्यतिरिक्त भारत हरलेल्या सामन्यात सचिनची कामगिरी खालीलप्रमाणे

ऑस्ट्रेलियाविरुद्ध
हरलेल्या ४१ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना १ अर्धशतक तर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना ९ अर्धशतके आणि २ शतके

इंग्लंडविरुद्ध
हरलेल्या १५ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना २ अर्धशतक तर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना १ अर्धशतक

न्यूझिलंड विरुद्ध
हरलेल्या १५ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना २ अर्धशतक तर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना १ अर्धशतक

पाकिस्तानविरुद्ध
हरलेल्या ३६ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना ४ अर्धशतके, ३ शतके तर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना ३ अर्धशतके आणि १ शतक. ३ अर्धशतकांपैकी दोनदा ९०+ धावा

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध
हरलेल्या ३३ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना २ अर्धशतक, १ शतक तर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना ३ अर्धशतके. ३ अर्धशतकांपैकी एक्दा ९०+ धावा

श्रीलंकेविरुद्ध
हरलेल्या २९ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना २ अर्धशतके, ३ शतके तर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना ५ अर्धशतके.

वेस्ट इंडिज विरुद्ध
हरलेल्या १५ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना २ अर्धशतके तर १ शतक

झिम्बाब्वेविरुद्ध
हरलेल्या ५ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना १ शतक

थोडक्यात हरलेल्या सामन्यांतही ३८ अर्धशतके आणि १२ शतके ((बांग्लादेश केनियासारख्या देशांची आकडेवारी धरलेली नाही). मग हा मांजरेकर आणि तत्सम टीकाकार कसे म्हणू शकतात की सचिन दडपणाखाली खेळत नाही?

वीस वर्षे खेळणे हाच एक विक्रम आहे पण वीस वर्षे खेळून ४४.५० चा ऍव्हरेज राखणे हे देखील येरागबाळ्याचे काम नाही. वीस वर्षे खेळलेले इतर खेळाडूही आहेत पण त्यांच्या काळात दर दिवसाआड सामने होत नसत. कसोटीत सुटीचा दिवस असे. क्रिकेट इतके थकवणारे नव्हते. यातच सचिनचे वेगळेपण दिसून येते. पाठदुखी आणि टेनिस एल्बोच्या दुखापतीचा सामना त्यालाही करावा लागला, पण तरीही वीस वर्षे हा फिटनेस त्याने टिकवला. मला नाही वाटत यापुढे वीस वर्षांची अजून कुणाची कारकिर्द असेल. अशा क्रिकेटच्या देवाला हा लेख भक्तिभावे अर्पण.

थोडसं अवांतर: आई, बघ जरा लहानपणी व्यवस्थित क्रिकेट खेळायला दिलं असतस तर हा लेख दुसऱ्या कुणीतरी माझ्यासाठी लिहिला असता.

वरील सर्व आकडेवारी cricinfo च्या statsguru वरून मिळवली आहे.

Monday, November 9, 2009

एक उनाड दिवस

१. टूथपेस्ट्चा गळा आवळल्यावर दात घासण्यापुरती पेस्ट बाहेर आली. आज संध्याकाळी नवीन टूथपेस्ट लाना ही पडेगा (असं मी गेले ४ दिवस ठरवतोय, पण रोज जरूरीपुरती पेस्ट निघतेय)
२. सकाळी सॉक्समध्ये रोजच्याप्रमाणे पॅण्ट अडकली नाही.
३. सॅन फ्रान्सिस्को ट्रेन असूनही आज माझ्या शेजारची सिट मी उतरेपर्यंत रिकामी होती (हे म्हणजे ठाणे-व्ही.टी. (चुकलो, सी.एस.टी.) स्लो ट्रेनमध्ये कांजूरमार्ग ला २०० ग्रॅम सिट (म्हणजे चौथी) मिळणे)
४. तिसरा मुद्दा कदाचित पहिल्या मुद्द्याचा साईड इफेक्ट असू शकतो हे आता लक्षात येतय.
५. ऑफिसात दरवाजाजवळ बसणारी सोनेरी केसांची भटकभवानी (पहाव तेव्हा ऑफिसभर भटकत असते) आजही हसली नाही.
६. ऑफिसात आज काहिच काम नव्हतं. तीन तीन वेळा सेंड/रिसिव वर क्लिक करून देखील एकही मेल आलं नाही.
७. मायबोली आणि मराठीब्लॉग्ज, फ्लिकर, जी-मेल साईट्स ऑफिसात ब्लॉक्ड असल्याने वेळही जात नव्हता. अगदी हातची सगळी नखं खाऊन संपली पण वेळ जात नव्हता (पायात बूट असल्याने आणि पाय तोंडापर्यंत पोचत नसल्याने पायाची नखं वाचली)
८. भटकभवानी टॉक टॉक सॅण्डल वाजवत क्युबिकलच्या बाजूने गेली. जाताना गोड हसली.
९. लंच नंतर परत येऊन सेंड/रिसिव वर क्लिक केलं आणि व्होय्ला, एक मेल आलं. ऑफिसात असणाऱ्या रक्तदान शिबिराबद्दल रिमाईंडर होतं. मेल मधला शब्द न शब्द वाचून काढला.
१०. टाईमपास साठी रक्तदान करायचा विचार केला, पण १ बाटली रक्त दिल्यावर शुद्धीवर येण्यासाठी ४ बाटल्या चढवाव्या लागतील म्हणून बेत रद्द केला.
११. चार पाच मित्रांनी मिळून मग दिड तास चकाट्या पिटल्या.अबु आझमीच्या अल्लामुखात भडकावणे, भारत ऑस्ट्रेलियाकडून हरणे ते भटकभवानीचे टॉक टॉक चालणे यापर्यंत सर्व विषय चघळून झाले.
१२. शेवटी ५:३० ला घरी निघालो. ट्रेनमध्ये बाजूची सिट रिकामी नव्हती.
१३. शेवटी नवीन टूथपेस्ट घेतली.
१४. घरी आलो तर बायको ’The Perfect Bride’ बघत होती. हि डेली सोप बाकी डेली सोपप्रमाणेच डोक्यात जाते.
१५. म्हणून मग ’हा उनाड दिवस’ ब्लॉगवर उतरवून तुम्हाला त्रास द्यायचं ठरवलं.

अजून वाचताय? तुमच्या पेशन्स ला सलाम :)

Friday, November 6, 2009

डबलढोलकी!!!

’मराठी माणसाने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला’ असे सामना ने कधीच म्हटले नाही (वाचा: http://saamana.com/2009/Nov/06/Index.htm पुन्हा भरती येईल). बहुतेक साहेबांची स्मरणशक्ती वयोमानानुसार खालावत चालली आहे. हा पहा त्याचा पुरावा (वाचा: http://saamana.com/2009/Oct/24/Index.htm अग्रलेख: बस्स झाले ते झाले). सर्व लेख वाचायचा कंटाळा आला असेल तर फ़क्त "...पण तरीही ज्या मराठी माणसासाठी शिवसेनेने ४४ वर्षे रान उठवले तो मराठी माणूसही निवडणूकीत शिवसेनेकडे पाठ फिरवील व पाठ फिरवतानाच आमच्या पाठीत खंजीर खुपसेल असे आम्हाला कधीही वाटले नव्हते.." एवढेच वाचा. एवढा ढळढळीत पुरावा, अन तोही सेनेच्याच मुखपत्रात असताना आम्ही असे म्हटलेच नाही असे माजी सेनाप्रमुख कसे म्हणू शकतात?

आता या स्टेट्मेंट्चा मोठा issue करण्याची काही गरज नाहीय पण बाळासाहेबांनी जे म्हटलय ते स्वीकारून गरज पडल्यास मराठी माणसाची माफ़ी मागायला हवी होती. अर्थात त्यांच्याकडून माफ़ीची अपेक्षा त्यांच्यावर प्रेम करणारा मराठी माणूस करत नाहीय, पण जे म्हटलय ते वाघाच्या काळजाने छातीठोकपणे स्वीकारले असतं तर त्यांच्याबद्दलचा आदर नक्कीच दुणावला असता.

बहुतेक शिवसेनेची, विशेषत: शिवसेनेच्या नेत्यांची पराभवानंतर खिलाडूवृत्तीने पराभव स्वीकारण्याची मानसिकताच जणू नाहीशी झालीय. उद्धव तर पराभवानंतर ३-४ दिवस अज्ञातवासात गेले. काय अर्थ काढायचा याचा शिवसेनेवर विश्वास ठेवणाऱ्या माणसाने? कमीत कमी मिडियासमोर येऊन आपण १-२ दिवसांत यावर आपले मत व्यक्त करू इतके तरी सांगावयास हवे होते. बरं येऊन मत मांडलं काय तर म्हणे आमचा पराभव झाल्लाच नाही. पराभवाचे मुख्य कारण काय तर मनसे. अरे लोकसभेला तेच सांगितलात ना? पुन्हा सगळ्या प्रचारात तोच राग आळवलात ना? मनसेचं अस्तित्व मान्य करून का नाही केलीत मोर्चेबांधणी? सेनेची मोर्चेबांधणी हा दुसराच विषय आहे. उत्तर भारतीय उमेदवार उभे करणे, जुन्या जाणत्या नेत्यांचा पत्ता कट करून नवनवीन ’आदेश’ देणं, लोकसभेत मनसेला मते देणारी लोक पुन्हा मनसेला मतदान करणार नाहीत या भ्रमात राहणं. अशी मोर्चेबांधणी झाल्यावर मोर्चा पडायला कितीसा वेळ लागणार. अर्थात म्या पामराने राजकारणाबद्दल शिवसेनेस काय शिकवावे, पण उघड्या डोळ्यांनी ज्या गोष्टी माझ्यासारख्या सामान्य माणसाला दिसल्या त्या सेनेच्या नेत्यांना दिसू नयेत याच आश्चर्य वाटतय.

अजूनही वेळ गेली नाहीय, म्हणजे तशी ती या विधानसभेत गेलीय निघून, पण पुढच्या निवडणूकीसाठी पूर्ण पाच वर्षे आहेत अजून. तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केलेली कामे वादातीत आहेत. मनसे पक्षामुळे मते विभागली गेली आहेत याबद्दल दुमत नाही, पण ती का विभागली गेलीत याच्याकडे लक्ष द्या. राज यांनी केलेल्या राजकीय टीकेकडे लक्ष द्या (रिलायन्स वर मोर्चा न्यायचा अन रिलायन्सच्याच जाहिराती सामनात छापायच्या, मराठी पाट्यांसाठी सेनेच्या काळात सेनेनं सक्ती न करणं वगैरे वगैरे). यापुढे मनसे पक्षाचे अस्तित्व मान्य करा अन त्यांच्यावर टीकाटिपण्णी करण्यात वेळ घालवू नका. मनसेने केवळ मराठी अस्मितेचा मुद्दा (जो कधीकाळी सेनेचा होता) लावून धरून एवढं यश संपादित केलय, तुम्ही मराठी अस्मितेबरोबर मराठी माणसाचे दैनंदिन जीवनातले मुद्देही लावून धरा.

४४ वर्षांचा पक्ष ४९ व्या वर्षात हाफ़ सेन्चुरीही पूर्ण न करता आऊट झालेला पाहायचा नाहीय आम्हाला.

Sunday, October 25, 2009

पवनचक्की

फ्रीमाँटहून लॉस अँजेलीस ला जाताना ५८० मुक्त मार्गाजवळ शेकडोंनी पवनचक्क्या पाहिल्या होत्या. तेव्हा निघायला उशीर झाला होता म्हणून तेव्हा न थांबता पुन्हा कधीतरी यांचे फोटो काढू असा विचार केला होता. तो योग काही गेल्य २.५ वर्षात आला नव्हता. गेल्या शुक्रवारी अचानक ते आठवलं अन दुसर्‍या दिवशी पहाटे निघायचा बेत केला.

शनिवारी भल्या पहाटे ५:३० ला उठून घोडं (म्हणजे गाडी) तिकडे दामटवली. ही पहा पहाटे ६:१५ ते ८:३० च्या दरम्यान काढलेली छायाचित्रे. कशी वाटली ते जरूर कळवा.




Thursday, October 22, 2009

आमची पण दिवाळी



गेल्या ११ वर्षात केवळ दोन वेळा घरच्या लोकांबरोबर दिवाळी साजरी करता आली. या वर्षी देखील तो योग नव्हता, पण मन स्वस्थ बसू देत नव्हते. पूजा विधी कसे करायचे ते नीट्सं ठाऊक नव्हतं. पण तरी ठरवलं, तोडकी मोडकी का होईना या वर्षी दिवाळी साजरी करायचीच. गेली दोन वर्षे फ़राळ विकत आणून खाल्ला होता. या वर्षी सौ ना बेसन चे लाडू बनवायची हुक्की आली, पण अगदी दिवाळीच्या दिवसापर्यंत काही ते शक्य झालं नव्हतं. शेवटी आदल्या दिवशी सामान आणून घराची आवराआवर करेस्तोवर रात्रीचे दोन वाजले.



भल्या पहाटे चार ला उठून अंघोळी उरकल्या. सकाळी मित्रमैत्रिणी घरी आले. मग त्यांच्या हातून विकत आणलेल्या पणत्यांवर नक्षीकाम केलं गेलं. तोवर दुपार उलटून गेली होती. आदल्या रात्री दोन तासाचीच झोप झाल्याने दुपारी सर्वांनाच झोप अनावर झाली. मग जी ताणून दिली ते थेट पाच वाजताच उठलो. मग बेसन चे लाडू बनवण्याचे ठरले. ते कसे बनवावे याचा अनुभव आजच्या आधुनिक नाऱ्यांपैकी कुणाकडेच नसल्याने अगोदर थोडेच लाडू बनवायचे ठरले, अन चांगले झाले तर सेकंड बॅच करायची ठरली. पण पहिल्याच बॅचला ३ तास लागले अन लाडू बनले अवघे ८. मग दुसऱ्या बॅचचा नाद सोडून दिला. नशीबाने प्रत्येकाच्या दाताला प्रत्येकी एक लाडू लाभला. त्याचे क्लोज अप फोटो काढेपर्यंत ते संपले देखील होते. जास्त लिहीत बसत नाही. पहा या दिवाळीत काढलेले काही फोटो.




Tuesday, October 13, 2009

ह्यांचा हसवण्याचा धंदा!!!

"क्या लग रहा है आपको राज ठाकरे कि बॉडी लॅंग्वेज को देखके..?" एक दाढीवाला स्टार न्यूज चा anchor सुटाबुटात त्याच्या संवाददात्याला प्रश्न विचारत होता. त्याची दाढी ही ’चैन से सोना है तो जाग जाओSSS’ असे ओरडणाऱ्या anchor पेक्षा शंभर एक ग्रॅमने कमी होती. बहुतेक विधानसभा निवडणूकीचं थेट प्रक्षेपण करायची जबाबदारी आपल्यावर येणार याची कल्पना असल्यामुळे महिन्याभरापूर्वी दाढी बनवून सूटबूट नीटनेटका बनून आला असावा. पण माकडाने वाघाची कातडी पांघरली तरी शेवटी माकड ते माकडच.

राज यांना मतदान झाल्यावर बहुतेक नव्यानच पत्रकार एका झालेल्या चिमणीनं प्रश्न विचारला होता कि या निवडणूकीत मनसे काही नवनिर्माण करू शकेल का अन त्याला राज यांनी २२ तारखेला सांगतो असं उत्तर दिलं होतं. तेच पकडून हा आपल्या संवाददात्याला प्रश्न विचारत होता.

" क्या लग रहा है आपको राज ठाकरे कि बॉडी लॅन्ग्वेज देखते हुए?"
"राज ठाकरे मे आत्मविश्वास की कमी नजर आ रही है. जो आक्रमकता उन्होने प्रचार करते समय दिखाई थी वो कही भी नजर नही आ रही है " - संवाददाता (त्याची दाढी होती की नाही ते दिसलं नाही).
" बिल्कुल बिल्कुल. मुझे भी उनमे आत्मविश्वास की कमी नजर आयी. शायद २२ तारिख को उनमे बात करने का भी आत्मविश्वास ना रहे" - तोच दाढीवाला.

अरे तुमचा पगार किती तुम्ही बोलता किती? ’२२ ऑक्टोबरला सांगतो’ या तीन शब्दात तुम्हाला कळलं की राज ठाकरे मध्ये आक्रमकतेचा अभाव आहे? वा रे वा, बहुतेक स्त्रियांचं अंतर्मन ओळखण्याचं ब्रम्हदेवालाही न जमलेलं काम हा दाढीवाला अन त्याचा तो संवाददाता सहज पार पाडू शकतील (फक्त प्रश्न हा आहे की यांच्या जवळपास फिरकायला किती स्त्रिया तयार होतील).

२४ तास लाफ्टर चॅलेंज चालू असलेलं एकमेव न्यूज चॅनेल म्हणजे स्टार न्यूज. अगदी आजतक ही त्याला स्पर्धा देऊ शकत नाही. त्यांची presentation ची style अफलातून आहे, म्हणजे एका छोट्या विंडो मध्ये चित्रे दाखवायची अन बाजूला मोठ्ठ्या फॉण्ट मध्ये न्यूज(?) लिहायची अन घसा सुकेपर्यंत रेकून तीच वाचून दाखवायची. म्हणजे सचिन तेंडुलकर चा फोटो दाखवून बाजूला ’क्या सचिन सेकंड इनिंग मे दबाव मे आकर खेलते है?’ अस ६५ साईज च्या फॉन्ट मध्ये लिहायचं अन तेच वाचून दाखवायचं. त्यांची वाचून दाखवायची style इथे जशीच्या जशी दाखवता येणार नाही :( ह.ह.ग.लो. (’तो’ अर्थ घेऊ नका) असेल तर एकदा त्यांची न्यूज पाहाच, खास करून वाह क्रिकेट. आई शप्पथ सांगतो, सचिन ने जर का त्यांची न्यूज पाहिली तर उद्या रिटायर्ड होईल, मरू दे तो २०११ चा वर्ल्ड कप.

मी शक्यतोवर हे चॅनेल लावत नाही. डोकं जड झालं असेल तर घडीभर हसण्यासाठी म्हणून हे चॅनेल लावतो. कालही तसच झालं. बायको 'Notting Hill' हा रोमॅन्टिक चित्रपट बघत होती. इंग्रजी रोमॅन्टिक चित्रपट आणि मी म्हणजे ३६ चा आकडा. तशीच वेळ आली तर मी चंद्रचूड सिंग आणि किशन कुमार चे चित्रपट आनंदाने पाहिन. (किशन कुमार कोण?? आठवा बेवफा सनम मधला सोनू निगमच्या आवाजातील ’आज ही हमने बदले है कपडे आज ही हम नहाये हुए है’ वर नाचणारा ठोकळा). तसाच तो Notting Hill माझ्या डोक्यात जाऊन माझा मेंदू कुरतडत होता. त्या सिनेमातील एकमेव आवडलेली गोष्ट म्हणजे त्यातलं You say it best when you say nothing at all’ हे गाणं. किती मस्त शब्दात प्रियकर आपल्या प्रेयसीला सांगतो कि अगं बये, तू खूप म्हणजे खूप बडबड करतेस, आत्ता तरी गप्प बस’ :) असो, विषयांतर होतय. तर तो सिनेमा पाहून जड झालेलं डोकं हलकं करण्यासाठी टीवी वर काही आहे की नाही ते पाहताना हे संवाद कानी पडले. राज यांनी विचारलेल्या प्रश्नांना अत्यंत शांतपणे उत्तरं दिली अन हा दाढीवाला नको त्या कल्पनांचा किस पाडत होता. आधी त्या दाढीचा किस पाड म्हणावं म्हणजे कमीत कमी त्याची स्वत:ची बायको (असली तर)गालावर किस घेण्याचा प्रयत्न करेल.

अजून एक केलेलं observation म्हणजे अमेरिकेत दाखवण्यात येणाऱ्या झी चॅनेलवरच्या रात्री ११:३० ला दाखवण्यात येणाऱ्या पंजाबी बातम्या. त्यात बातम्यांच्या दरम्यान दाखवण्यात येणाऱ्या चलतचित्रात फोकस हा फक्त सरदार लोकांवर करण्यात येतो, मग तो सरदार कुठल्या कोपऱ्यात लपलेला का असेना. विश्वास नसेल तर बघाच आजच्या बातम्या :) मुंबईत लोकल मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातही त्यांनी स्फोटावर कॅमेरा केंद्रित न करता एका सरदार असलेल्या पोलिसांवर केला होता.

हल्ली इकडे बे एरिया मध्ये ११७० वर एक २४ तास देसी रेडिओ स्टेशन सुरू झालेलं आहे. शुद्धलेखनाच्या नावाने खडे फोडणाऱ्यांनी कधी वेळ मिळाल्यास ते ऐकावं. हिंदी आणि इंग्रजी व्याकरणात जितके काळ, क्रियापद, कर्म, कर्ता, एकवचन, अनेकवचन वा जितकं काही आहे त्यांच्या माताभगिनींना एकत्र करून तयार झालेली भाषा म्हणजे या स्टेशनवरच्या निवेदकांची भाषा. ते निवेदक / निवेदिका समोर आल्यावर त्यांचा खून करावासा नाही वाटला तर नाव बदलून ठेवीन.

चला, यावर लिहू तितकं कमीच होईल. आवरतं घेतो. स्टार न्यूज तुमचं आवडीचं चॅनेल असेल अथवा Notting hill तुमचा आवडता सिनेमा असेल वा ११७० वर केलेली टिपण्णी तुम्हाला न आवडून तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मला काही एक फरक पडत नाहीय :) कृपया निषेध नोंदवण्याचा प्रयत्न करू नये, अपमान होईल ;)

Friday, October 9, 2009

काटकसर की उधळपटटी??

बरेच दिवस या विषयावर लिहायचा विचार होता, पण या ना त्या कारणाने ते राहून जात होतं. काही दिवसांपूर्वी भारताची चांद्रयान मोहिम अकाली संपृष्टात आली, परंतु जाता जाता चंद्रावर पाणी असल्याचे संकेत या मोहिमेतून मिळाले आहेत. सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद अशी ही गोष्ट आहे. पण.......

......पण याची दुसरी बाजू म्हणजे अशा मोहिमांवर खर्च होणारा वेळ आणि त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावर खर्च होणारा पैसा. अशा एका मोहिमेसाठी अब्जावधी डॉलर्सहून अधिक खर्च येतो म्हणे. रुपयांत हा खर्च मोजायचा झाला तर एकावर किती शून्य पडतील याचा विचारच माझ्या मेंदूला झेपत नाहीय. बरं केवळ या मोहिमेपुरतं बोलायचं झालं तर इतक खर्च करुन महत्वाचा निष्कर्ष काय तर चंद्रावर पाणी आहे याचे संकेत. असेल खरचं पाणी तर आपण काय चंद्रावर राहायला जाणार आहोत की चंद्रावरचं पाणी पृथ्वीवर आणून विहार तलावात ओतणार आहोत? आणि खरचं तसं करायचं ठरवलं तर अंटार्क्टिकेला जो पाण्याचा जवळपास अमर्याद साठा आहे तो आणून ओतणं जास्त स्वस्त पडणार नाही का?

कुठल्याही व्यवसायात मनुष्य रिटर्न ऑन इन्वेस्ट्मेंट (ROI) चा विचार केल्याशिवाय शक्यतोवर पडत नाही. फार कशाला, रुपयाला घेतलेली मेथीची जुडी दिड रुपयाने विकली जावी हा विचार रस्त्यावर भाजी विकणाऱ्या मावशी करतात. पण या अवकाश मोहिमांचे ROI कुणालाच नक्की माहीत नसते. म्हणजे इन्वेस्ट्मेंट अब्जावधी डॉलर्स आणि ROI काय तर चंद्रावर पाण्याचे संकेत आणि इतर संशोधनयोग्य माहिती? बरं हे अब्जावधी डॉलर्स येतात कुठून. सरकारच्या तिजोरीत डॉलर्स ठेवायला जागा नाही म्हणून सरकार अशा मोहिमांवर ते उधळताहेत अशातलाही काही भाग नाहीय. तुमच्या आमच्या सारख्यांचे टॅक्स चे पैसे अन बहुतेक कधीही न फेडता येणारं जागतिक बॅंकेकडचं कर्ज या पैशांवर या मोहिमा चालवल्या जात आहेत.

अशा मोहिमांमधून काढण्यात येणारे निष्कर्ष हाही एक संशोधनाचा विषय आहे. सर्व राष्ट्रांनी इतकी वर्षे केलेल्या अवकाश संशोधनानंतरही आज आपण येत्या काही दिवसांचे हवामान नक्की वर्तवू शकत नाही. आजही आपण येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडेल असे न म्हणता मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असे म्हणतो. गेली ३ वर्षे मी अमेरिकेची weather.com follow करतोय. त्यातही ते बऱ्याचदा चुकतात. चला एखादे वेळेस हवामानाच्या संशोधनासाठी अशा मोहिमांवर खर्च करणे मान्यही करू पण यांच्या संशोधनाचे विषय तर पहा, म्हणजे मंगळावर जीवसृष्टी आहे की नाही, पृथ्वी सारखा दुसरा ग्रह आहे का, aliens आहेत की नाही, दुसऱ्या ग्रहांवर खनिजांचा साठा आहे की नाही. असल्या नसत्या चांभार चौकशांसाठी खरच अब्जावधी डॉलर्स उधळणं योग्य आहे का? मंगळावर जीवसृष्टी असेल तर काय त्यांच्याबरोबर फोन-फोन खेळायचय की पृथ्वी सारखा ग्रह सापडला म्हणून लगेचच तिकडे राहायला जायचं? डिस्कवरी वर एकदा दाखवत होते की इकडचे संशोधनकर्ते गेली कित्येक वर्षे aliens साठी रोज येडचाप सारखे सांकेतिक संदेश पाठवताहेत पण आजपर्यंत एकही alien ने उत्तर पाठवले नाहीय. अरे असतील aliens तर त्यांना त्यांच्या ग्रहावर सुखाने जगू द्या की. इकडे बोलवून काय टी-२० च्या मॅचेस घ्यायच्या आहेत त्यांच्याबरोबर? या पैशाचा आहे त्या पृथ्वीवर नंदनवन फुलवण्यासाठी वापर करता येणार नाही का?

एक वेळ अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांनी अशा मोहिमा राबवण्यात काही गैर नाही. एक तर या मंदीच्या काळातही ते इतरांपेक्षा जास्त श्रीमंत आहेत आणि महत्वाचे म्हणजे त्यांच्या देशात उपाशी आणि बेघर नागरिकांचे प्रमाण अगदी नगण्य आहे. नागरी सुविधा मुबलक आहेत. पण भारतासारख्या देशाने अशी उधळपटटी करणं कितपत योग्य आहे. त्या पैशांतून भारताला अगोदर ’प्रगतीशील’ अवस्थेतून ’प्रगत’ अवस्थेत नेणे शक्य होणार नाही का? एका चांद्रमोहिमेच्या खर्चात माझ्यामते शेकडो गावे सहज वसवता येऊ शकतील. जास्त नाही, फक्त अगदी मूलभूत गरजा; अन्न, वस्त्र आणि निवारा. एकदा का सामान्यातल्या सामान्य माणसाला दोन वेळचं जेवण, राहायला निवारा अन ल्यायला कपडे मिळाले की मग विचार नाही का करता येणार अशा मोहिमांचा?

फार दूर कशाला? अरबी समुद्रात शिवरायांचा ४०० करोड रुपये खर्च करून statue of liberty हून उंच पुतळा बसवण्यात येणार आहे. तसा तो गेल्या विधानसभा निवडणूकीपासून बसवण्यात येतोय आणि बहुतेक पुढच्याही निवडणूकीत बसवण्यात येइल, फक्त त्याचा खर्च कागदोपत्री १००० कोटींवर गेलेला असेल. तर सांगायचा मुद्दा असा की त्या करोडो रुपयांत हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही का?

अशा अनेक गोष्टी आहेत ज्यात काटकसर करता येऊ शकते. एका मित्राशी चर्चा करताना तो म्हणाला होता की तू कुठे काटकसरीनं जगतोयस तुझं जीवन, घेतलास की लाखभर घालून एक SLR. मी नाही म्हणत नाहीय पण मी काही सरकारचा पैसा खर्च करत नाहीय. तो पैसा मी कष्ट करून कमावला आहे आणि मला पूर्ण अधिकार आहे तो खर्च करण्याचा. पण जेव्हा हजारो law abiding citizens पोटाला चिमटा काढून टॅक्स भरतात तेव्हा तो नीट वापरला जावा अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे?

मला कल्पना आहे की हा लेख लिहून परिस्थितीत काही फरक पडणार नाहीय. अवकाशयाने तशीच उडत राहतील अन भविष्यात कधीतरी शिवाजी महाराज अरबी समुद्रात घोडयावर स्वार होतील, पण मनातील घुसमट कमी व्हायला याचा नक्कीच उपयोग होईल :)

Saturday, September 19, 2009

कुणी सांगेल का?

१. अमेरिकेतून परत आलेल्या जवळपास प्रत्येकाच्या प्रत्येक वाक्यात ’अमेरिका’ एकदा तरी का डोकावते?
२. कुत्र्या मांजरांवर प्रेम करणारे चिकन/मटण बिर्याणी एकदम आवडीने कसे खातात?
३. ABCD (a.k.a. low waist) जीन्स घालणाऱ्या मुली बसल्यावर सारख्या सारख्या मागून टी-शर्ट का खाली खेचत असतात?
४. बाजू बाजूच्या क्युबिकल मध्ये बसणारे एकमेकांशी डायरेक्ट न बोलता messenger किंवा e-mail द्वारे का बोलतात?
५. समोर उघडेबंब गणराय दिसत असताना दर्शनाच्या रांगेतील एक माणूस स्वत: घातलेला शर्ट दुसऱ्याला दाखवत "हा शर्ट गणपतीला शिवला" असं का सांगत होता?
६. विषाच्या बाटलीवर expiry date असते का?
७. पुण्यात दुचाकीवरील ९९% मुली संपूर्ण तोंडाला स्कार्फ बांधून अतिरेकी का बनलेल्या असतात? प्रदूषण हे उत्तर असेल तर त्याचा त्रास पुरुष वर्गाला होत नाही का?
८. काही माणसं आपल्याला मोबाईलवर फोन करून कोण बोलतय असं का विचारतात?
९. (कविता करणाऱ्या सर्वांची माफी मागून) ब्लॉगवर ९०% हून अधिक लोक ओढून ताणून यमक जुळवून वा मुक्तछंद वापरूनच कविता का करतात?
१०. कुठल्याही मुलीला propose केल्यावर तिचं पहिलं उत्तर ’मी तुला त्या नजरेने कधी पाहिलच नाही’ हेच का असतं?

तुर्तास इतकेच.... अजून प्रश्न पडले की याचा भाग-२ लिहेन :)

Monday, September 7, 2009

हे भलते अवघड असते..

दरवाजाचं लॅच उघडून अरुण आत आला. डिश वॉशरचा आवाज येत होता. म्हणजे वैशाली घरी आलेली असणार. बूट काढून सोफ्यावर बसेपर्यंत वैशाली किचनमधून पाणी घेऊन आली.
" ए वैशू, चहा टाकतेस? डोकं बघ कसं जड जड झालय"
" हो अगोदरच टाकलाय. होईलच इतक्यात, तोपर्यंत फ्रेश होऊन ये"

अरुण उठला अन बाथरूम मध्ये गेला. वैशू किचन मध्ये गेली. अरुण फ्रेश होऊन यॆईस्तोवर वैशू ने गरमागरम चहा आणि त्याच्या आवडीची पारले-जी ची बिस्किटं मांडून ठेवली होती.

"अर्रे व्वा!! कुठे मिळाली ग ही बिस्किटं. येत नव्हती ना आजकाल इंडियन स्टोर मध्ये ?" - अरूण एकदम चार बिस्किटं उचलत म्हणाला
" अरे दूध आणायला गेली तेव्हा दिसली शेल्फ वर. उचलली आणि आणली. आणि ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये."
" बरं बरं, सकाळी सकाळी उपदेश नको देऊस " ती चार बिस्किटं एकदम चहात बुडवत अरूण म्हणाला.

अगदी रात्री बारा वाजताही सकाळी सकाळी ने सुरुवात करण्याची अरूणची सवयच होती. बिस्किटं संपल्यावर अरुण चहा बशीत ओतून भुरके मारून पिऊ लागला. त्याला तसच चहा प्यायला आवडायचं, पण बाहेर लोकलज्जेस्त्व ते करता येत नसे.

" ए अरु.."
" हम्म्म्म.. काय ग?"
" काही विचार केलायस का?"
" कशाबद्दल??
" अरे असं काय करतोयस? आपली फॅमिली सुरु करण्याबद्दल. लग्न होऊन साडे पाच वर्षे होतील आता. घरी फोन केला तर हेच ऐकाव लागत. तुझं बरं आहे, तुला कोणी बोलत नाहीत. सगळे उपदेशाचे डोस मलाच. हल्ली तर मी फोन करणच सोडून दिलय" वैशू त्राग्याने बोलू लागली.
" हे बघ वैशू, फॅमिली सुरू करायला माझी ना नाहीय. पण सध्यातरी ते शक्य नाहीय. लग्न झाल्यावर सांगत होतो, पण तेव्हा तुझं करियर तुला महत्वाचं होतं. सध्या अशा..." - अरुण उत्तरला
" जुन्या गोष्टी नको उकरून काढूस रे. आत्ताच्या परिस्थित काय करायचं त्यावर विचार केलायस का?"

अरूण उर्फ अरु आणि वैशाली उर्फ वैशू. दोघही एकाच मल्टीनॅशनल कंपनीत कामाला. गेली ३ वर्षे अमेरिकेत वेगवेगळ्या क्लायंटसाठी काम करणार एक भारतीय जोडप. तस त्यांचं अरेंज्ड मॅरेजच होत, पण त्यांच्याकडे पाहिल्यावर ते कोणी खरं मानणार नाही इतक प्रेम त्या दोघांत होतं. अरु सातारचा तर वैशू पुण्याची. अरुचे जीवनाबद्दलचे विचार एकदम स्पष्ट तर वैशू तिला काय पाहिजे याबद्दल थोडीसी कन्फ्युज्ड. अरु आणि वैशूचे घरवाले तर आता त्यांच्या हाती छोटं खेळणं कधी येतय याचीच आस लावून बसले होते. लग्नानंतर जेव्हा अरुने लगेचच फॅमिली सुरू करण्याबद्दल वैशूचं मत विचारलं तेव्हा वैशू थोडी गोंधळलेली होती. फॅमिली आणि करिअर यापैकी कशाला प्राधान्य द्यायचं हे ती निश्चित करू शकत नव्हती. शेवटी मित्रमैत्रिणींच्या सांगण्यावरून तिने करिअरला प्राधान्य द्यायचं ठरवलं. अरुनेही तिच्या मताचा आदर राखत दोघांच्याही घरच्यांना समजावलं.

लग्न झालं होतं खर पण एकत्र राहण त्या दोघांच्याही नशीबी जणू काही नव्हतच. अरुच्या कामाच्या स्वरूपामुळे त्याला भारतातल्या भारतात बरेच फिरवे लागत असे. आठवडा आठवडाभर तो या ना त्या शहरात फिरत असे. त्यात त्याला अनिश्चित काळासाठी अमेरिकेला जाण्यास सांगण्यात आलं. खरं तर अरुला जायचं नव्हतं पण वैशूच्या सांगण्यामुळे तो अमेरिकेत आला. वैशूचाही एच-१ झाला होता. एकाच कंपनीत असल्यामुळे तीही त्याला लवकरच जॉईन करणार होती. पण तिची assingment या ना त्या कारणाने पुढे ढकलली जात होती. होता होता दिड वर्ष निघून गेल. रोज याहू वर वेबकॅम वर एकमेकांना पाहून दिवस ढकलत होते, पण प्रत्यक्षात पाहण्यासाठी डोळे आसुसलेले होते. नाही म्हणायला महिन्याभराच्या सुटटीवर अरु एकदा भारतात येऊन गेला पण सर्व नातेवाईकांना आणि घरच्या मंडळींना भेटण्यात तो वेळ कसा निघून गेला हे त्या दोघांना कळलही नव्हतं. शेवटी एकदाची वैशूला assignment मिळाली अन ती अमेरिकेला रवाना झाली. पण तरीही एकत्र राहण काही त्यांच्या नशीबी नव्हतच. आता अरुची नोकरी स्थिर तर वैशूच्या पायाला भिंगऱ्या लागल्या होत्या. तिला तिच्या नवीन क्लायंटच्या अमेरिकाभर असलेल्या लोकेशन्स वर फिरावे लागे. महिन्याचे कमीत कमी २ विकेंड्स तरी ती घराच्या बाहेर असे. त्यांच्याबरोबरच्या जोडप्यांना एक दोन मुलही झाली होती. प्ले ग्राऊंडवर खेळणाऱ्या त्या लहान मुलांना पाहून आपण करिअरला प्राधान्य देऊन काही चूक तर केले नाही ना अस वैशूला राहून राहून वाटे. आता वैशूलाही आई बनावसं वाटत होत, त्यामुळे ती जवळपास रोज अरुकडे त्याचा लकडा लावत होती. पण अरूचे मुलाला वाढवण्याबाबत काही स्पष्ट विचार होते.

" विचार तर मी केलाय आणि तुला तो सांगितलाही आहे" - अरु म्हणाला.
" अरे पण हे सर्व सांभाळून काहीच का करता येणार नाहीय?" - वैशू
" हे बघ, मुल झाल्यावर आई-वडील किंवा त्याचे आजी आजोबा यांचा पुर्णवेळ त्या मुलाला मिळालाच पाहिजे या मताचा मी आहे. त्याला इथे डे केअर मध्ये मी अजिबात टाकणार नाही. "
" मग बोलावून घेऊ ना आई दादांना नाहीतर माझ्या आई बाबांना"
" नाही मला ते पटत नाही" - अरु चहाचा कप सिंक मध्ये ठेवत म्हणाला
" ते मला ही माहीत आहे पण का ते तू कधीच सांगितल नाहीयस" - वैशू म्हणाली.
" बरं आज सांगतो. तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर आई दादांना बोलवायचं झालं तर ते येणार नाहीत. अगं माझी आई सातारच्या बाहेर एस.टी. ने कधी गेली नाही, ती विमानात बसून साता समुद्रापलीकडे कशी येइल? आणि ...."
" मग माझ्या आईबाबांना बोलावून घेऊ ना, ते नक्की येतील." - त्याचं बोलणं मध्येच तोडत वैशू म्हणाली
" हे बघ त्यांना इकडे हवापालट करण्यासाठी बोलावण्यासाठी माझी काहीही हरकत नाहीय. पण फक्त आपली मुल सांभाळायला बोलावण मला पटत नाही. भारतात असतो तर गोष्ट वेगळी होती. एक तर तू १५-१५ दिवस घराच्या बाहेर असतेस, माझी ही घरी परत यायची अशी निश्चित वेळ नाहीय. आजूबाजूलाही मिसळ्यासाठी कुणी नाही. घरातल्या घरात तरी किती दिवस काढणार ते?" - अरु एका दमात उत्तरला
" अरे माझे आईबाबा करतील माझ्यासाठी तेवढं "
" मला माहित आहे ते, एखादा आठवडा वगैरे ठीक आहे पण ३-४ महिने त्यांना इकडे बोलावून त्यांची घुसमट करण्याइतका स्वार्थी मी नक्कीच नाही. आणि समज जर का ते आले, त्यांनी ३-४ महिने त्यांनी काढले कसे तरी, तर ते परत गेल्यावर काय?"
" मग यावर काहीच उपाय नाही का?" - वैशूने जवळ जवळ रडवेल्या सुरात विचारलं.
" आहे. आपल्यापैकी एकाने मुलाला पूर्ण वेळ द्यायचा. कमीत कमी तो सजाण होईपर्यंत तरी"
" आणि मग माझं करिअर??" - वैशू
" तूच पुर्ण वेळ द्यावास अस मी म्हणत नाहीय. तुला करिअर वर लक्ष द्यायचं असेल तर मी नोकरी सोडतो. मी घराची संपूर्ण जबाबदारी पाहीन. हाऊस हसबंड म्हण हव तर "
" अरे काही काय बोलतोयस. लोक काय म्हणतील. बायको कमावतेय अन नवरा बसून खातोय. " - वैशू
" हे बघ वैशू, लोक काय म्हणतील याचा विचार मी कधीच केला नाही. "
" दोघांचं करियर सांभाळून काहीच का करता येणं शक्य नाहीय" - वैशू
" आहे, त्यासाठी आपण भारतात परत जायचं" - अरु म्हणाला
" अरे पण ते आपल्याला परवडणार आहे का? आजकाल मुलांची शिक्षणे किती महाग झालीत ठावूक नाही का तुला? वर्षाला दिड दोन लाख कुठेच गेले नाहीत. पैसे कमवायला म्हणून आलो ना आपण इथे. माझ्या विसा ची ३ तर तुझी २ वर्षे बाकी आहेत. अजून आपली पाहिजे तशी सेव्हिंगसुद्दा झालेली नाहीय" - वैशू
" हे बघ कितीही सेव्हिंग झाली तरी ती आपल्याला अपुरीच वाटणार. पैसा वाढतो तशा गरजा वाढतात माणसाच्या. आणि कोणी सांगितलय की महागड्या शाळेतच घालायला हव मुलांना. मी म्युन्सिपाल्टी च्या शाळेत शिकून आणि तू समर्थ विद्यामंदीर मध्ये शिकून आज आपण चांगल्या पोजिशनला नाही आहोत का? लक्षात ठेव बदकाला राजहंसाच्या बाजूला बसवलं तरी बदक ते बदकच आणि हिऱ्याला काचेच्या गोट्यांमध्ये ठेवलं तरी हिरा तो हिराच. फक्त या हिऱ्याला पैलू पाडण्यासाठी आपल्याला पूर्ण वेळ देता आला पाहिजे" - अरू उत्तरला.
"भारतात गेल्यावर त्याला आपल्याला पूर्ण वेळ देता येइल?" - वैशू
" इकडच्या पेक्षा नक्कीच जास्त वेळ देता येइल. आपला पूर्ण वेळ जरी नाही मिळाला तरी आजी आजोबांचा वेळ त्याला नक्की मिळेल. इकडे डे केअरला टाकण्यापेक्षा ते नक्कीच चांगलं. इकडे म्हणे शाळेतच मुलांना त्यांचे आईवडील त्यांच्यावर ओरडले तर ९११ डायल करायला शिकवतात म्हणे. इकडे मूल हाताबाहेर जायला जास्त वेळ लागणार नाही. to be very frank मला या संस्कृतीत आपलं मूल वाढवायचं नाहीय. बुरसटलेल्या विचाराचा म्हण हवं तर मला, पण याबाबत मी माझी मतं तुला अगोदरच सांगितली होती. आज तुला त्यांची कारणही सांगितली. लग्नानंतर लगेच मूल न होऊ देण्याच्या तुझं मत मी स्वीकारलं होतं. आशा करतो की माझी मतेही तुला पटतील"
" इतकं फॉर्मल बोलायची काही गरज नाहीय.." असं म्हणून वैशूनं तो विषय तिथच संपवला.

रात्रभर वैशूच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. अरुचे विचार तिला कळत होते पण वळत नव्ह्ते. बराचं विचार केल्यावर तिचं मत पक्क झालं. पहाटे पहाटे कुठे तिचा डोळा लागला.

सकाळी डोळे उघडले तर आठ वाजून गेले होते. तितक्यात किचनमधून खडखडाट ऐकू आला म्हणून उठून ती किचन मध्ये गेली. अरू चहा करण्यात गुंतला होता.

" अरू "
" अरे उठलात राणी सरकार. मला वाटलं आज कामाला बुटटी मारताय की काय " - अरू आलं किसत म्हणाला
" बुटटीच मारणार होते, पण माझा विचार पक्का झालाय, तो मॅनेजरला सांगायला मी आज जाणार आहे" - वैशू उत्तरली.
" कसला विचार ग"
" नोकरी सोडायची किंवा भारतात परत जायचं यापैकी जे प्रथम होईल ते करायचं आणि लवकरात लवकर पाळणा हलवायचा " वैशू लाजत उत्तरली.
" अरे व्वा. काल सांगितलं असतस तर कालच सुरुवात केली नसती का, चल मारच दांडी तू. मी ही मारतो " डोळे मिचकावत अरु म्हणाला.
" चल चावट कुठचा " वैशू लाजत त्याच्या मिठीत शिरत म्हणाली
" चला राणीसरकार, जा दात घासा, चहा तयारच आहे "
" ही ही.. घासते रे बाबा. मी माझ्या मॅनेजरशी बोलते आणि तुला फोन करते. भारतात जायचं ठरलं तर तूही तुझ्या मॅनेजरशी बोलून घे"
" जशी आज्ञा राणी सरकार"

ऑफिसला येऊन सर्वप्रथम वैशू ने मॅनेजरला गाठले आणि तिचा निर्णय सांगितला

" वैशाली मी तुमच्या निर्णयाचा आदर करतो. पण तुम्ही तुमचा निर्णय चार महिने पुढे ढकला. या नव्या assignment बद्दल मी तुम्हाला सांगणारच होतो आज. तुम्हाला या विकेंडलाच निघायचय न्यू यॉर्कला जायला. दोन महिने असणार आहात तुम्ही तिथं. बाकीच तुम्ही परत आल्यावर बघू " - मॅनेजर उत्तरला.

वैशूला हसावं की रडावं तेच कळेना.

Saturday, September 5, 2009

हे करून पहा.. मज्जाच मज्जा!!!

कधी कधी रस्त्यावर चालताना वा गाडी चालवताना विषय सुचतात, वाटतं आत्ता घरी गेल्यावर यावर पोस्ट लिहून टाकू. पण घरी येइपर्यंत ते काय होतं तेच आठवत नाही. तर कधी कधी काही विषय, काही घटना इतक्या छोट्या असतात की त्यावर (माझ्या कुवतीच्या लेखकाला) एक लेख शक्य होत नाही. म्हटलं की आज अशाच छोट्या छोट्या गोष्टींना एकत्र करुन काही लिहिता येतय का ते पाहू. यातल्या बऱ्याचशा गोष्टी माझ्या वेंधळेपणाच्या आहेत, तेव्हा हासू नका बरं आम्हास्नी :)

१. अकरावीला माझं कॉलेज घरापासून चालत २५ मिनिटांवर होतं. रोज चालत जायचो अन चालत यायचो. शायनींग मारायला माझी सायकल कधी येतेय याची वाट बघत होतो. म्हणजे घरच्यांनी सायकल घेऊन द्यायचं प्रॉमिस केलं होतं. दहावीला ८१% मिळाले होते ना (असं काय बघताय फडतूसासारख, १९९२ साली ते भरपूर होते बरं का). शेवटी एकदाची सायकल आली. दुपारी सायकलवरून गेलो कॉलेजला. संध्याकाळी निघताना रोजच्या गँगबरोबर बाहेर पडलो. अर्ध अंतर चालल्यावर लक्षात आलं.. आयला आपली सायकल कुठाय?? ती बिचारी तशीच कॉलेजच्या पार्किंग लॉट मध्ये आपल्या धन्याची पाट बघत होती.

२. सकाळी उठल्यावर ब्रश करण्यासारखं कंटाळवाणं काम कुठलं नसेल. पण जन रीत म्हणून करावं लागतं. अशाच एका सकाळी मी ब्रश करायला सुरुवात केली. बश करताना मी जवळ जवळ अर्ध्या झोपेतच असतो. तसाच त्या दिवशीही होतो. ब्रश करताना काहीतरी वेगळं वेगळं जाणवत होतं. जरा डोळे उघडून नीट बघितलं.... त्या दिवशी वापरली गेलेली टूथपेस्ट होती.... पामोलिव्ह शेविंग क्रिम.... पामोलिव्ह दा जवाब नही...

३. मुंबईत नाल्याच्या बाजूला भैय्याच्या बरबटलेल्या हातांनी बनवलेली पाणीपुरी खाणारा मी इकडे अमेरिकेत आल्यापासून पाणी मात्र विकत आणून पितो (माज चढलाय, दुसरं काय). पाच गॅलन ची ३ कॅन्स भरून आणतो. पुरतात २-३ आठवडे. एकदा भरलं पाणी आणि मग लक्षात आलं कि पैशाचे पाकीट घरीच विसरलो. मग काय, ट्रॉली लावली कोपऱ्यात, गेलो घरी, आणलं पाकीट .. बरं एकदा करून शिकायचं की नाही? ही गोष्ट मी ३-४ वेळा केलीय. शेवटी मी गाडीतच थोडे पैसे ठेवायला सुरुवात केली.

४. हे मी केलेलं नाहीय (हुश्श्श, बरं वाटलं बाबा). शाळेत असताना आम्हाला भूगोलात कस्तुरी मृगावर एक धडा होता. कस्तुरीमृगाच्या बेंबीत कस्तुरी असते म्हणे. परिक्षेत कस्तुरीमृगावर टीप लिहा म्हणून प्रश्न होता. त्यात माझ्या एका वर्ग मित्राने लिहिलं होतं.... कस्तुरी मृगाच्या बेंबीत कस्तुरीची डबी असते... आणि तो पेपर आमच्या मॅडम नी वर्गात वाचून दाखवला होता :) मी पण असला करामाती प्रकार केलाय पण सर्वांसमोर नाही :) कुठल्या तरी शिक्षक दिनी मी गणितातली समीकरणे शिकवणार होतो. त्याची आदल्या दिवशी प्रॅक्टिस करत होतो. आई, वडील आणि मुलाचं समीकरणे वापरून वय काढायचं होतं. माझ्या समीकरणाने मला मुलाचं वय २५ वर्षे, आईचं वय १३ वर्षे आणि वडीलांचं वय ६-७ वर्षे असं काहीतरी दिलं होतं :)

बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण आता आवरतं घेतो :) आहे का मला कॉम्पिटिशन देणारा कुणी???

Thursday, September 3, 2009

इट्स माय कप ऑफ टी!!!!!!

दिड आठवड्याच्या सुटटीत सगळ्यात जास्त कोणती गोष्ट मिस केली असेल तर ती म्हणजे सकाळ आणि संध्याकाळचा चहा. इकडे बे एरियात फुटा फुटाला देसी रेस्टॉरंट्स आहेत पण ज्या अमेरिकन खेड्यात गेलो होतो तिकडे एकही नव्हतं. एखाद्या अटटल दारुड्याला आठवडाभर दारु न मिळाल्यास त्याची जी अवस्था होईल त्याहीपेक्षा वाईट अवस्था माझी झाली होती. नाही म्हणायला चहाच्या वेळेला कॉफी ढकलत होतो गळ्याखाली, पण सकाळ संध्याकाळ चहा ढोसण्यात जी मजा आहे ती कॉफी ढोसण्यात नाही. तुलनाच करायची झाली तर ते विलायती दारुची तहान हातभटटीच्या दारूवर भागवण्यासारखे होते.

प्रवीण पाताडे उर्फ मी म्हणजे अटटल चहाबाज. १९९८ ते २००१ च्या दरम्यान दिवसाला जवळपास १६-१७ कप चहा सहज रिचवणारा माणूस. आयुष्यात सुपारीच्या खांडाचही व्यसन नाही, पण चहा म्हणजे जीव की प्राण. १९९८ च्या अगोदरही मला चहा आवडायचा पण दिवसाला दोन कप, घरी जेव्हा बनत असे तेव्हाच. १९९८ ला घरापासून दूर बंगलोरला सॉफ्ट्वेअर इंजिनीअर म्हणून विप्रो कंपनीत रुजू झालो. कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांसाठी २४ तास चहाची सोय करून ठेवली होती (हो, तेव्हा विप्रो आतासारखी चिंधीगिरी करत नव्हती ). सकाळी ९ ते ६ कँटीन मध्ये चहा मिळायचा आणि रात्री २ मोठे थर्मास प्रत्येक फ्लोअरवर ठेवायचे. त्यापैकी सकाळी ९ चा आणि दुपारी २ चा चहा कँटीन वाला नायर जागेवर आणून द्यायचा. माझ्या मते तो मी माझ्या आजवरच्या आयुष्यातील प्यालेला सर्वोत्तम चहा होता. त्यामुळे रात्री कितीही उशीर झालेला असला तरी तो चहा पिण्यासाठी मी ९ च्या आत ऑफीसला टच होत असे. काम करता करता मी पार्ट टाईम एम.एस. सुद्दा करत होतो. दिवस कामात (आणि टी ब्रेकमध्ये) कसा निघुन जायचा ते कळायचं नाही, त्यामुळे रोज रात्रभर जागून अभ्यास करणे भाग असायचे. मग संध्याकाळी सहा ते रात्री दोन अडीज पर्यंत जवळपास तासाला दोन या हिशेबाने मी चहाचे कप रेटायचो.

मग जणू ते व्यसनच जडलं. पहिला प्रॉब्लेम २००१ मध्ये जेव्हा मी कॅनडाला गेलो तेव्हा आला. जाताना मी चहा पावडर वगैरे घेऊन गेलो होतो. सकाळ संध्याकाळ घरी चहा व्हायचा पण ऑफीसमध्ये पंचाईत व्हायची. मग तिकडे लिप्टनची डिप चहा प्यायचो, पण त्याने तलफ काही जायची नाही. हळू हळू घरातली पावडरही संपली. देसी स्टोर १०-१५ मैलांवर होतं आणि माझ्याकडे गाडी नव्हती. टी टाईम मध्ये मी लिटरली फ्रस्ट्रेट होत असे. मी तिकडच्या एक गोऱ्याला मस्करीत म्हटलही होत की कसला देश आहे तुमचा, साधी चहा मिळत नाही इथे. त्या माणसाने देसी स्टोर शोधून माझ्या वाढदिवसाला रेड लेबल चहाचा मोठा पॅक आणून दिला होता. माझ्या मते ते आजवरचं सर्वात बेस्ट बर्थ डे गिफ्ट आहे.

कॅनडाच्या ट्रिपमुळे माझं चहाचं प्रमाण ४-५ कप वर आलं होतं, पण चहा पिणं मला अतिशय आवडू लागलं होतं. कोणीही दिवसाच्या कुठल्याही वेळेला चहाचं आमंत्रण दिलं तर मी ते आनंदाने स्वीकारत होतो. माझ्या बायकोने जेव्हा ती माझी गर्ल्फ्रेंड होती तेव्हा विचारलं होतं कि तुझ्या आयुष्याच्या प्रायोरिटिज काय आहेत. मी म्हटलं की चहा, बाईक, फोटोग्राफी फ्रेंड्स/फॅमिली आणि काम.
"मग माझा नंबर कुठे लागतो" - आमच्या (तेव्हा नसलेल्या) सौ.
मी म्हटलं, " बाईक नंतर... "
नंतर काय झालं ते तुम्ही ओळखलं असेलच :) आमच्या घरात किचनमधली मी उचललेली एकमेव जबाबदारी म्हणजे चहा बनवणं :) सध्या चहाचं प्रमाण दिवसाला २-३ कपांवर आलय, पण आजही चहा माझा जीव की प्राण आहे आणि कोणी ऑफर केला तर मी आजही नाही म्हणत नाही. कुठल्याही लॉन्ग ड्राईव्ह ची मजा टपरीवर चहा प्याल्याशिवाय येत नाही, पण दुर्दैवाने इकडे चहाच्या टपऱ्याच नाहीत. त्यामुळे दिड आठवडा मी चहासाठी वखवखलेला होतो (वखवखलेला शब्द प्रयोग चालेल ना?) कोणी सांगितलं असतं की याचा खून कर मी तुला चहा देतो तर मी खूनही केला असता (भावना लक्षात घ्या, मी काही खून वगैरे करणार नाहीय:)). त्यामुळे दिड आठवड्यानंतर आल्यावर घरात पहिली गोष्ट कोणती झाली असेल तर ती म्हणजे चहा टाकणं, आणि हो, हा चहा माझ्या बायकोनं टाकला होता :)